परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने साधकाचे स्वतःच्या साधनेविषयी झालेले चिंतन !

‘एकदा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. मी त्यांना आत्मनिवेदन करत असतांना त्यांनी तिथे उपस्थित साधकांना ५ – ६ वेळा श्वास घेण्यास सांगितले. त्यांनी साधकांना विचारले, ‘‘काही सुगंध येतो का ?’’ त्यांनी उपस्थित साधकांना वातावरणातील सुगंध अनुभवायला सांगितला. तेव्हा माझे पुढीलप्रमाणे चिंतन झाले.

श्री. अशोक दहातोंडे

१. ‘सुगंध येणे’ ही पृथ्वीतत्त्वाशी संबंधित अनुभूती असणे आणि त्या संदर्भात अल्पसंतुष्ट न रहाता पुढील साधना तळमळीने करायची आहे’, याची जाणीव होणे

‘बोलतांना सुगंध येणे’, ही पृथ्वीतत्त्वाशी संबंधित अनुभूती आहे. परात्पर गुरु डॉक्टर मला या अनुभूतीच्या माध्यमातून जाणीव करून देत आहेत, ‘माझा पृथ्वीतत्त्वापर्यंत साधनेतील प्रवास झाला आहे. मला आप, तेज, वायू आणि आकाश या तत्त्वांपर्यंतचा अन् त्याही पुढचा प्रवास करायचा आहे. पुष्कळ पुढे जायचे आहे. ‘सुगंध येणे’ ही पृथ्वीतत्त्वाशी संबंधित अनुभूती आल्यानंतर अल्पसंतुष्ट होऊन मला तिथेच अडकून रहायचे नाही. मला पुढे पुढे जाण्यासाठी झोकून देऊन आणि तळमळीने साधनेचे प्रयत्न चालूच ठेवायचे आहेत.’

२. काही कारण नसतांना खांद्यावर पाण्याचा थेंब पडणे आणि ‘या पाण्याच्या थेंबाच्या माध्यमातून आपतत्त्वाकडे साधनेचा प्रवास चालू झाला’, असा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आशीर्वाद दिला’, असे वाटून त्यांच्याप्रती  कृतज्ञता व्यक्त होणे

दुसर्‍या दिवशी आश्रमात वावरतांना वरून पाण्याचा मोठा थेंब माझ्या खांद्यावर पडला. ‘मी वर पाहिल्यावर माझ्या खांद्यावर पाण्याचा थेंब पडावा’, असे काही कारण मला दिसले नाही. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘सकाळी निवासस्थानी असतांना परात्पर गुरु डॉक्टरांनी मला वरील विचारांच्या माध्यमातून पृथ्वीतत्त्वापर्यंत पोचल्याची जाणीव करून दिली. आता ‘पाण्याच्या थेंबाच्या माध्यमातून माझा आपतत्त्वाकडे साधनेचा प्रवास चालू होत आहे’, असा त्यांनी आशीर्वाद देऊन मला त्याची जाणीव करून दिली. त्या वेळी मला पुष्कळ कृतज्ञता वाटून माझी भावजागृती झाली.

‘गुरुमाऊली, आपण करत असलेल्या अनंत कोटी कृपेसाठी आणि माझ्याकडून हे लिहून घेतले’, याबद्दल मी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. अशोक शांताराम दहातोंडे, देहली सेवाकेंद्र (१७.२.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक