नाशिक येथे बाजारातून विषारी भेसळयुक्त तुपाची विक्री थांबली !

अन्न व औषध प्रशासनाच्या धडक कारवाईचा परिणाम !

नाशिक – अन्न व औषध प्रशासनाचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वारंवार घातलेल्या धाडींमुळे बाजारातून भेसळयुक्त पनीरसह ‘शुद्ध’ नावाखाली विकले जाणार्‍या भेसळयुक्त तुपाची विक्री अचानक थांबली आहे. आतापर्यंत ‘शुद्ध तुपा’च्या नावाखाली आपण कोणते विष घेत होतो ?’ असा संतप्त प्रश्न जनतेला पडला आहे.

स्वस्त असणारे आणि सहज घट्ट होणारे पाम तेल अन् सोयाबीन तेल यांचे मिश्रण करून त्यात तुपासारखा दिसणारा पिवळा रंग मिसळला जात असे, तसेच तुपाचा सुगंध येण्यासाठी त्यात अत्यंत घातक रसायने वापरली जात होती. कारवाई टाळण्यासाठी या बरण्यांवर कोणत्याही आस्थापनाचे नाव, अन्न सुरक्षा परवाना क्रमांक किंवा तूप वापरण्याची अंतिम मुदत नसायची. बाजारात चांगल्या दर्जाचे तूप ६०० ते ६५० रुपये किलो असतांना हे विषारी कृत्रिम तूप अवघ्या ४५० रुपये किलो शुल्काने स्थानिक किराणा आणि टपरीवजा दुकानांमधून ग्राहकांच्या माथी मारले जात होते.

ग्राहकांनो, सतर्क रहा आणि तक्रार करा !

ज्या बरण्यांवर आस्थापनाचे नाव, बांधणीचा दिनांक आणि परवाना क्रमांक नाही, असे उत्पादन खरेदी करू नये, तसेच काही संशयास्पद आढळल्यास तात्काळ अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

संपादकीय भूमिका

भेसळयुक्त तूप विकून ग्राहकांच्या आरोग्याविषयी असंवेदनशील असणार्‍यांवर कारवाई व्हायला हवी !