भारत आर्मेनियाला शस्त्रे विकणार असल्याने अझरबैझानकडून भारतावर टीका

भारताचे शत्रू पाकिस्तान आणि तुर्कस्थान अझरबैजानला करतात शस्त्रपुरवठा !

अझरबैजानचे राष्ट्रपती इल्हाम अलियेव

नवी देहली – भारत आर्मेनिया देशाला शस्त्रांची विक्री करणार आहे. यामुळे आर्मेनियाचा शत्रू असणारा इस्लामी देश अझरबैझानने भारतावर टीका केली आहे. अझरबैजानचे राष्ट्रपती इल्हाम अलियेव यांनी यावर आक्षेप घेतला आहे. ‘भारताचे हे पाऊल मैत्रीच्या विरोधात आहे’, असे त्यांनी म्हटले आहे. आर्मेनियाच्या विरोधात पाकिस्तान आणि तुर्कस्थान यांचे अझरबैजानला समर्थन आहे. ते अझरबैझानला शस्त्रे देत असतात. आर्मेनिया आणि अझरबैझान यांच्यात पूर्वी युद्धे झालेली आहेत.
राष्ट्रपती इल्हाम अलियेव यांनी म्हटले की, आम्ही एका गंभीर संकटाचा सामना करत आहोत आणि त्यावला लवकरच मात करू. धोका आमच्या सीमेच्या आत किंवा बाहेर जरी असला, तरी आम्ही त्याला नष्ट करू. तसे करणे, हा आमचा अधिकार आहे. ‘कोणते देश आर्मेनियाला शस्त्र देण्याचा सिद्धतेत आहेत’, हे आम्हाला ठाऊक आहे. दुर्दैवाने भारत त्यांमधील एक आहे. त्याचे हे पाऊल मित्रतेचे नाही; कारण या शस्त्रांचे लक्ष्य केवळ एकच आणि ते म्हणजे अझरबैझान हाच असणार आहे.

संपादकीय भूमिका 

भारताने ‘कुणाला शस्त्रे विकावित आणि कुणाला विकू नये’, याचा निर्णय अझरबैजानला विचारून घ्यायचा, असे त्याला वाटत असेल, तर तो पाकिस्तान आणि तुर्कस्थान यांच्याकडून शस्त्रे का घेतो, याचे उत्तर त्याने दिले पाहिजे !