‘स्मार्ट मीटर’ची बळजोरी केल्यास तीव्र आंदोलन करणार !

‘किसान काँग्रेस’ची ‘महावितरण’ला चेतावणी

सातारा, १९ जून (वार्ता.) – ‘महावितरण’ आस्थापनाकडून सातारा जिल्ह्यातील काही ग्राहकांना ‘स्मार्ट मीटर’ बसवून घेण्यासाठी ४८ घंट्यांची समयमर्यादा देण्यात आली आहे’, असा संदेश पाठवण्यात आला आहे. याविषयी ‘किसान काँग्रेस’च्या वतीने तीव्र आंदोलन करण्याची चेतावणी महावितरण आस्थापनाला देण्यात आली आहे. तसे निवेदन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना देण्यात आले आहे.

निवेदनामध्ये म्हटले आहे की, महावितरणकडून ग्राहकांवर बळजोरी चालू आहे. हा प्रकार म्हणजे कायदा आणि ग्राहक हक्क यांचा भंग आहे. ग्राहकांचे विद्यमान मीटर सदोष असल्याचे अधिकृतरित्या सिद्ध झाल्याविना ते पालटण्याचा कायदेशीर अधिकार महावितरणला नाही, तसेच ग्राहकाची लेखी संमती न घेता बळजोरी करणे, ही ‘ग्राहक संरक्षण कायदा २०१९’अंतर्गत अयोग्य व्यापारी प्रथा आहे, तसेच ग्राहकांच्या अनुमतीविना खासगी मालमत्तेत प्रवेश करून मीटर पालटण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधित कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर भारतीय न्याय संहितेनुसार अनधिकृत प्रवेशाचा गुन्हा नोंद करण्यात येऊ शकतो. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य ग्राहक यांच्या घरातील सुस्थितीतील वीज मीटर त्यांच्या लेखी अनुमतीविना काढण्याचे धाडस कुणी करू नये, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.

संपादकीय भूमिका

अशी चेतावणी का द्यावी लागते ? ‘महावितरण’ सर्व बाजूंनी अभ्यास करून ग्राहकांना विश्वासात घेऊन निर्णय का घेत नाही ?