(म्हणे) ‘शालेय अभ्यासक्रमात ‘श्रीमद्भगवद्गीते’चा समावेश करणार नाही !’

  • महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांचा हिंदुविरोधी निर्णय !

  • भाजपची मागणी फेटाळली

  • ‘श्रीमद्भगवद्गीता’ हा केवळ धार्मिक ग्रंथ नसून त्यात जीवनाचे सार आहे. त्यामुळे गीतेचा अभ्यास म्हणजे खर्‍या अर्थाने जीवनोद्धाराचा मार्ग आहे, हे शिक्षणमंत्री लक्षात घेतील का ? – संपादक  
  • गुजरात राज्याने इयत्ता १२ वीपर्यंत ‘श्रीमद्भगवद्गीते’चा शिक्षणात समावेश केला आहे, तर कर्नाटक राज्यही त्या दृष्टीने सकारात्मक आहे. असे आहे, तर महाराष्ट्रातच ‘श्रीमद्भगवद्गीता’ शिकवण्यास आडकाठी का ? – संपादक 
वर्षा गायकवाड

मुंबई – शालेय अभ्यासक्रमात ‘श्रीमद्भगवद्गीते’चा समावेश करणार नाही, असा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिला आहे. राज्यातील शालेय शिक्षणात श्रीमद्भगवद्गीता आणि संतसाहित्य यांचा समावेश करण्याची मागणी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी राज्य सरकारकडे केली होती; मात्र शिक्षणमंत्र्यांनी ही मागणी फेटाळली आहे. ‘केवळ राजकारणासाठी अशी मागणी केली जात आहे’, असे त्या म्हणाल्या. (‘मागणी फेटाळण्यासाठी शिक्षणमंत्रीच राजकारणाचे कारण पुढे करत राजकारण करू पहात आहेत’, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? – संपादक)

त्या पुढे म्हणाल्या, ‘‘शालेय अभ्यासक्रमातून कोणत्याही धर्माचे शिक्षण देता येणार नाही. धर्मग्रंथांचे पठण घरातच करावे, शालेय शिक्षणात त्यांचा समावेश करता येणार नाही. ‘श्रीमद्भगवद्गीता’ हा धार्मिक ग्रंथ आहे. एका धर्माच्या ग्रंथाचा शिक्षणात समावेश केला, तर इतर धर्मियांकडूनही तशी मागणी होईल. भारतीय राज्यघटनेत धर्मनिरपेक्ष तत्त्वाचा समावेश आहे. विद्यार्थी दशेपासून मुलांच्या मनात हे विचार रुजवणे आवश्यक आहे. मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे, ही राज्य सरकारची भूमिका आहे.’’