अग्नीपथ योजना देशासाठी आवश्यक ! – अजित डोवाल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल

नवी देहली – अग्नीपथ योजनेच्या सूत्रावरून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी, ‘अग्नीपथ योजना ही काळाची आवश्यकता आहे. ही योजना देशासाठी आवश्यक आहे’, असे सांगितले. ‘भारताच्या आजूबाजूचे वातावरण पालटत आहे. अशा परिस्थितीत सैन्यातही पालट आवश्यक आहे. वर्ष २०१४ मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी सत्तेवर आले, तेव्हा भारताला सुरक्षित आणि शक्तीशाली बनवणे हे त्यांचे प्रमुख ध्येय होते. उद्याची सिद्धता करायची असेल, तर आपल्याला पालटावे लागेल.

सौजन्य : Zee News

ते पुढे म्हणाले की,

१. युद्ध लढण्याच्या प्रकारात मोठे पालट होत आहेत. युद्धात शस्त्रांऐवजी तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. यासाठी यंत्रणा आणि संरचना यांमध्ये पालट आवश्यक आहेत. हे लक्षात घेऊन मनुष्यबळ, धोरणांमध्ये पालट करण्याची आवश्यकता आहे.

२. डोवाल म्हणाले की, अग्नीवीर (अग्नीपथ योजनेच्या अंतर्गत सहभागी झालेल्यांना ‘अग्नीवीर’ म्हटले जाणार) परिवर्तनाचे वाहक बनतील. भारत सैन्य सामग्री निर्मिती क्षेत्रात बरीच प्रगती करत आहे.