गृहपाठ न केल्याने शिक्षिकेने विद्यार्थ्याला केले रक्तबंबाळ : गुन्हा नोंद !

रेवा (मध्यप्रदेश) – येथे इयत्ता तिसरीत शिकणार्‍या एका विद्यार्थ्याने गृहपाठ न केल्याने शिक्षिकेने त्याला अमानुष मारहाण केली. शिक्षिकेची तक्रार घेऊन आलेल्या विद्यार्थ्याच्या आईला विद्यालय व्यवस्थापनाने फटकारले आणि परत पाठवले. (अमानवी कृती करणार्‍या शिक्षिकेला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करणार्‍या विद्यालय प्रशासनालाही यासाठी उत्तरदायी ठरवून त्यांच्यावरही कारवाई का करू नये ? – संपादक) त्यामुळे आईने शिक्षिकेविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.
ही घटना रेवा येथील आनंद मार्ग विद्यालयातील आहे. मारहाणीमुळे विद्यार्थी रक्तबंबाळ झाला. त्याच्या अंगावर अनेक जखमाही झाल्या. पोलीस तक्रारीमध्ये विद्यार्थ्याच्या आईने सांगितले की, ‘आम्ही बाहेरगावी गेलो होतो. याविषयी विद्यालय प्रशासनाला कल्पनाही देण्यात आली होती; परंतु १८ ऑक्टोबर या दिवशी माझा मुलगा शाळेत गेला असता गृहपाठ न केल्याचे कारण देत लक्ष्मी कुंदर या शिक्षिकेने त्याला रक्तस्त्राव होईपर्यंत मारहाण केली.’ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद केला असून ते अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका

अशा शिक्षकांच्या विरोधात कठोर कारवाईच व्हायला हवी !