केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून पुरातत्व विभागाची लकवा झाल्यासारखी स्थिती !

पुरातत्व विभागाचे माजी अधिकारी के.के. महंमद यांचा त्यांच्या आत्मचरित्रात आरोप

पुरातत्व विभागाचे माजी अधिकारी के.के. महंमद

नवी देहली – अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीच्या उत्खननात मोलाची भूमिका बजावणारे भारतीय पुरातत्व विभागाचे माजी अधिकारी आणि पुरातत्व तज्ञ के.के. महंमद यांचे आत्मचरित्र असणारे ‘अ‍ॅन इंडियन आय अ‍ॅम’ (मी भारतीय आहे) नावाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. यात त्यांनी केंद्र सरकारवर आरोप करतांना म्हटले आहे, ‘वर्ष २०१४ मध्ये केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून पुरातत्व विभागाची लकवाग्रस्तासारखी स्थिती झाली आहे.’ या टीकेवर माजी केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांनी प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले आहे की, मी हे पुस्तक वाचले आहे. मी याची समीक्षा करत असून आवश्यकता भासल्यास या प्रकरणी कारवाई करीन.

१. के.के. महंमद यांनी पुस्तकात म्हटले आहे की, भाजपचे सरकार आल्यानंतर पुरातत्व तज्ञांसाठी असणारी आर्थिक तरतूद २५ लाख रुपयांवरून ३ लाख रुपये करण्यात आली. यामुळे स्मारक आणि मंदिर यांच्या संरक्षणाचे कार्य होऊ शकले नाही. लहान-लहान गोष्टींसाठी देहलीतील मुख्यालयाचे तोंड पहावे लागत आहे.

२. के.के. महंमद पुढे म्हटले आहे की, भाजपचे सरकार सत्तेत आल्यावर जनतेला संस्कृतीच्या क्षेत्रात परिवर्तनाची अपेक्षा होती. काँग्रेस सरकारच्या काळात मध्यप्रदेशातील चंबल भागातील बटेश्‍वर येथे २५ लाख रुपयांच्या आर्थिक तरतुदीचा वापर करून तेथील ८० मंदिरांचे पुनर्निमाण केले होते; मात्र दुःखाची गोष्ट आहे की, भाजपच्या कार्यकाळात बटेश्‍वर येथे एकाही मंदिराचे पुनर्निमाण होऊ शकलेले नाही.