परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अनुसंधानात सतत राहिल्याने साधकाला भावाची स्थिती अनुभवता येणे

श्री. विठ्ठल कदम

१. मायेचे आवरण असल्याने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात त्यांचे मूळ स्वरूप अनुभवण्यास अल्प पडणे आणि ‘त्यांना अनुभवण्यासाठी प्रत्येक कृती करतांना ईश्वराच्या अनुसंधानात रहायला हवे’, अशी जाणीव होणे

‘मला एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभणार आहे’, असे समजले. त्या कालावधीत माझे व्यष्टी साधनेचे प्रयत्न मनापासून होत नव्हते. माझ्या मनात सतत कौटुंबिक आणि इतर विचार येण्याचे प्रमाण अधिक होते. मी त्यांच्या सत्संगासाठी बसलो असता, त्यांना पाहूनही माझा भाव जागृत होण्यास पुष्कळ वेळ लागत होता; कारण माझ्यावर मायेचे आवरण होते. त्यामुळे मी त्यांच्या मूळ स्वरूपाला अनुभवण्यास अल्प पडत होतो. त्यासाठी ‘आपण दिवसभरात सेवा किंवा इतर वैयक्तिक गोष्टी करतांना आपल्या मनात ईश्वराविषयी विचार असणे आवश्यक आहे’, असे माझ्या लक्षात आले.

२. परात्पर गुरुदेवांचे स्मरण आणि सतत त्यांच्या अनुसंधानात राहिल्यामुळे पूर्ण भावसत्संगात गुरुदेवांचे मूळ स्वरूप अनुभवता येणे

परात्पर गुरुदेवांच्या सत्संगानंतर एका वर्षाने मला ‘पुन्हा त्यांचा सत्संग लाभणार आहे’, असे समजले. त्या कालावधीत कौटुंबिक स्तरावर माझ्या मनाचा पुष्कळ संघर्ष झाला होता. त्या वेळी मी प्रत्येक क्षणी गुरुदेवांचे स्मरण करत होतो. त्यांच्या अनुसंधानात राहिल्यामुळे त्यांनी मला त्या प्रसंगातून बाहेर काढले. त्यांच्या सत्संगाच्या वेळी त्यांच्याप्रती माझ्या मनात कृतज्ञताभाव जागृत होत होता; म्हणून मला पूर्ण भावसत्संगात त्यांचे मूळ स्वरूप अनुभवता आले.

‘हे गुरुमाऊली, तुमच्या कृपेमुळेच मला भावस्थिती अनुभवता आली. याविषयी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. विठ्ठल कदम, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक