महागाईमुळे जगभरातील ७ कोटी लोक गरीब होणार ! – आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची चेतावणी

नवी दिल्ली – सध्या सर्वत्रच महागाई वाढल्याने जगभरातील अनेक देश त्रस्त आहेत. या महागाईमुळे जगातील अनुमाने ७ कोटी लोक गरीब होणार असल्याची चेतावणी ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’ (आय.एम्.एफ्.) या संस्थेने दिली आहे.

१. ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’च्या प्रमुख क्रिस्टिलिना जिर्योजिएवा यांनी वाढत्या महागाईविषयी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. जगभरात महागाईचा दर सध्या सर्वोच्च पातळीवर पोचला आहे. त्याचवेळी रशिया आणि युक्रेन यांमध्ये चालू असलेल्या युद्धामुळे त्यात आणखी वाढ झाली आहे. बहुतांश गरीब देशांना ५ टक्क्यांपेक्षा अधिक महागाईचा सामना करावा लागत आहे. येत्या काही दिवसांत महागाईची स्थिती आणखी बिकट होऊ शकते. यामुळे अनेक देशांत सामाजिक स्तरावर अस्थिरता निर्माण होऊ शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

२. आशियाई विकास बँकेने वाढत्या महागाईच्या कारणामुळे भारताचा विकासदराचा अंदाज अल्प झाला आहे. या बँकेने आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी भारताचा विकास दर अल्प करत ७.२ टक्के केला आहे. यापूर्वी हा विकासदर ७.५ टक्के ठेवला होता. आर्थिक मंदीच्या भीतीमुळे सध्या जगभरात बड्या आस्थापनांनी नोकरभरती थांबवली आहे.

वर्ष २०२२ हे वर्ष कठीण, तर वर्ष २०२३ हे वर्ष आणखी कठीण असेल ! – आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

‘वर्ष २०२२ हे वर्ष कठीण, तर वर्ष २०२३ हे वर्ष आणखी कठीण असणार आहे. जनतेला महागाईतून लवकरच दिलासा मिळणार नाही’, असे विधान ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’च्या प्रमुख क्रिस्टिलिना जिर्योजिएवा यांनी ‘ब्लॉग’च्या माध्यमातून केले आहे.

संपादकीय भूमिका

भविष्यात याहून आणखी मोठा आपत्काळ येणार असल्याचे भाकीत द्रष्ट्या संतांनी यापूर्वी वेळोवेळी केलेले आहे. त्यामुळे अशा भीषण आपत्काळात टिकून रहाण्यासाठी जनतेने साधना करणे आवश्यक !