शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !  

सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर अभिजित दीपके यांनी केले स्पष्ट

कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके

नवी देहली – सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी त्यांचे २६ दिवसांपासून चालू असलेले उपोषण सरकारच्या आश्वसनानंतर मागे घेतले. यानंतर कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके यांनी ‘एक्स’वर स्पष्ट केले की, जोपर्यंत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत कॉकरोच जनता पक्षाचे जंतरमंतर येथील शांततापूर्ण आंदोलन चालूच राहील. ‘सोनम वांगचुक यांनी २६ दिवसांनंतर त्यांचे उपोषण मागे घेतले आहे, याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे. सर, तुमच्या धैर्यासाठी आणि त्यागासाठी खूप खूप धन्यवाद. स्वतःचा जीव धोक्यात घालून तुम्ही संपूर्ण देशाच्या चेतनेला जागे केले आहे. तुमचे प्राण या देशासाठी अत्यंत मोलाचे आहेत’, असे दीपके यांनी म्हटले आहे.

कदाचित् आज रात्री आम्हाला अटक होऊ शकते ? – दीपके यांनी व्यक्त केली भीती

दीपके म्हणाले की, आज रात्री कदाचित् कॉकरोच जनता पक्षाच्या गटामधील सगळ्यांना पोलीस अटक केली जाऊ शकते. माझे सरकारला सांगणे आहे की, अटक का करायची आहे ? ३५ दिवसांपासून आम्ही शांततापूर्ण आंदोलन करत आहोत. एवढे शांततापूर्ण अंदोलन स्वतंत्र भारतात कधी झाले असेल, असे मला वाटत नाही. आम्ही राज्यघटनेच्या मागनि चालणारे लोक आहोत. तुम्हाला भारताच्या राज्यघटनेविषयी काय समस्या आहे ? तुम्ही सोनम सरांचे येथून अपहरण करून या आंदोलनाला आणखी मोठे केले. त्यानंतर तुम्ही २० जुलैला मुलींची डोकी फोडली, मुलींचे कपडे फाडून पोलिसांनी त्यांना मारहाण केली, तेव्हा हे आंदोलन संपूर्ण देशात पसरले. आता सरकारने आम्हाला अटक करून तिसरी चूक करू नये, अन्यथा हे आंदोलन आणखी मोठे होईल, अशी चेतावणी त्यांनी दिली.

अटक झाली, तरी शांततापूर्ण आंदोलन चालू ठेवा !

दीपके पुढे म्हणाले की, माझी सर्वांना विनंती आहे, की जर आज रात्री आमच्या गटाला अटक झाली, तर हे आंदोलन यापुढे शांततापूर्ण पद्धतीने चालवण्याचे दायित्व तुम्हा सर्वांचे आहे. माझा विश्वास आहे की, तुम्ही सगळे कायदा पाळणारे देशभक्त आहात. तुम्ही असे काहीही करणार नाही, ज्यामुळे आपल्या देशाची हानी होईल. त्यामुळे जर आम्हाला आज अटक झाली, तर तुम्हाला देशाच्या प्रत्येक भागात हे आंदोलन पुढे न्यायचे आहे. जे लोक हिंसा करतील किंवा चुकीचे काही करतील, ते कॉकरोच जनता पक्षाचे समर्थक असू शकत नाहीत. आम्ही शांततापूर्ण मार्गावर विश्वास ठेवणारे लोक आहेत.