नवरात्रीचे बाजारीकरण थांबवा !

नवरात्री नवरात्रोत्सव नवरात्री२०२२ देवी दुर्गादेवी दुर्गा देवी #नवरात्री #नवरात्रोत्सव #नवरात्री२०२२ #देवी #दुर्गादेवी Navaratri Navratri Navaratrotsav Navratrotsav Durgadevi Durga Devi Devi #Navaratri #Navratri #Navaratrotsav #Navratrotsav #Durgadevi #Durga #Devi

नवरात्र म्हणजे पावित्र्य, मांगल्यतेचा संदेश देणारा उत्सव ! हा काळ भाविकांना देवीच्या आराधनेसाठी अत्यंत पूरक असतो. वस्तूत: हिंदूंचे प्रत्येक सण त्यातून प्रत्येकाने आनंद घेत ईश्वराच्या निकट कसे जायचे, ते शिकवतात. त्यामुळे नवरात्रातील प्रत्येक कृती अशी असणे अपेक्षित आहे की, ज्याद्वारे आपण देवीचे आशीर्वाद प्राप्त करू आणि त्याचा लाभ व्यष्टी अन् समष्टी स्तरांवरही होईल. सध्या याउलट परिस्थिती असून अनेक ठिकाणी नवरात्र म्हणजे नाच-गाणे, भपकेबाजपणा, दिखाऊपणा, ‘डिजे-डॉल्बी’ ध्वनीक्षेपक यांसारख्या अनेक अयोग्य गोष्टींचा शिरकाव झाल्याने उत्सवातील चैतन्य आणि सात्त्विकता हरवून गेली आहे.

नवरात्रीच्या निमित्ताने संभाजीनगर येथे ‘एल्.ई.डी.’ दिव्यांनी चमकणार्‍या १५० रुपये मूल्यांच्या २५ सहस्रांपेक्षा अधिक ‘चिनी दांडियां’ची आवक करण्यात आली आहे. शहरात नृत्य दिग्दर्शकांनी दांडियासाठीच्या २०० हून अधिक कार्यशाळा घेतल्या आहेत. ही केवळ संभाजीनगरची आकडेवारी असून जवळपास प्रत्येक शहरात अशा प्रकारच्या ‘एल्.ई.डी.’ने चमकणार्‍या सहस्रो ‘चिनी दांडियां’ची आवक झाली आहे. घरोघरी आणि गल्लोगल्ली चित्रपटगीते लावून दांडियाचा सराव केला जात आहे. पूर्वीच्या काळी दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव यांसह प्रत्येक सण अत्यंत आनंदात साजरा व्हायचा. हिंदु संघटित होण्याचे ते एक चांगले माध्यम आहे. हे उत्सव कसे साजरे व्हावेत ? याची काही नैतिक बंधने पाळत समाज त्यावर वचकही ठेवत असे. जसजसा काळ पुढे गेला, तसतसा त्यातील धार्मिकपणा न्यून होत, त्यात मनोरंजनात्मकता अधिक आली. उत्सवांकडे ‘इव्हेंट’ (उपक्रम) म्हणून पाहिले जाऊन त्याचीच जागा आता ‘एल्.ई.डी.’ दांडियासाख्या प्रकारांनी घेतली आहे. पारंपरिक लाकडी दांडियांना अल्प प्राधान्य देत हिंदूच चिनी ‘एल्.ई.डी.’ दांडिया वापरून आपल्याच देशातील चलन अलगदपणे शत्रूराष्ट्र असलेल्या चीनला देत आहेत.

हे सर्व प्रकार धर्मशिक्षण आणि राष्ट्रप्रेम यांच्या अभावामुळे घडत आहेत. हिंदूंच्या उत्सवांचे पावित्र्य राखण्याचे दायित्व समाजातील प्रत्येक घटकांवर आहे. समाजाने शास्त्र समजून घेऊन नवरात्रीत देवीची उपासना करण्यास प्राधान्य दिल्यास म्हणजेच धर्माचरण केल्यास उत्सवांना परत मूळ स्वरूप प्राप्त होईल ! ते होण्यासाठी श्री दुर्गामातेने हिंदूंना सद्बुद्धी द्यावी, हीच तिच्या चरणी प्रार्थना !

– श्री. अजय केळकर, सांगली