संभाजीनगर येथे तक्रारीची नोंद न घेतल्याने पोलीस आयुक्तालयात महिलेने पेटवून घेतले !

संभाजीनगर – तक्रारीची योग्य नोंद घेऊन कारवाई होत नसल्याच्या कारणावरून संतापलेल्या सविता काळे (वय ३२ वर्षे) नावाच्या महिलेने थेट पोलीस आयुक्तालयात पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. १ सप्टेंबर या दिवशी दुपारी १ वाजता ही घटना घडली. घटनेनंतर बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी धाव घेत आग विझवली. सध्या या महिलेवर घाटी रुग्णालयात उपचार चालू आहेत. या घटनेने पोलीस विभाग हादरून गेला आहे. या घटनेनंतर सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी घाटी रुग्णालयात महिलेला पहाण्यासाठी आले. सविता काळे या जवळपास ५० टक्के भाजल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे पोलीस विभागातील काही पोलीस ठाण्यांचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.

काय आहे प्रकरण ?

गंगापूर तालुक्यातील मांडवा गावी रहाणार्‍या सविता काळे (वय ३२ वर्षे) यांचा काही दिवसांपूर्वी शेजार्‍यांसमवेत वाद झाला होता. शिवाय वैयक्तिक कौटुंबिक वादामुळे सविता त्रस्त होत्या. वारंवार होणार्‍या वादामुळे सविता यांनी वाळूज पोलीस ठाण्यात जाऊन न्याय देण्याची मागणी केली होती. वारंवार मागणी करूनही तिच्या वैयक्तिक, तसेच परिसरातील वादाची योग्य नोंद घेतली नाही, अशी त्यांची तक्रार होती. न्याय मिळत नसल्याने त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.

संपादकीय भूमिका 

  • असंवेदनशील उत्तरदायी पोलिसांना आजन्म कारागृहात टाका !
  • तक्रारीची नोंद घेऊन कारवाई न करणार्‍या कर्तव्यच्यूत पोलीस कर्मचार्‍यांचे केवळ स्थानांतर न करता अशा पोलीस कर्मचार्‍यांवर बडतर्फीची कठोर कारवाईच हवी !