हत्या करण्यासाठी आणलेल्या ६ गायींची दौंड (पुणे) पोलिसांनी केली सुटका !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

दौंड (जिल्हा पुणे) – येथे हत्या करण्यासाठी आणलेल्या ६ गायींची सुटका पोलिसांनी केली आहे. गुरांना होणार्‍या लंपी त्वचारोगाच्या पार्श्वभूमीवर शहरात गुरांचे लसीकरण चालू असतांना खाटीक गल्लीत या गायींसाठी चारा, पाणी आणि औषधोपचार यांची कोणतीही सोय न करता बांधण्यात आले होते. या विषयी माहिती मिळताच पोलिसांनी मध्यरात्री घटनास्थळी जाऊन गायींची सुटका करून त्यांची गोशाळेत रवानगी केली. या प्रकरणी पोलीस अंमलदार रवींद्र काळे यांच्या तक्रारीनुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.दौंड पोलिसांनी ७ ऑगस्ट या दिवशी याच परिसरात केलेल्या कारवाईत ७ गायींची सुटका करत ७०० किलो गोमांस जप्त केले होते, तर २९ ऑगस्ट या दिवशी एका गायीची सुटका केली होती. (एकाच परिसरात अशाप्रकारे अनेकदा कारवाई होते; परंतु तेथील गायींची हत्या थांबत नाही, हे गंभीर आणि संतापजनक आहे. पोलीस हे सर्व कायमस्वरूपी थांबवण्यासाठी काय करणार ? हे गोप्रेमींना समजले पाहिजे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

महाराष्ट्रात प्रत्यक्षात गोहत्या बंदी न होणे, हे सवर्था पोलीस प्रशासन आणि शासन यांचे अपयश !

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा असूनही मोठ्या प्रमाणात त्याचे उल्लंघन होणे, हे चिंताजनक ! अशा प्रकारे कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांची शिक्षा वाढवणे आवश्यक आहे, असेच गोरक्षकांना वाटते.