हिंदूंनो, बुद्धीभेद करणार्‍या आणि हिंदु धर्मियांच्या श्रद्धांवर घाला घालणार्‍या पुरोगाम्यांचा कावा ओळखा !!

हिंदूंनो, ‘देवळात पैसे अर्पण करण्यापेक्षा तेच पैसे मंदिराबाहेर बसलेल्या भिकार्‍याला द्या’, असे सांगून बुद्धीभेद करणार्‍या आणि हिंदु धर्मियांच्या श्रद्धांवर घाला घालणार्‍या पुरोगाम्यांचा कावा ओळखा 

‘केवळ २० वर्षे वयाच्या ईशान जोशीच्या या लेखावरून त्याची प्रगल्भता आणि बहुसंख्य हिंदूंची विचारशून्यता आणि क्रियाशून्यता लक्षात येते. या लेखाविषयी त्याचे कौतुक करावे तेवढे थोडे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘माझ्या मित्राच्या ‘व्हॉट्सॲप’वरून मला पुढील पोस्ट आली, ‘देवळात १५ – २० रुपये अर्पण करण्यापेक्षा तेच पैसे मंदिराबाहेर बसलेल्या एखाद्या भिकार्‍याला द्या. त्याला ५ रुपयांचा बिस्किटांचा पुडा तरी घेऊन द्या.’ या सूत्रावरून माझी आणि माझ्या मित्राची पुढील चर्चा झाली.

१. हिंदु धर्मियांच्या श्रद्धांवर घाला घालणे, हे पुरोगामी विचारांच्या लोकांचे कारस्थान !

१ अ. केवळ हिंदु धर्मियांनाच का लक्ष्य केले जाते ? : केवळ हिंदु धर्मावर घाला घालण्यासाठी पुरोगामी असा अपप्रचार करत आहेत. हिंदूंनी अर्पण केलेले नारळ आणि पैसे पुरोगामी मंडळींना दिसतात; पण दर्ग्यावरील चादर, तसेच चर्चमधील प्रदूषण करणारी मेणबत्ती त्यांना दिसत नाही. यावर ते कधी अवाक्षरही काढत नाहीत.

१ आ. अन्य सर्वच क्षेत्रांत पैशाची वारेमाप उधळण होत असतांना देवळात अर्पण केल्या जाणार्‍या रुपयांच्या संदर्भातच असा अपप्रचार का ? : ‘भरमसाठ पैसा असलेले राजकारणी पुरोगाम्यांना दिसत नाहीत का ? ‘जेव्हा काही मंडळी क्रिकेटच्या खेळाडूंना पाच कोटी पगार द्या’, अशी मागणी करतात, तेव्हा यांना गरीब लोक दिसत नाहीत का ? आता अलीकडेच सर्व मंत्र्यांची पगारवाढ झाली. तेव्हाही पुरोगामी मंडळींनी कोणताच विरोध का केला नाही ?’, असे प्रश्न जागृत हिंदूंना का पडू नयेत ? यामुळे पुरोगाम्यांच्या असल्या विचारांना हिंदूंनी काहीच किंमत देऊ नये.

श्री. ईशान जोशी

१ इ. ‘गरिबी कशामुळे वाढली आहे ?’, याचा विचार न करणे : आज भारत देशातील ४० टक्के जनता गरीब आहे. हिंदू गरिबांना दान देतातही; पण मागील ७० वर्षांमध्ये किती गरिबांचे भले झाले ? ‘गरिबी कशामुळे वाढली आहे ?’, याचा मुळाशी जाऊन अभ्यास न करता आतापर्यंतच्या शासनाने किती उपाययोजना काढल्या ? वरवरच्या उपाययोजना काढल्याही असतील; पण ‘त्या राबवण्यात सरकार किती यशस्वी झाले ?’, याचा विचार ही पुरोगामी मंडळी करणार आहेत का ? शासनाला याचा जाब विचारणार आहेत का ?

१ ई. पुरोगाम्यांना गरिबांचा एवढा कळवळा आहे, तर ते त्यांच्या रोजगाराची सोय का करत नाहीत ? : आपण अनेक ठिकाणी भीक मागणार्‍या लोकांना पहातो. त्यात बरेच तरुणही असतात. पुरोगाम्यांना गरिबांचा एवढा कळवळा आहे, तर त्यांनी या तरुणांना आतापर्यंत रोजगार मिळवून द्यायला हवा होता. अशा प्रकारे भीक मागून फुकटचे खाण्याची सवय त्यांना कशाला लावली ?

१ उ. देशहिताचा विचार करून काही प्रगत देशांमध्ये भीक मागण्यावर बंदी असतांना भारतात योग्य उपायांच्या अभावी भिकार्‍यांची संख्या वाढत असणे : आज काही प्रगत देशांमध्ये भीक मागण्यावर बंदी आहे; कारण त्यांना ठाऊक आहे की, आज एक जण भीक मागू लागला, तर ते पाहून उद्या भीक मागणार्‍यांची संख्या वाढत जाईल. त्यामुळे माणसाला आयते खायची सवयच लागेल. या प्रगत देशांनी केवळ देशहिताचा विचार केला. त्यामुळे त्या देशातील नागरिक काम करण्यास सिद्ध असतात. या सगळ्याचा विचार पुरोगामी मंडळी करणार का ? आपल्याकडे दिवसेंदिवस भिकार्‍यांची संख्या वाढत असतांना त्यावर योग्य उपाय न काढता पुरोगाम्यांनो केवळ हिंदूंना माणुसकीचे डोस पाजू नका.

२. भिकार्‍यांना दिलेले पैसे कशा प्रकारे वापरले जातील, याची शाश्वती नसल्याने हिंदूंनो, ‘अपात्रे दान’ करून पापाचे भागीदार होऊ नका !

काही भिकार्‍यांची वेगळीच तर्‍हा असते. पुढील उदाहरणे वाचून भिकार्‍यांवर किती विश्वास ठेवावा, याविषयी शंकाच वाटते.

अ. मुंबईतील एका प्रकरणात असे लक्षात आले की, एका भिकार्‍याचे स्वतःचे चांगले घर आहे. त्याची स्वतःची दुचाकी गाडी आहे. एखादी नोकरी करावी, त्याप्रमाणे हे महाशय प्रतिदिन आपल्या गाडीवरून येतात आणि भीक मागून गाडीवरूनच जातात ! आता यांना गरीब कसे म्हणायचे ?

आ. काही ठिकाणी लहान मुलांना भीक मागायला लावणार्‍या टोळ्या कार्यरत असतात. त्यामुळे ‘आपण दिलेले पैसे नेमके कुणाकडे जातात ?’, हे ठाऊक नसतांना हिंदूंनी असे पैसे का द्यायचे ?

इ. काही ठिकाणी भिकारी भीक मागून मिळालेल्या पैशातून जुगार खेळणे, दारू पिणे, सिगारेट ओढणे आदी कुकर्म करतांना मोठ्या प्रमाणावर दिसतात. त्यामुळे अशांना पैसे देऊन आपणच पापाचे भागीदार होत असल्याने ‘आपण कुणाला दान देतो ?’, याचे भान समाजाने ठेवले पाहिजे.

३. मंदिरांतील निधी गरिबांच्या कल्याणासाठीही वापरला जात असणे

‘मंदिरांना अर्पण केलेले पैसे गरिबांच्या कल्याणासाठी वापरले जातात. मशीद किंवा चर्च यांच्याकडे येणारा पैसा कधीच गरिबांच्या कल्याणासाठी वापरला जात नाही’, याची पुरोगाम्यांनी नोंद घ्यावी. यावरून असे लक्षात येते की, सर्व लोकांच्या सर्व प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी केवळ हिंदु राष्ट्र्रच पाहिजे आणि त्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन प्रयत्न केले पाहिजेत !’

– श्री. ईशान जोशी (वय २० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.