विद्यार्थ्यांनी टिळा लावल्याने भडकलेल्या धर्मांध शिक्षकाने मंदिर बंद करण्यास भाग पाडले !

मिर्झापूर (उत्तरप्रदेश) येथील घटना !

हिंदूंचा द्वेष करत असल्याचा शिक्षकावर आरोप !

मिर्झापूर (उत्तरप्रदेश) – येथील लालगंजमध्ये असलेल्या बापू उपरौध महाविद्यालयामध्ये शिकणार्‍या काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी कपाळावर चंदनाचा टिळा लावल्याने महाविद्यालयाचे प्रभारी (तात्कालिक कार्यभार पहाणारे) प्राचार्य महंमद कासिफ त्यांच्यावर भडकले. या वेळी कासिफ यांनी महाविद्यालयाच्या परिसरात असलेले मंदिर बंद करण्यास भाग पाडले. ही घटना ८ सप्टेंबरची असून त्यानंतर पुढील ३ दिवस मंदिर बंद राहिले. प्रधान प्राचार्य धर्मजीत सिंह परतल्यावर त्यांना पुजार्‍याने घडलेला प्रकार सांगितला. सिंह यांनी ‘घटनेची चौकशी करून कासिफ यांच्यावर कारवाई करण्यात येईल’, असे आश्‍वासन दिले आहे.

१. प्रधान प्राचार्य धर्मजीत सिंह यांच्या अनुपस्थितीमध्ये महंमद कासिफ या शिक्षकाकडे प्राचार्य म्हणून कार्यभार होता.

२. पुजार्‍याने, ‘कसिफ यांनी मंदिर बंद ठेवण्याचा आदेश दिल्याने गेल्या ५० वर्षांत प्रथमच मंदिर बंद राहिले’, असे सांगितले.

३. पुजार्‍याने आरोप केला की, महंमद कासिफ त्याला म्हणाले की, ज्या दिवशी माझ्याकडे महाविद्यालयाचा कार्यभार असतो, त्या वेळी महाविद्यालयाची वेळ संपल्यानंतरच मंदिर उघडावे. तोपर्यंत ते बंद ठेवण्यात यावे.

४. घटनेची माहिती मिळताच विश्‍व हिंदु परिषदेचे कार्यकर्ते घटनास्थळी पोचले. त्यांनी या घटनेचा निषेध नोंदवला. ‘कासिफ हे हिंदूंचा द्वेष करतात’, असा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला.

५. विश्‍व हिंदु परिषदेसमवेत स्थानिक लोकांनी धर्मपाल सिंह यांच्याकडे कासिफ यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कसिफ यांनी मात्र त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

संपादकीय भूमिका

अशी घटना घडायला हा भारत आहे कि पाकिस्तान ? हिंदूंमधील संघटितपणाच्या अभावामुळेच कुणीही उठतो आणि हिंदूंचे मंदिर बंद पाडतो. हे हिंदूंसाठी लज्जास्पद !