राष्ट्रद्वेषी ‘एन्.डी.टी.व्ही.’!

दूरदर्शनचे सल्लागार संपादक आणि वरिष्ठ निवेदक श्री. अशोक श्रीवास्तव यांनी राष्ट्र अन् हिंदु द्वेषी वृत्तवाहिनी ‘एन्.डी.टी.व्ही.’वर गंभीर आरोप केले आहेत. सरकारी ‘दूरदर्शन’ वाहिनीची उपकरणे आणि विविध विषयांवरील ध्वनीमुद्रण ‘एन्.डी.टी.व्ही.’ने चोरले होते. ‘दूरदर्शन’चे वर्ष १९८६ ते ८८ या काळातील महानिर्देशक भास्कर घोष यांनी एन्.डी.टी.व्ही. वृत्तवाहिनीला मोठ्या प्रमाणात साहाय्य केले होते. भास्कर घोष हे हिंदुद्वेष्ट्या पत्रकार सागरिका घोष यांचे वडील आहेत. एन्.डी.टी.व्ही.ला तत्कालीन काँग्रेस सरकारचे मोठ्या प्रमाणात साहाय्य लाभले होते, तसेच अवैध पद्धतीने लाभ मिळवून देण्यासाठीही प्रयत्न करण्यात आले. संपादक श्री. अशोक श्रीवास्तव यांनी हे उघड केले म्हणून जनतेला समजले तरी, अन्यथा ते कधीच बाहेर आले नसते. अशा हिंदुद्वेषी वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रे चालू करतांना तत्कालीन हिंदुद्वेषी काँग्रेसने कोणकोणत्या गंभीर चुका केल्या आहेत ? त्यांची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. त्यातून अनेक गंभीर गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे.

एन्.डी.टी.व्ही. वृत्तवाहिनीचे प्रमुख प्रणय रॉय आणि त्यांच्या पत्नी राधिका रॉय आहेत. या वृत्तवाहिनीद्वारे सातत्याने हिंदुत्वनिष्ठ, हिंदुत्वनिष्ठ संघटना, हिंदु नेते यांची विकृत आणि चुकीची प्रतिमा सिद्ध करण्यासाठीचे प्रयत्न होत आहेत.

८० आणि ९० च्या दशकांमध्ये हिंदूंचा द्वेष करणारी काँग्रेस सत्तेत होती. काँग्रेसला स्वत:ची वाहवा करणारे आणि भाजपसारखे पक्ष अन् हिंदु संघटना यांची अवहेलना करणारे कुणीतरी हवेच होते. ती आवश्यकता एन्.डी.टी.व्ही.सारख्या वाहिन्यांनी भरून काढली. वाहिनीवर सज्जनतेचा मुखवटा लावून अस्खलित इंग्रजी बोलणारे निवेदक हिंदु धर्मप्रेमींवर चिखलफेक करण्याची एकही संधी सोडत नसत. या वाहिनीवर ‘द वर्ल्ड धीस वीक’ हा लोकप्रिय कार्यक्रम दूरदर्शनचे माहितीस्रोत आणि तिचा ‘स्टुडिओ’ वापरून करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या ‘टेप्स’ नंतर मोठी रक्कम घेऊन दूरदर्शनला विकण्यात आल्याचीही माहिती काही राष्ट्रप्रेमींनी सांगितली आहे. वाहिनीचे संस्थापक प्रणव रॉय यांनी बँकांची फसवणूक करून अवैध संपत्ती गोळा केली आहे. त्यामुळे वर्ष २०१९ मध्ये त्यांची कार्यालये आणि घरे यांवर केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने (सीबीआयने) धाडी टाकल्या होत्या. तेव्हा वाहिनीकडून सोज्वळपणाचा आव आणत ‘या धाडी म्हणजे माध्यम स्वातंत्र्यावरील उघड राजकीय आक्रमण आहे’, असे निवेदन दिले गेले. ज्या वाहिनीने तिचा प्रारंभच सरकारी वाहिनी, संपत्ती यांची हानी करत केला, त्यांना असे म्हणण्याचा अधिकार तरी आहे का ?

आतंकवादी समर्थक एन्.डी.टी.व्ही. !

