शिवसेना ठाकरे गटाच्या विरोधात भाजपकडून १७ डिसेंबरला ‘माफी मांगो’ आंदोलन !

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे व भाजपचे नेते आशिष शेलार

मुंबई – शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हिंदु देवता आणि साधू-संत यांच्यावरील टीकात्मक वक्तव्ये केली आहेत. त्यांच्याकडून कधी प्रभु रामचंद्राचा अवमान, कधी भगवान श्रीकृष्णाचा उपमर्द, कधी संत ज्ञानेश्‍वर महाराज यांची खिल्ली, संत एकनाथ महाराज यांची चेष्टा, तर वारकरी संप्रदाय अपमान केला जात आहे.  महाराष्ट्र  हे सहन करणार नाही. एवढे होऊनही उद्धव ठाकरे मौन सोडत नाहीत. हिंदूंच्या श्रद्धास्थानांची निंदानालस्ती उद्धव यांच्या शिवसेनेला सहन कसे होते ? हिंदु देवतांची टिंगलटिवाळी, ‘भगवान श्रीकृष्ण ‘डेट’ला (युवती आणि युवती यांनी एकमेकांचा अनुभव येण्यासाठी एकत्र रहाणे) गेले होते’, असे अत्यंत अशलाघ्य विधान करून अपमान करणे, हे शिवसेनेकडूनच होत आहे. वारकरी संप्रदायावर केलेले हे आक्रमणच आहे. या निषेधार्थ भाजप १७ डिसेंबरला ‘माफी मांगो’ आंदोलन करणार आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी ही माहिती दिली.
१७ डिसेंबरला महाविकास आघाडीतील पक्ष भाजपच्या नेत्यांच्या काही वक्तव्यांचा विपर्यास करून त्या विरोधात मोर्चा काढणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर भाजपनेच ‘शिवसेना ठाकरे गटाकडून हिंदूंच्या देवता आणि आंबेडकर यांचा कसा अवमान होत आहे ?’, हे समाजासमोर आणण्यासाठी आंदोनलाची घोषणा केली आहे.

शेलार पुढे म्हणाले की, विरोधकांना मोर्चे काढण्याचा अधिकारच नाही. असत्य पसरवले जात आहे. राज्य सरकार मुंबई महानगरपालिका यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील २ पुस्तके विधीमंडळ उपनेते आमदार भाई गिरकर यांनी पाठवली आहेत. आंबेडर यांचा जन्म कुठे झाला ? याविषयी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून जाणीवपूर्वक चालू आहे. खोटी माहिती पसरवणे, ही अक्षम्य चूक आहे. पूर्वी काँग्रेसने आंबेडकारांचा पराभव केला, आता शिवसेनेने हा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.