संसदेत ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात विधेयक मांडणार ! – डॉ. अनिल बोेंडे, खासदार, भाजप

अमरावती – ‘आंतरधर्मीय विवाह कायद्यात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे पुष्कळ प्रमाणात समोर येत आहेत. त्यामुळे ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात संसदेच्या येत्या हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडणार आहे’, अशी माहिती भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी येथे १७ सप्टेंबर या दिवशी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना दिली.

डॉ. अनिल बोंडे म्हणाले की,

१. अमरावती येथील उमेश कोल्हे हत्याकांडामधील आरोपी ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहित करत होता. त्याने इंदूर येथून एक मुलगी पळवून आणली होती.

२. मेळघाटामधील मुलींना प्रलोभने किंवा धमक्या देऊन पळवून नेण्यात येते. बनावट संस्था विवाह लावून देतात. यात खोटा मौलवी उभा केला जातो.

३. अमरावती येथील जी मुलगी पळून गेली होती, त्या मुलीच्या आई-वडिलांनी रडतच मला दूरभाष केला होता. ‘आमच्या मुलीला शोधा’, अशा विनवण्या त्यांच्याकडून करण्यात येत होत्या.

४. त्यानंतर ते खासदार नवनीत राणा यांच्याकडे गेले. राणा या पोलीस ठाण्यात गेल्या. त्यांनी जर पोलिसांना यासंदर्भात जाब विचारला असेल, तर त्यात वावगे काय ?

५. गेल्या काही दिवसांपूर्वी अमरावती येथील मुलगी पश्‍चिम महाराष्ट्रात सापडली होती. ती मुलगी सातारा येथे कशी सापडली ? कुणाच्या साहाय्याने पोलिसांना ती सापडली ? ज्या मुसलमान मुलाला कह्यात घेण्यात आले होते, त्याच मुलाच्या भ्रमणभाषमध्ये ती कुठे आहे हे कळले. हे सर्व समोर आणले पाहिजे.

६. ‘लव्ह जिहाद’ हे सुनियोजित कटकारस्थान आहे. अमरावती येथील उमेश कोल्हे हत्याकांडानंतर ज्या आरोपीला पडकण्यात आले, त्याचाही ‘लव्ह जिहाद’ प्रकरणात हात होता, हे सिद्ध झाले आहे.

७. मेळघाट येथील आदिवासी मुलींना फसवून पळवून आणले जाते. मुलींनी विरोध केला, तर त्यांना जीवही गमवावा लागतो.

संपादकीय भूमिका

डॉ. अनिल बोंडे यांचे अभिनंदन ! हिंदूंच्या मुळावर उठलेल्या ‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्राच्या विरोधात केंद्र सरकारकडून राष्ट्रव्यापी कायदा बनवण्याची आवश्यकता आहे, असे समस्त हिंदु जनतेला वाटते !