काँग्रेसशासित तेलंगाणामध्ये मध्यरात्री हटवला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा !

अनुमतीविना पुतळा बसवण्यात आल्याचा प्रशासनाचा दावा

भाग्यनगर (तेलंगाणा) – येथील नेरेडमेट भागात १८ जूनच्या मध्यरात्री महानगरपालिकेने पोलीस बंदोबस्तात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याची कारवाई केली. प्रशासनाचे म्हणणे आहे की, हा पुतळा आवश्यक अनुमतीविना बसवण्यात आला होता. क्रेनच्या साहाय्याने पुतळा हटवून दुसर्‍या जागी नेण्यात आला. स्थानिक लोक आणि समर्थक यांचे म्हणणे आहे की, अशा प्रकारे मध्यरात्री कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत कारवाई केल्याने लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत अन् प्रशासनाने आधी संवादाचा मार्ग अवलंबायला हवा होता.

या कारवाईच्या वेळी काही लोकांनी पुतळा हटवण्यास विरोध केला आणि घटनास्थळी जमा होऊन कारवाई थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत काही लोकांना कह्यात घेतले. काही काळ या परिसरात तणावाचे वातावरण होते. सध्या नेरेडमेटमधील परिस्थिती शांततापूर्ण असल्याचे सांगितले जात आहे; परंतु या कारवाईविषयी स्थानिक पातळीवर असंतोष आहे.

प्रशासनाने सांगितले की, पुतळा सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आला असून पुढील कारवाई कायद्यानुसार केली जाईल.

जानेवारीमध्येही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला होता !

ही घटना नवीन नाही. जानेवारी २०२६ मध्येही नेरेडमेटच्या विनायक नगर भागात अनुमतीविना उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत पोलिसांनी कारवाई केल्याने वाद निर्माण झाला होता.

संपादकीय भूमिका

  • तेलंगाणामध्ये अनुमतीविना आणखी कोणतीच घटना घडलेली नाही, असेच धरून प्रशासनाने ही कारवाई अत्यंत तत्परतेने केली आहे का ?
  • येथे अनुमतीविना टिपू सुलतान याचा पुतळा बसवण्यात आला असता, तर प्रशासनाने अशीच तत्परतेने कारवाई केली असती का ?