पाणीटंचाईची समस्या मांडतांना विषय भरकटल्याने सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नगरसेवक समोरासमोर

ए आय निर्मित चित्र

पुणे – पाऊस लांबल्याने पुण्याला पाणीपुरवठा करणार्‍या धरणामध्ये पाणीसाठा न्यून राहिला आहे. त्यामुळे उपलब्ध पाणी काटकसरीने वापरणे आवश्यक असल्याने शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा होतो; मात्र महापालिकेने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार पाणी न येणे, गढूळ पाणी येणे, अल्पकाळासाठी पाणी येणे यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेच्या मुख्य सभेत नगरसेवकांनी पाणी प्रश्नावर त्यांच्या भागांतील समस्या मांडल्या; मात्र कोंढव्यातील शरदचंद्र पवार गटाचे नगरसेवक गफूर पठाण यांनी कोंढव्यातील पाणीटंचाईची समस्या मांडतांनाच बोपोडी येथील दर्ग्यावर महापालिकेने कारवाई केल्याचे सूत्र उपस्थित केले. यावर सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षातील नगरसेवक समोरासमोर आले.

विरोधक गोंधळ घालत असतांना महापालिकेची सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली. सर्वसाधारण सभेत झालेल्या या प्रकाराच्या विरोधात विरोधी पक्षाचे नगरसेवक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आंदोलन करणार असल्याची चेतावणी त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. विरोधी नगरसेवकाचा मुद्दा पटला नाही, तर जागेवर थांबून त्यास विरोध करावा. महापालिकेच्या सभागृहात सर्व नगरसेवकांनी शिस्तीत वागावे. आयुक्तांकडून पाणीटंचाई संदर्भात खुलासा होणार होता; मात्र तो होऊ शकला नाही याचे वाईट वाटते, असे महापौर सौ. मंजुषा नागपुरे यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

  • पाणीटंचाईवर तोडगा काढायचा सोडून वादग्रस्त विषय सर्वसाधारण सभेत उपस्थित करून सभा भरकटवणार्‍यांना योग्य समज देणार का ?
  • जनतेच्या समस्यांवर उपाय शोधण्यापेक्षा धार्मिक आणि वादग्रस्त मुद्दे उपस्थित करून वेळ वाया घालवणार्‍या नगरसेवकांना जनतेने पुन्हा निवडून द्यायचे का ? हे ठरवावे !