महाराष्ट्रात लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि धर्मांतरबंदी कायदा त्वरित लागू करावा ! – वारकर्‍यांची एकमुखाने मागणी

  • आळंदी येथील भव्य १६ वे वारकरी महाअधिवेशन

  • गड आणि दुर्ग यांवरील अतिक्रमणे त्वरित हटवण्याची मागणी !

व्यासपिठावर उपस्थित संत, वारकरी महाराज आणि हिंदुत्वनिष्ठ

आळंदी (जिल्हा पुणे), २३ नोव्हेंबर (वार्ता.) – इंग्रजांनी वैदीक सनातन शिक्षणव्यवस्था मोडून मॅकोले प्रणित शिक्षणव्यवस्था चालू केली, तसेच भारतात वर्णद्वेष चालू केला. त्यामुळे हिंदूंनी पक्ष आणि जाती यांमध्ये न अडकता संघटित झाले पाहिजे, असे मार्गदर्शन पू. श्री अमृताश्रम स्वामी महाराज (दंडी स्वामी) यांनी येथे आयोजित केलेल्या वारकरी महाअधिवेशनात केले.

उपस्थित वारकरी

आळंदी येथे २१ नोव्हेंबर या दिवशी येथील श्री देविदास धर्मशाळा तथा वै. मामासाहेब दांडेकर स्मृती मंदिर, गोपाळपुरा येथे श्री संत ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त राष्ट्रीय वारकरी परिषद आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भव्य राज्यव्यापी १६ वे वारकरी महाअधिवेशन’ प्रेरणादायी आणि भावपूर्ण वातावरणात पार पडले. या अधिवेशनात वारकर्‍यांनी लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि धर्मांतरबंदी कायदा त्वरित करावा अन् गड आणि दुर्ग यांवरील अतिक्रमणे त्वरित हटवावी, असा एकमुखी निर्धार केला.

सूत्रसंचालन राष्ट्रीय वारकरी परिषदेचे मुख्यप्रशासक ह.भ.प. अरुण महाराज पिंपळे यांनी केले, तर प्रास्ताविक राष्ट्रीय वारकरी परिषदेचे प्रवक्ते ह.भ.प. निवृत्ती महाराज हल्लाळीकर यांनी केले. पसायदानाने अधिवेशनाची सांगता झाली.

ह.भ.प. निवृत्ती महाराज हल्लाळीकर

विशेष…

या वेळी अधिवेशनात कृतीशील असणार्‍या राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या नगर जिल्ह्यातील सदस्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.


महाअधिवेशनात राष्ट्रीय वारकरी परिषदेचे ह.भ.प. बापू महाराज रावकर यांनी वाचन केलेले ठराव

सर्व तीर्थक्षेत्री मद्य आणि मांस विक्रीवर बंदी घालावी, पंढरपूर येथील चंद्रभागा आणि आळंदी येथील इंद्रायणी नदीत सांडपाणी सोडण्यास बंदी घालावी, सर्व मंदिरे सरकारच्या कह्यातून मुक्त करावीत, महाराष्ट्रात गोसंवर्धन आयोगाची स्थापना करण्यात यावी, हलाल शिक्का असलेल्या उत्पादनांवर बहिष्कार घालावा, बिअरबार आणि मद्य यांच्या दुकानांना हिंदु देवतांची नावे देण्यात येऊ नयेत, असा महाराष्ट्र शासनाने कायदा केला, त्याची कार्यवाही करावी, संत साहित्यांचा शालेय आणि महाविद्यालये यांच्या अभ्यासक्रमात समावेश करावा, यांसह १६ ठराव अधिवेशनात संमत करण्यात आले.

या ठरावांचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.


घोषणा

महाअधिवेशनात सनातन वैदीक हिंदु धर्म की जय, जयतु जयतु हिंदु राष्ट्रम, हर हर महादेव, सियाराम चंद्रकी जय, पवनसुत हनुमान की जय, वन्दे मातरम्, छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारतमाता की जय, अशा वारकर्‍यांनी दिलेल्या घोषणांमुळे संपूर्ण आळंदी परिसर दणाणून गेला.


संत आणि महंत यांचे मार्गदर्शन…

१. ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ, विश्वस्त विठ्ठल रुक्मिणी संस्थान, पंढरपूर.

ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ

हिंदूंवरील आघातांच्या विरोधात हिंदू जागृत न झाल्यास, तर त्यांना काळ क्षमा करणार नाही. गोहत्या बंदी कायदा झालाच पाहिजे. गोशाळेच्या पाठीशी उभे राहून हिंदूंनी स्वतःची ताकद दाखवून दिली पाहिजे. भारताची संस्कृती विश्वात वंदनीय आहे. तिचा प्रचार केला पाहिजे.

२. पू. श्री द्वाराचार्य डॉ. रामकृष्णदासजी महाराज लहवितकर

पू. श्री द्वाराचार्य डॉ. रामकृष्णदासजी महाराज लहवितकर

ख्रिश्चनामध्ये पाद्री आणि मुसलमानातील मौलवी हे मर्यादा ओलांडून त्यांच्या धर्माच्या विरोधात कोणतेही कृत्य करत नाहीत. कीर्तनकारांनी संप्रदायाची आचारसंहिता बाळगून कीर्तनातून धर्माचे ज्ञान दिले पाहिजे. शालेय अभ्यासक्रमात संतवाङ आणि धर्मशास्त्र अभ्यासक्रमाचा समावेश केला पाहिजे. देशाला संस्कारांची आवश्यकता आहे. सद्यःस्थितीत नुसते अभियंता आणि आधुनिक वैद्य होण्यासमवेत धर्माचे कार्य आणि धर्मरक्षण करणारे हिंदु हवेत.

३. ह.भ.प. मारुति महाराज तुंनतुने शास्त्री, अध्यक्ष, राष्ट्रीय वारकरी परिषद

ह.भ.प. मारुति महाराज तुंनतुने शास्त्री

देशात लव्ह जिहाद आणि गोहत्या बंदीचा कायदा झाला पाहिजे. गायींची हत्या करणारे पशूवधगृहे बंद करावीत.

४. हिंदु भूषण श्री श्यामजी महाराज

हिंदु भूषण श्री श्यामजी महाराज

पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात साधूंची हत्या करणार्‍यांना शिक्षा झाली पाहिजे. पालघर येथे हिंदु आदिवासी लोकांना आमिषे दाखवून त्यांचे धर्मांतर करण्याचे षडयंत्र योजनाबद्धपद्धतीने चालू आहे. धर्मांतराविषयी पुढारी लोक काही बोलणार नाहीत. जेव्हा सज्जन लोक मौन बाळगतात आणि शांत रहातात, तेव्हा राष्ट्राची हानी होते. धर्मांतर, हिंदु धर्म आणि हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात हिंदूंनी संघटित होऊन विरोध केला पाहिजे.

५. ह.भ.प. जनार्दन मेटे महाराज

आम्ही अनेक गावांतील मुलांना संघटित करून हनुमान चालिशाचे पठण चालू केले आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून इतरांनी अशा पद्धतीने हनुमान चालिशाचे पठण चालू करू शकतो.

६. ह.भ.प. नारायण महाराज

ह.भ.प. नारायण महाराज

सर्व कीर्तनकार आणि महाराज मंडळी यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांच्या कीर्तनातून महाअधिवेशनातील विषय १५ मिनिटे तरी मांडावेत. हिंदूंनी हिंदूंच्या दुकानात वस्तूंची खरेदी केली पाहिजे. हिवाळी अधिवेशनाच्या वेळी सर्वांनी नागपूर येथे यावे. तेथे मुख्यमंत्र्यांना या सर्व विषयांचे निवेदन देऊ.

७. ह.भ.प. कोकरे महाराज

ह.भ.प. कोकरे महाराज

जोपर्यंत हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात हिंदू विरोध करत नाहीत, तोपर्यंत क्रांती होणार नाही. जिजामाता पेटून उठल्याने क्रांती झाली. अशा पद्धतीने अनेक जिजामाता पेटून उठायला हव्यात. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी संघटित होऊन कार्य केल्यास देशात परिवर्तन घडवू शकतो.

८. योगीदत्तनाथ महाराज

योगीदत्तनाथ महाराज

१६ जिहादच्या माध्यमातून हिंदूंचा छळ आणि त्यांची संपत्ती हडप करण्याचे कारस्थान चालू झाले आहे. या जिहाद्यांना हिंदूंनी कडाडून विरोध केला पाहिजे. हिंदु मालकीच्या अनेक ठिकाणी असलेल्या भूमी वक्फ मंडळ स्वतःच्या कह्यात घेत आहे. हिंदु जागृत नसल्यामुळे अशा घटना घडत आहेत. हिंदु देवतांचे विडंबन आणि टीका करणार्‍यांना कडाडून विरोध करावा. कीर्तनातून कीर्तनकरांनी हिंदु धर्म आणि हिंदु यांच्यावर होणार्‍या अत्याचारांची माहिती दिली पाहिजे.

