साडेतीन मुहूर्तांतील एक मुहूर्त असलेली आणि सुख-समृद्धी प्रदान करणारी अक्षय्य तृतीया !

अस्यां तिथौ क्षयमुपैति हुतं न दत्तं तेनाक्षयेति कथिता मुनिभिस्तृतीया ।
उद्दिश्य दैवतपितन्क्रियते मनुष्यैः तच्चाक्षयं भवति भारत सर्वमेव ।। – मदनरत्न

अर्थ : (श्रीकृष्ण म्हणतो) हे युधिष्ठिरा, या तिथीस केलेले दान आणि हवन क्षयाला जात नाही; म्हणून हिला मुनींनी ‘अक्षय्य तृतीया’ असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय (अविनाशी) होते.

१. अक्षय्य तृतीया या दिवसाला ‘साडेतीन मुहूर्तांतील एक मुहूर्त’ मानले जाणे

अक्षय (अक्षय्य) तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. याच दिवशी त्रेतायुगाला प्रारंभ झाला. या दिवसाने एका कलहकालाचा अंत आणि दुसऱ्या युगाच्या सत्ययुगाचा प्रारंभ, अशी संधी साधलेली असल्यामुळे अक्षय (अक्षय्य) तृतीया या संपूर्ण दिवसाला ‘मुहूर्त’ म्हणतात. मुहूर्त केवळ एका क्षणाने साधलेला असला, तरी संधीकालामुळे त्याचा परिणाम २४ घंट्यांपर्यंत कार्यरत असल्याने तो संपूर्ण दिवस शुभ मानला जातो; म्हणूनच (अक्षय्य) तृतीया या दिवसाला ‘साडेतीन मुहूर्तांतील एक मुहूर्त’ मानले जाते.

२. अवतार होणे

अक्षय (अक्षय्य) तृतीया या तिथीवरच हयग्रीव अवतार, नरनारायण प्रकटीकरण आणि परशुराम अवतार झाला. यावरून अक्षय तृतीया या तिथीचे महत्त्व लक्षात येते.

३. धर्मकृत्यांचा अधिक लाभ होणे

‘या तिथीला विष्णुपूजा, जप, होमहवन, दान आदी धर्मकृत्ये केल्यास अधिक आध्यात्मिक लाभ होतो’, असे मानले जाते.

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सातत्याने सुख-समृद्धी प्राप्त करून देणाऱ्या देवतेची कृतज्ञतेचा भाव ठेवून उपासना केल्यास आपल्यावर होणाऱ्या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही, असे मानले जाते. श्रीविष्णुसहित वैभवलक्ष्मीच्या प्रतिमेचे कृतज्ञतेचा भाव ठेवून भक्तीभावाने पूजन करावे. होमहवन आणि जपजाप्य करण्यात काळ व्यतीत करावा.

 


अक्षय्य तृतीया सण साजरा करण्याची पद्धत

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

कालविभागाचा कोणताही प्रारंभदिवस भारतियांना नेहमीच पवित्र वाटतो; म्हणून अशा तिथीस स्नानदानादी धर्मकृत्ये सांगितली गेली आहेत. या दिवसाचा विधी असा आहे – पवित्र जलात स्नान, श्रीविष्णूची पूजा, जप, होम, दान आणि पितृतर्पण. या दिवशी अपिंडक श्राद्ध करावे आणि ते जमत नसेल, तर निदान तिलतर्पण तरी करावे.

१. उदकुंभाचे (उदककुंभाचे) दान

या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून ब्राह्मणाला उदककुंभाचे दान करावे.

२. महत्त्व

उदककुंभालाच सर्वसमावेशक स्तरावरील ‘निर्गुण पात्र’ असे संबोधले जाते.

३. उद्देश

अ. उदककुंभाचे दान करणे, म्हणजेच स्वतःच्या सर्व प्रकारच्या देहसदृश, तसेच कर्मसदृश वासनांच्या स्थूल, तसेच सूक्ष्म लहरी कुंभातील जलाला पवित्र मानून त्यात विसर्जित करणे आणि अशा प्रकारे स्वतःचा देह आसक्तीविरहित कर्माने शुद्ध करून त्यानंतर उदककुंभायोगे या सर्व वासना पितर अन् देव यांच्या चरणी ब्राह्मणाला ग्राह्य धरून अर्पण करणे

आ. पितरांच्या चरणी उदककुंभ दान दिल्याने पितर मानवयोनीशी संबंधित असल्याने ते आपल्या स्थूल वासना नष्ट करतात.

इ. देवाचा कृपाशीर्वाद हा आपल्या प्रारब्धजन्य सूक्ष्म कर्मातील पाप नष्ट करत असल्याने सूक्ष्म कर्मजन्य वासना देवांच्या चरणी या दानाकरवी अर्पण केल्या जातात.

४. उदकुंभ दानाचा मंत्र

एष धर्मघटो दत्तो ब्रह्मविष्णुशिवात्मकः ।
अस्य प्रदानात् तृप्यन्तु पितरोऽपि पितामहाः ।।

गन्धोदकतिलैर्मिश्रं सान्नं कुम्भं फलान्वितम् ।
पितृभ्यः सम्प्रदास्यामि अक्षय्यमुपतिष्ठतु ।।

– धर्मसिन्धु

अर्थ : ब्रह्मा, विष्णु आणि शिव ज्यात सामावले आहेत, असा हा धर्मघट मी ब्राह्मणाला दान केला आहे. या दानामुळे माझे पितर आणि देवता तृप्त होवोत. गंध, उदक, तीळ, यव आणि फळे यांनी युक्त असा हा कुंभ मी पितरांसाठी देत आहे. हा कुंभ माझ्यासाठी सदा अक्षय्य (क्षय न पावणारा) ठरो.

