अभिनेते आमीर खान यांच्या ‘लाल सिंह चढ्ढा’ या चित्रपटाविषयी चालू असलेली बहिष्काराची मोहीम योग्य ! – मुकेश खन्ना, अभिनेते

मुंबई – सामाजिक संकेतस्थळांवर अभिनेते आमीर खान यांच्या ‘लाल सिंग चढ्ढा’ या चित्रपटाच्या विरोधात चालू असलेली बहिष्काराची मोहीम योग्य आहे. आपला हिंदु समाज पूर्वी काही बोलत नव्हता; पण आता हिंदु समाज जागरूक होत आहे, ही चांगली गोष्ट आहे, असे वक्तव्य अभिनेते मुकेश खन्ना यांनी केले. अभिनेते आमीर खान यांचा ‘लाल सिंह चढ्ढा’ हा चित्रपट अयशस्वी ठरला. त्याच्यावर घालण्यात आलेल्या बहिष्काराच्या पार्श्‍वभूमीवर विषयी खन्ना यांनी वरील विधान केले.

सौजन्य बॉलीवूड आय

ते पुढे म्हणाले,…

१. ‘भारतात सुरक्षित वाटत नाही’, असे आमिर खान यांनी का म्हटले ? यावर लोकांनी त्यांना ‘भारतात सुरक्षित वाटत नसेल, तर पाकिस्तानात जाऊन राहा’, असे म्हटले. लोकांचा व्यक्त केलेला संताप आणि प्रतिक्रिया योग्य होती.

२. आम्ही आमचा धर्म कधीच गांभीर्याने घेतला नाही. आधी हिंदु समाज कधीच विरोध करत नसे; पण आता तो विरोध करू लागला आहे, हे पाहून लोकांना आश्‍चर्य वाटते.  ‘हिंदू धर्मांध का होत आहेत ?’, असा विचार इतर धर्माचे लोक करत आहेत. हिंदूंनी विचार केला, तर ते धर्मांध आणि अन्य धर्मियांनी तशाच प्रकारे विचार केला, तर ते मात्र धर्मांध नाहीत. हा न्याय नाही, यात कोणताही तर्क नाही.

३. खरेतर चित्रपट न पहाता कोट्यवधी रुपये खर्चून सिद्ध केलेल्या चित्रपटाला विरोध करणे योग्य नाही. यापूर्वीही अशा प्रकारचा विरोध झाला आहे; मात्र या वेळी लोक सामाजिक संकेतस्थळांवर एकत्र येऊन चित्रपटावर बहिष्कार घालण्याचे आवाहन करत आहेत.

४. बहिष्काराच्या या मोहिमेला माझा पाठिंबा असेल. हिंदूंनी अशी मोहीम राबवणे हा चांगला संकेत आहे; कारण या लोकांनी अशा गोष्टी बोलणे टाळायला पाहिजेत. जोपर्यंत तुम्ही शिक्षा देणार नाही, तोपर्यंत गुन्हेगार गुन्हा करणे सोडणार नाही.

संपादकीय भूमिका

अभिनेते मुकेश खन्ना यांच्या या भूमिकेविषयी चित्रपटसृष्टीतील अभिनेते आणि अभिनेत्री काही बोलतील का ?