महाराष्ट्रातील ‘लव्ह जिहाद’च्या वाढत्या घटनांविषयी राज्य महिला आयोगाचे मौन !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – वसई येथील श्रद्धा वालकर या हिंदु युवतीच्या देहाचे ३५ तुकडे करून तिची क्रूर हत्या, ऑक्टोबर २०२२ मध्ये चेंबूर येथील रूपाली चंदनशिवे या महिलेची भररस्त्यात गळा चिरून हत्या, तसेच राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या आकडेवारीनुसार देशाभरात महाराष्ट्रात महिलांची झालेली सर्वाधिक तस्करीची प्रकरणे, यांतून प्रकर्षाने ‘लव्ह जिहाद’चा प्रकार पुढे येत असूनही याविषयी मात्र महिला आयोगाने मौन बाळगले आहे.

कुंकू लावण्यास सांगितल्यामुळे महिला पत्रकाराचा अपमान झाल्याचे नमूद करत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पू. संभाजी भिडेगुरुजींना नोटीस पाठवली होती; मात्र वरील घटनांमध्ये महिलांवर क्रूर अत्याचार झाले असतांना याविषयी राष्ट्रीय महिला आयोगाकडे पाठपुरावा करणारे गुळमुळीत धोरण राज्य महिला आयोगाने घेतले आहे. (‘कुंकू लावणे ही भारतीय संस्कृती असतांना ते लावायला सांगितल्यावर अपमान होतो’, असे वाटणार्‍या महिला आयोगाला महिलांची तस्करी होऊन त्यांना वेश्या व्यवसायाला लावणे, हा अपमान वाटत नाही का ? प्रखर हिंदुत्वनिष्ठ असलेले पू. भिडेगुरुजी यांना नोटीस पाठवायची; मात्र श्रद्धा आणि रूपाली यांची हत्या करणारे मुसलमान आहेत; म्हणून ‘मूग गिळून गप्प रहायचे’, असे महिला आयोगाचे धोरण आहे का ? – संपादक)

‘कुंकू’ प्रकरणात पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्यासारख्या प्रखर राष्ट्रप्रेमी व्यक्तीला महिला आयोगाने थेट नोटीस पाठवली आहे; मात्र श्रद्धा वालकर हत्याप्रकरणात प्रसारित केलेल्या व्हिडिओमध्ये आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी धर्मांध आरोपीचे साधे नावही घेण्याचे धारिष्ट्यही दाखवलेले नाही. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या आकडेवारीनुसार मागील वर्षभरात महाराष्ट्रातील ८५६ युवतींना देहव्यापारात अडकवण्यात आले आहे. या युवती आणि अल्पवयीन मुलींची तस्करी करण्यात आली आहे. यांतील काही युवतींसमवेत बळजोरीने लग्न करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत. महिलांची तस्करी करण्यात संपूर्ण भारतात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. घरच्या गरिबीचा अपलाभ घेऊन यांतील काही युवतींना विकत घेऊन कुंटणखान्यात पाठवण्यात आले. एवढेच नाही, तर या तरुणींविषयी पोलीस, महिला आणि बाल कल्याण विभाग, गृहमंत्रालय, प्रशासकीय विभाग कुणीही गांभीर्य दाखवत नाही.

महिलांच्या तस्करीमध्ये महाराष्ट्र क्रमांक १ वर पोचण्याएवढी गंभीर स्थिती असतांनाही ‘यामध्ये ‘लव्ह जिहाद’ आहे का ?’ याचे साधे अन्वेषण करण्याचा आदेशही महिला आयोगाने दिलेला नाही. काही दिवसांपूर्वी आझाद मैदान परिसरात सेंट झेवियर्स हायस्कूलजवळील पथमार्गावर झोपलेल्या कुटुंबातील २ मासांच्या मुलीला पळवणार्‍या महंमद हनीफ शेख याला पोलिसांनी अटक केली. या सर्व घटनांमध्ये ‘हिंदु युवतींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांना वाममार्गाला लावण्याचे लव्ह जिहादचे षड्यंत्र चालू आहे’, असा आरोप काही हिंदुत्वनिष्ठ संघटना करत आहेत; मात्र कुंकू लावल्यामुळे महिलांचा अपमान होतो; म्हणून नोटीस पाठवणार्‍या, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरील महिलेच्या विनयभंगाच्या गुन्ह्याविषयी अहवाल सादर करण्याचा आदेश ठाणे पोलीस आयुक्तांना देणार्‍या महिला आयोगाने महाराष्ट्रातील या गंभीर प्रकरणांविषयी मात्र पोलीस किंवा प्रशासन यांना ना नोटीस पाठवली, ना अन्वेषणाचा आदेश दिला आहे. या सर्व प्रकारांमुळे महिला आयोगाच्या कारभाराविषयी प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे.

लव्ह जिहादच्या घटनांकडे महिला आयोगाने आता तरी लक्ष घालावे ! – डॉ. (सौ.) दीक्षा पेंडभाजे, मुंबई समन्वयक, रणरागिणी शाखा, हिंदु जनजागृती समिती

‘श्रद्धा वालकर हिच्या देहाचे तुकड करणारा ‘आफताब’ आणि बुरखा घालत नाही; म्हणून भररस्त्यात रूपाली चंदनशिवे हिचा गळा चिरणारा ‘इक्बाल शेख’ या प्रकरणांमध्ये ‘लव्ह जिहाद’ स्पष्ट होत आहे. मुसलमानेतर युवतींना जिवानिशी मारले जात आहे. वडीलकीच्या नात्याने महिला पत्रकाराला कुंकू लावण्यास सांगणार्‍या पू. भिडेगुरुजी यांना विनाविलंब नोटीस पाठवणारा महिला आयोग याकडे मात्र डोळेझाक करत आहे. राज्य महिला आयोगाने आता तरी याकडे लक्ष द्यावे. येत्या अधिवेशनात ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा होण्यासाठी महिला आयोगाने शासनाकडे पाठपुरावा करायला हवा’, अशी प्रतिक्रिया डॉ. (सौ). दीक्षा पेंडभाजे यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केली.

राज्य महिला आयोग व्यक्ती आणि पक्ष पाहून काम करतो ! – आमदार नीतेश राणे, भाजप

‘राज्य महिला आयोग व्यक्ती आणि पक्ष पाहून काम करत आहे. त्यामुळे त्यांच्याकडून कुणालाही न्यायाची अपेक्षा ठेवता येणार नाही’, अशी प्रतिक्रिया आमदार नीतेश राणे यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केली.