५. शास्त्र

अक्षय्य तृतीया या दिवशी ब्रह्मांडात अखंड रूपातील, तसेच एकसमान गतीजन्यता दर्शवणाऱ्या सत्त्व-रज लहरींचा प्रभाव अधिक प्रमाणात असल्याने या लहरींच्या प्रवाहायोगे पितर आणि देव यांना उद्देशून ब्राह्मणाला केलेले दान पुण्यदायी आणि मागील जन्माच्या देवाणघेवाण हिशेबाला धरून कर्म-अकर्म करणारे ठरत असल्याने या कधीही क्षय न होणाऱ्या लहरींच्या प्रभावाच्या साहाय्याने केलेले दान महत्त्वाचे ठरते.

६. पूर्वज

६ अ. महत्त्व : अक्षय तृतीयेला पूर्वज पृथ्वीजवळ आल्यामुळे मानवाला अधिक त्रास होण्याची शक्यता असते. मानवावर असलेले पूर्वजांचे ऋण फेडण्यासाठी मानवाने प्रयत्न करणे ईश्वराला अपेक्षित आहे. यासाठी अक्षय (अक्षय्य) तृतीयेला पूर्वजांना गती मिळण्यासाठी तिलतर्पण करायचे असते.

६ आ. पद्धत : पूर्वजांना तीळ अर्पण करण्यापूर्वी तिळांमध्ये श्रीविष्णु आणि ब्रह्मा यांची तत्त्वे येण्यासाठी देवतांना प्रार्थना करावी. त्यानंतर ‘पूर्वज सूक्ष्मातून आलेले आहेत आणि आपण त्यांच्या चरणांवर तीळ आणि जल अर्पण करत आहोत’, असा भाव ठेवावा. दोन मिनिटांनी देवतांच्या तत्त्वांनी भारीत झालेले तीळ आणि अक्षता पूर्वजांना अर्पण कराव्यात. सात्त्विक बनलेले तीळ हातात घेऊन त्यावरून ताटामध्ये हळुवारपणे पाणी सोडावे. त्या वेळी दत्त किंवा ब्रह्मा किंवा श्रीविष्णु यांना पूर्वजांना गती देण्यासाठी प्रार्थना करावी.

६ इ. परिणाम : तिळांमध्ये सात्त्विकता ग्रहण करून रज-तम नष्ट करण्याची क्षमता अधिक आहे. साधकाच्या भावानुसार तिलतर्पण करतांना सूक्ष्मातून ताटामध्ये आलेल्या पूर्वजांच्या प्रतिकात्मक सूक्ष्म-देहावरील काळ्या शक्तीचे आवरण दूर होऊन त्यांच्या सूक्ष्म-देहांतील सात्त्विकता वाढते आणि त्यांना पुढच्या लोकात जाण्यासाठी आवश्यक अशी ऊर्जा मिळते.

– एक विद्वान (श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ ‘एक विद्वान’ या टोपणनावानेही लिखाण करतात.) (१०.४.२००९)


अक्षय्य तृतीयेला करावयाच्या दानाचे महत्त्व

कु. मधुरा भोसले

अक्षय (अक्षय्य) तृतीयेला केलेले दान कधीही क्षयाला जात नाही. या दिवशी केलेल्या दानातून पुष्कळ पुण्य मिळते. पुष्कळ पुण्य मिळाल्यामुळे जिवाने पूर्वी केलेले पाप न्यून होते आणि त्याचा पुण्यसाठा वाढतो. एखाद्या जिवाचे पूर्वीचे कर्म चांगले असल्यास त्याचा पुण्यसाठा वाढतो. यामुळे जिवाला स्वर्गप्राप्ती होऊ शकते; परंतु साधकांना पुण्य मिळवून स्वर्गप्राप्ती करायची नसते, तर त्यांना ईश्वरप्राप्ती करायची असते. यामुळे साधकांनी सत्पात्रे दान करणे आवश्यक असते. येथे सत्पात्रे दान, म्हणजे जेथे अध्यात्मप्रसारासमवेत राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य केले जाते, अशा सत्च्या कार्यात दान करणे. सत्पात्रे दान केल्यामुळे दान करणाऱ्याला पुण्य मिळणार नाही, तर दानाचे कर्म हे अकर्म कर्म होईल. त्यामुळे त्याची आध्यात्मिक उन्नती होईल. आध्यात्मिक उन्नती झाल्यामुळे साधक स्वर्गलोकात न जाता उच्च लोकांत जाईल.

– ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, ११.५.२००५)


हळदीकुंकू

स्त्रियांसाठी अक्षय्य तृतीया हा दिवस महत्त्वाचा असतो. चैत्रात बसवलेल्या चैत्रगौरीचे या दिवशी त्यांना विसर्जन करायचे असते. त्यानिमित्त त्या हळदीकुंकूही करतात.

धनाचे दान

वर उल्लेखिल्याप्रमाणे सत्पात्रे दान संत, धार्मिक कार्य करणाऱ्या व्यक्ती, धर्मप्रसार करणाऱ्या आध्यात्मिक संस्था, धर्माविषयीचे उपक्रम आदींना वस्तू वा द्रव्य रूपाने दान करावे.

तनाचे दान

धर्माविषयीच्या उपक्रमांत सहभागी होणे, हे तनाचे दान होय. यासाठी विविध माध्यमांतून होणारे देवतांचे विडंबन, धार्मिक उत्सवांतील अपप्रकार इत्यादी रोखावे.

मनाचे दान

कुलदेवतेचा जप करणे, तिला प्रार्थना करणे यांद्वारे मन अर्पण (दान) करावे.

संदर्भ : सनातनचा ग्रंथ सण, धार्मिक उत्सव आणि व्रते

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.