पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेले सामाजिक आणि धार्मिक कार्य

२६ ऑगस्ट २०२२ (आज) या दिवशी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन !

१. अहिल्यादेवी यांचा जन्म ते विवाह आणि राज्यकारभारातील सहभाग

महाराष्ट्रातील चौंडी, तालुका जामखेड, जिल्हा नगर हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान ! याच गावात ३१ मे १७२५ या दिवशी अहिल्यादेवी यांचा जन्म झाला. पुढे सुभेदार मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेराव यांच्याशी वयाच्या ८ व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. अहिल्याबाई बालपणापासूनच चाणाक्ष, तल्लख आणि कुशाग्र बुद्धीच्या होत्या.

खंडेराव राज्यकारभारावर अजिबात लक्ष देत नव्हते; पण अहिल्याबाईंनी कधीही गार्‍हाणे न करता सासरे मल्हारराव यांनी  नेमून दिलेल्या कामात लक्ष घातले. कुशाग्र बुद्धीची देणगी लाभलेल्या सूनबाई अहिल्याबाई यांच्यावर सासरे मल्हारराव होळकर यांचा मोठा विश्वास होता. पुष्कळ महत्त्वाचा पत्रव्यवहार ते अहिल्याबाई यांच्यावर सोपवत असत. अहिल्याबाईंना वयाच्या २८ व्या वर्षी वैधव्याला सामोरे जावे लागले. कुंभेरीच्या लढाईत पती खंडेराव मरण पावले. त्या वेळी सासरे मल्हारराव अहिल्याबाईंना म्हणाले, ‘‘माझा खंडूजी गेला; म्हणून काय झाले ? तुझ्या रूपाने माझा खंडूजी अजून जिवंत आहे. तू सती जाऊ नकोस.’’ अहिल्याबाईंनी ते ऐकले आणि मल्हाररावांनी अहिल्याबाईंच्या हाती सत्तेची सूत्रे दिली.

२. सासरे मल्हारराव होळकर यांच्या निधनानंतर कुशलतेने राज्य करणार्‍या अहिल्यादेवी !

मल्हारराव होळकर यांचे वर्ष १७६६ मध्ये निधन झाले. यानंतर अहिल्याबाईंवर मोठे उत्तरदायित्व आले. अहिल्याबाई यांचे पुत्र मालेराव यांना जरी सुभेदाराची वस्त्रे मिळाली होती, तरी ती सांभाळण्याचे त्यांच्यात धाडस नव्हते. लवकरच त्यांचेही देहावसान झाले. अहिल्याबाई तेव्हा खर्‍या अर्थाने राज्यकर्त्या झाल्या. पुढील २८ वर्षे त्यांनी राज्यकारभाराचा गाडा सैन्याच्या सहकार्याने अतिशय कुशलरित्या चालवला. राज्याच्या तिजोरीत भर घालत त्यांनी प्रजाहिताकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले. अहिल्याबाईंचा मूळ स्वभाव सौम्य असला, तरी राज्यकारभारात त्या तत्त्वनिष्ठ आणि कठोर होत्या, हे त्यांनी मनरूपसिंह सारख्या कुविख्यात डाकूला फाशी देऊन दाखवून दिले.

३. कायद्यांत केलेले पालट आणि उद्योगांना दिलेली चालना

अहिल्याबाई यांनी पूर्वीच्या कायद्यांमध्ये त्यांनी परिस्थितीनुसार काही सुधारणा केल्या. करपद्धती सौम्य केली; मात्र शेतकर्‍यांकडून सारा (कर) घेणे चालू ठेवले. गावोगावी न्याय देणारे पंच अधिकारी नेमले. त्या वेळी डोंगर मुलखातून भिल्ल आणि गोंड आदिवासी हे प्रवाशांना उपद्रव देत अन् त्यांच्याकडून ‘भिलवडी’ नावाचा कर वसूल करत. तेव्हा अहिल्याबाईंनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांचा कर  घेण्याचा अधिकार मान्य केला. त्यांच्याकडून पडिक भूमीची लागवड करून घेतली, तसेच त्यांना विशिष्ट सीमा नेमून दिली आणि भूमी करार पट्ट्याने देण्याची पद्धत चालू केली.

अहिल्याबाई यांनी राज्यकारभाराच्या सोयीसाठी राज्याची राजधानी इंदूरहून नर्मदा नदीच्या तीरी महेश्वर या ठिकाणी हालवली. वर्ष १७७२ मध्ये त्यांनी अनेक वास्तू बांधल्या. नदीला घाट बांधले. मंदिरांचा जीर्णोद्धार केला. अहिल्याबाईंनी वस्त्रोद्योगास चालना दिली. कोष्टी लोकांची वसाहत स्थापन केली आणि उत्तम हातमागाची सणंगे (उंची वस्त्रे) बनतील, अशी पेठ कायम केली.

४. मोगलांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांचा जीर्णाेद्धार आणि जनतेसाठी केलेल्या सोयी

अहिल्याबाईंनी अयोध्या, नाशिक, द्वारका, पुष्कर, जेजुरी, पंढरपूर, ऋषिकेश, गया, उदयपूर आणि चौंडी येथे मंदिरे बांधली. यासह सोरटी सोमनाथ, ओंकारेश्वर, मल्लिकार्जुन, औंढा नागनाथ, काशी विश्वेश्वर, विष्णुपद, महाकालेश्वर आदी मंदिरांचा जीर्णोद्धार केला. वाराणसी, प्रयाग, पुणतांबे, चौंडी, नाशिक, जांब, त्र्यंबकेश्वर येथे नदीला विस्तीर्ण घाट बांधले आणि गोकर्ण महाबळेश्वर, उज्जैन, रामेश्वर, भीमाशंकर आदी ठिकाणी अन्नछत्रे उघडली. चारधामांच्या ठिकाणी घाट, बाग, मंदिरे, बाग, कुंडे, धर्मशाळा बांधून यात्रेकरूंची सोय केली.

५. अहिल्यादेवी होळकर यांचा ग्रंथसंग्रह

अहिल्याबाईंचा ग्रंथसंग्रह मोठा आणि दुर्मिळ होता. त्यात निर्णयसिंधू, द्रोणपर्व, ज्ञानेश्वरी, मधुरा माहात्म्य, मुहूर्त चिंतामणि, वाल्मीकि रामायण, पद्मपुराण, श्रावणमास माहात्म्य इत्यादी ग्रंथाच्या हस्तलिखित प्रती होत्या.

६. धाडस, दूरदृष्टी, त्यागी वृत्ती या गुणांच्या आधारे त्यांनी राजसत्तेचे आदर्श नेतृत्व केले !

लेखक : डॉ. सुवर्णा नाईक-निंबाळकर, पुणे