९. श्री. मिलिंद एकबोटे, हिंदुत्वनिष्ठ

श्री. मिलिंद एकबोटे

महाराष्ट्रात गोसंवर्धन आयोग स्थापना केली पाहिजे. गोहत्या बंदी आणि ‘लव्ह जिहादविरोधी’ कायदा झाला पाहिजे. हिंदूंवर अनेक संकटे येत असल्याने त्या विरोधात हिंदूंनी संघटित झाले पाहिजे.

१०. सामाजिक कार्यकर्ते श्री. विजय वरूडकर

सामाजिक कार्यकर्ते श्री. विजय वरूडकर

सरकार हे गायीला मानणारे आहे. त्यामुळे महाराष्ट्रात गोसंवर्धन आयोगाची स्थापना झाली पाहिजे.

११. श्री. सुनील घनवट, संघटक, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य, हिंदु जनजागृती समिती

श्री. सुनील घनवट

छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाच्या ठिकाणी इस्लामिक अतिक्रमण होणे, हे मोगलांचे उदात्तीकरण आणि छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा अपमानच आहे. आता शासनाने सर्वच गडदुर्गांवर झालेले इस्लामी अतिक्रमण हटवले पाहिजे. आज संपूर्ण देशामध्ये ‘हलाल जिहाद’च्या माध्यमातून समांतर इस्लामी अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे षड्यंत्र चालू आहे. तरी सर्व हिंदूंनी हलाल उत्पादनांवर बहिष्कार टाकून हलाल जिहाद आणि उत्पादने ही देशातून हद्दपार करण्यासाठी संघटित होणे आवश्यक आहे, तसेच लव्ह जिहाद, गोहत्या बंदी, वक्फ बोर्ड कायदा, धर्मांतर असे हिंदु धर्मावर होणारे आघात रोखायला हवेत. हिंदु धर्माचे रक्षण होण्यासाठी हिंदूंनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कृतीशील होऊन प्रयत्न करावेत. हिंदूंना विविध आघातांपासून जागृत करण्यासाठी हे महाअधिवेशन घेतले जात आहे. लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा होण्याच्या मागणीसाठी नागपूर येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी केले.

१२. हिंदु रणरागिणीच्या कु. क्रांती पेटकर

कु. क्रांती पेटकर

‘लव्ह जिहाद’चे गंभीर परिणाम ओळखून हिंदु तरुणी आणि महिला यांनी सावध झाले पाहिजे. तरुणीने स्वतःचे रक्षण करण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेतले पाहिजे, तसेच धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण केल्यास लव्ह जिहादाला हिंदु तरुणी बळी पडणार नाहीत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी गौरवोद्गार काढणारे हिंदु भूषण श्री श्यामजी महाराज आणि ह.भ.प. कोकरे महाराज

हिंदु भूषण श्री श्यामजी महाराज म्हणाले, ‘‘समाजात हिंदु जनजागृती समिती धर्मरक्षण आणि हिंदुत्वाचे कार्य करत आहेत. त्यांच्या या कार्याला सर्वांनी पाठिंबा देऊन हिंदूंनी धर्मरक्षणार्थ सिद्ध झाले पाहिजे.’’

ह.भ.प. कोकरे महाराज म्हणाले, ‘‘हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्रोत परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी हिंदु धर्म आणि हिंदूंवर होणार्‍या अन्यायाच्या विरोधात संस्थेची स्थापना करून हलालसारखे विषय सर्वांसमोर आणले. सरकारच्या कह्यातून अनेक मंदिरे सोडवण्याचा प्रयत्न केला. मंदिरांवरील अतिक्रमण हटवण्याचा प्रयत्न केला. यावरून मी या संस्थेविषयी हे समजतो की, भगवंताने मृत्यूलोकांमध्ये हिंदूंच्या समस्या सोडवण्यासाठी पृथ्वीतलावर उघडलेले कार्यालय म्हणजे हिंदु जनजागृती समिती आहे.’’