इसिसच्या आतंकवाद्यांच्या एका गटाने काही दिवसांपूर्वी सांगितले, ‘आम्ही केवळ ‘एन्.डी.टी.व्ही.’, ‘बीबीसी न्यूज’, ‘दी वायर’ या वृत्तवाहिन्यांच्याच संपर्कात राहून त्यांच्याकडेच आमचे म्हणणे मांडू’, म्हणजे दुसर्‍या शब्दांत आतंकवाद्यांना या वाहिन्या त्यांच्या वाटतात, तसेच त्यांची बाजू (?) ऐकून आणि समजून घेणार्‍या वाटत असाव्यात. आतंकवादी, हिंदुद्वेष्टे आणि भारतविरोधी यांना एन्.डी.टी.व्ही. ‘आपली’ वाटावी, असे कोणते ‘कर्तृत्व’ वाहिनीने दाखवले असेल ? याचीही यातून कल्पना यावी. या वाहिनीवरील काही बातम्यांचे मथळे असतात, ‘हिजबूल मुजाहिदीनच्या कार्यकर्त्याला काश्मीरमध्ये अटक’, ‘इसिसच्या १५ सदस्यांना अटक’, ‘सामाजिक माध्यमांचा हत्यार म्हणून उपयोग करणारा हिजबूलचा कमांडर आणि मुख्याध्यापकाचा मुलगा बुरहान वाणी अनंतनागमध्ये मारला गेला’, ‘मूलतत्त्ववादी हिंदु गटाचे नेते कमलेश तिवारी यांची हत्या’. बातम्यांचे हे मथळे वाचल्यावर ‘आतंकवादी मारले गेले कि एखाद्या सामाजिक संघटनेचे लोक मारले गेले आहेत ?’, असा प्रश्न पडावा आणि हिंदू मात्र ‘मूलतत्त्ववादी’, म्हणजेच अन्य शब्दांत ते आतंकवादी वाटावेत, असे चित्र निर्माण होते. आतंकवाद्यांना पाठिंबा आणि हिंदूंना झोडपणे, हा कार्यक्रम अनेक वर्षे अव्याहतपणे चालू आहे. पठाणकोट येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणांच्या वेळी या वाहिनीने आतंकवाद्यांच्या सूत्रधारांना साहाय्य होईल, अशी माहिती सांगितली आणि काही संवेदनशील दृश्येही दाखवली. त्यामुळे तिच्यावर १ दिवसाची प्रसारणबंदी घालण्यात आली होती. आताच्या सरकारच्या काळातही वाहिनीवर अशी अपकृत्ये चालू असणे, म्हणजे ती किती निर्ढावलेली आणि हिंदुद्वेषी आहे, याचा पुरावाच देते. या वाहिनीवर २ वर्षांपूर्वी विदेशातील निधी ‘देणगी’ म्हणून घेण्यास बंदी घालण्यात आली होती. असे असूनही वाहिनीचा हिंदु आणि भारत यांच्याप्रतीचा द्वेष जराही अल्प झालेला नाही. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांना (भाजप सत्तेत असतांना) ते हिंदुत्वाच्या समर्थनार्थ वाहिनीवरील चर्चासत्रात सूत्र मांडत असतांना निवेदकाने स्पष्टपणे ‘आम्ही तुमचे म्हणणे ऐकून घेऊ शकत नाही. तुम्ही चर्चासत्रातून निघून जाऊ शकता’, असे सांगून त्यांचा ‘माईक’ बंद केला.

पाळेमुळे खोदा !

सोज्वळ आणि पुढारलेपणाचा चेहरा ठेवून पराकोटीचा हिंदुद्वेष अन् घृणा ज्यांच्यात आहे, त्यांची भारतीय संस्कृती, सभ्यता आणि जनता यांच्याशी कधीतरी नाळ जुळेल का ? प्रारंभी मोजक्या इंग्रजी वृत्तवाहिन्या असल्यामुळे लोक एक इंग्रजी वाहिनी म्हणून एन्.डी.टी.व्ही. पहायचे. कालांतराने त्यांना वाहिनीचा मूळ गाभा कळला, तेव्हा अनेकांनी ही वाहिनी पहाणे बंद केले. वाहिनीच्या प्रमुखांवर आर्थिक अपहाराचेही आरोप झाले आहेत. आतातर दूरदर्शनच्या निमित्ताने वृत्तवाहिनीच्या अपकृत्यांची मोठी माहिती समोर आली आहे. सरकारने याची नोंद घेऊन वाहिनीची पाळेमुळे खणून काढून संबंधितांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. तसेच या माध्यमातून एन्.डी.टी.व्ही.सारख्या वाहिन्यांनी हिंदु समाजासमवेत भारताचीही किती हानी केली आहे ? हे लक्षात येईल. याविषयीची प्रक्रिया लवकर व्हावी, हीच राष्ट्रप्रेमींची अपेक्षा !

सरकारी संस्थांची हानी करून वैयक्तिक आस्थापनाची भरभराट करणारे राष्ट्राचे शत्रूच !