ऑस्ट्रेलियामध्ये खलिस्तानवाद्यांकडून हिंदु ब्राह्मणांनी शिखांना जाळल्याचा दुष्प्रचार !

मेलबर्न – ब्रिटन आणि कॅनडा येथे हिंदूंच्या विरोधात दुष्प्रचार केल्यानंतर  खलिस्तानवाद्यांनी आता ऑस्ट्रेलियामध्ये हिंदूंच्या विरोधात दुष्प्रचार करण्यास आरंभ केला आहे. अलीकडेच खलिस्तानवाद्यांनी ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरात मोर्चा काढला होता. या मोर्च्यात एका वाहनावर, ‘वर्ष १९८४ मध्ये हिंदु ब्राह्मणांच्या जमावाने ६० हून अधिक निष्पाप शिखांना जाळून मारले’, असे लिहिले होते. याविषयीची छायाचित्रे सामाजिक माध्यमांत मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली आहेत. यामध्ये मोर्च्यात सहभागी झालेले खलिस्तानचा झेंडा घेऊन जात असतांना दिसत आहे. ‘ऑस्ट्रेलिया हिंदु मीडिया’ या ट्विटर खात्याने याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. ‘ऑस्ट्रेलिया हिंदु मीडिया’ने म्हटले आहे की, हा मोर्चा शांतीपूर्ण होता, तर त्याच्या आयोजकांनी स्वतःची ओळख का लपवली ? या मोर्च्यानंतर सामाजिक माध्यमांत हिंदूंनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका हिंदूने ‘पंजाबमध्ये खलिस्तानवाद्यांनी २० सहस्र हिंदूंची हत्या केली होती’, याची आठवण या वेळी करून दिली.

ऑस्ट्रेलियात खलिस्तानी कारवायांमध्ये वाढ !

ऑस्ट्रेलियामध्ये फुटीरतावादी खलिस्तानी सक्रीय झाले आहेत. काही दिवसांपूर्वी विक्टोरिया शहरातील गुरुद्वारामध्ये आयेजित कीर्तनाच्या वेळी खलिस्तानी झेंडे, टी-शर्ट आणि पुस्तिका वाटण्यात आल्या. ‘सिख फॉर जस्टिस’, या खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा नेता गुरुपतवंतसिंह पन्नू याने स्वतंत्र खलिस्तानसाठी ऑस्ट्रेलियामध्ये जनमत संग्रह घेण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये अनेक ठिकाणी स्वतंत्र खलिस्तानसाठी मोर्चे काढण्यात आले.

संपादकीय भूमिका

  • ब्रिटन, कॅनडा आणि अमेरिका या देशांनंतर आता ऑस्ट्रेलियातील खलिस्तानी कारवाया वाढल्या असतील, तर ते भारतासाठी निश्‍चित धोकादायक आहे !
  • जिहादी आतंकवाद्यांनतर आता खलिस्तानी आतंकवादीही हिंदूंना लक्ष्य करत आहेत. हे लक्षात घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी भारत सरकार काय पावले उचलणार ?
  • जिहादी आतंकवादी, नक्षलवादी, खलिस्तानी हे ब्राह्मणांना लक्ष्य करून हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा हा डाव उधळवून लावण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटनाशिवाय पर्याय नाही !