‘बेस्ट’च्या संपामुळे प्रवाशांचे हाल; दगडफेकीसह तोडफोडीच्या घटना !

बसगाड्यांचे आरसे फोडले, तर टायरमधील हवाही काढली !

मुंबई – ‘बेस्ट’ बसच्या कामगारांनी त्यांच्या मागण्यांसाठी अचानक पुकारलेल्या संपामुळे मुंबईकरांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले. नोकरदार, विद्यार्थी आणि सर्वसामान्य प्रवासी यांचे अतोनात हाल झाले. संपाच्या काळात १० बसगाड्यांवर दगडफेक करण्यात आली. कामावर येणार्‍या कर्मचार्‍यांना धमकावण्याचे १० प्रकार घडले. ३ बसगाड्यांचे आरसे फोडण्यात आले, तर ३ बसगाड्यांच्या टायरमधील हवा काढण्यात आली.

मुंबईकरांसाठी एकूण २ सहस्र ७६६ बसगाड्यांचे नियोजन करण्यात आले होते; मात्र संपामुळे प्रत्यक्षात केवळ ४८ बसगाड्याच धावत होत्या. यामुळे मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली. बस सेवा ठप्प झाल्यामुळे रेल्वेस्थानकांबाहेर प्रवाशांच्या अनेक किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या. या अपलाभ घेत काही रिक्शा आणि टॅक्सी चालकांनी प्रवाशांकडून अव्वाच्या सवा भाडे उकळले. २-३ किलोमीटर अंतरासाठी रिक्शाचालक १५० ते २०० रुपये वसूल करत होते. (असा मनमानीपणा करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई व्हायला हवी ! – संपादक)

‘प्रशासनाने संपकर्‍यांशी चर्चा करून लवकरात लवकर तोडगा काढावा आणि मुंबईची वाहतूक सेवा पूर्ववत करावी’, अशी आग्रही मागणी मुंबईकरांनी केली आहे. (अशी मागणी करण्याची वेळ का येते ? बेस्ट प्रशासन स्वतःहून उपाय का काढत नाही ? – संपादक)

संपादकीय भूमिका

स्वतःच्या मागण्यांसाठी संप करून प्रवाशांना वेठीस धरणे कितपत योग्य ?