साधकांनो, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे त्वरित लिहून पाठवा !

‘गुरुकृपायोग’ हा साधनेचा विहंगम मार्ग असून गुरुतत्त्व आपल्याला पदोपदी प्रत्येक क्षणी शिकवत असते आणि साधनेसाठी घडवत असते. याची अनुभूती सनातनचा प्रत्येक साधक घेत असतो. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने साधकांना बर्‍याच वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती येतात, तसेच अनेक सूत्रे शिकायला मिळत असतात; परंतु या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे तत्परतेने पुढे लिहून देण्यामध्ये साधकांची उदासीनता दिसते. ‘आपल्या लिखाणातून, अनुभूतींमधून इतरांना शिकायला मिळते, तसेच वाचकांची श्रद्धा वाढण्यास साहाय्य होते’, हे महत्त्व परात्पर गुरु डॉक्टरांनी विविध माध्यमांतून साधकांना सांगितले आहे. गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, तसेच ‘आपल्याला शिकायला मिळालेली सूत्रे आणि अनुभूती यांमधून अन्य साधक घडावेत अन् त्यांना साधनेची दिशा मिळावी’, यासाठी साधकांनी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती आणि साधनेचे प्रयत्न करतांना शिकायला मिळालेली सूत्रे त्वरित [email protected] या संगणकीय पत्त्यावर अथवा पुढील टपाल पत्त्यावर पाठवावी.

टपालासाठी पत्ता :

सौ. भाग्यश्री सावंत,
द्वारा ‘सनातन आश्रम’,
रामनाथी, फोंडा, गोवा.
पिन – ४०३ ४०१

– संकलन विभाग, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.१.२०२२)


दैनिक ‘सनातन प्रभात’साठी केवळ नाविन्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण लिखाण थोडक्यात अन् नेमकेपणाने पाठवा !

‘अनेक साधक संकलन विभागाकडे प्रसारातील अनुभव, अनुभूती, शिकायला मिळालेली सूत्रे, साधनाप्रवास, भावप्रयोग, कविता आदी विविध लिखाण दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी पाठवतात. ते लिखाण विस्तृत प्रमाणात येत आहे. त्यामुळे ‘त्या लिखाणाची निवड करणे, संकलन करणे आणि ते लिखाण प्रसिद्ध करणे’, यांमध्ये अडचणी येत आहेत. यापुढे साधकांनी पुढील सूत्रे लक्षात घेऊन लिखाण पाठवावे.

१. ‘सनातन प्रभात’साठी कोणते लिखाण पाठवावे ?

अ. परात्पर गुरु डॉक्टरांच्या संदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती, पूर्वीच्या त्यांच्या भेटीचे प्रसंग, त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे, ‘त्यांनी सेवेत, तसेच साधनेत कसे घडवले ?’, यांविषयीची सूत्रे आदी लिखाण प्राधान्याने आणि अगदी नेमकेपणाने पाठवावे.

आ. सनातनचे संत आणि सद्गुरु यांच्या संदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पाठवावीत.

इ. साधकांना आलेल्या नाविन्यपूर्ण अनुभूती, साधकांच्या जीवनातील काही वेगळे प्रसंग आदी लिखाण थोडक्यात पाठवावे.

ई. इतर साधक, तसेच बालसाधक यांची गुणवैशिष्ट्ये पाठवतांना साधकांनी ती थोडक्यात, तसेच वाचकांना समजतील, अशा प्रकारे लिहून द्यावीत. बालसाधकांचे वैशिष्ट्यपूर्ण लिखाण पाठवण्याविषयी दैनिकात वेळोवेळी चौकटी प्रसिद्ध झाल्या आहेत. त्या चौकटींची कात्रणे किंवा तो अंक स्वतःकडे ठेवून सर्व पूर्तता करूनच लिखाण पाठवावे.

उ. अन्य विषयांवरील नाविन्यपूर्ण लिखाणही अगदी थोडक्यात पाठवावे.

ऊ. तात्कालीन विषय, उदा. ‘कोरोना’ महामारीविषयी लिखाण पाठवतांना जी माहिती ‘सनातन प्रभात’मधून पूर्वीच प्रसिद्ध झाली आहे, तशाच प्रकारची माहिती पुन्हा पाठवू नये. त्यापेक्षा निराळी आणि वैशिष्ट्यपूर्ण माहिती असल्यास ती थोडक्यात पाठवावी.

ए. साधकांनी मृत साधकांविषयीचे महत्त्वपूर्ण लिखाण पाठवावे.

२. कोणते लिखाण पाठवू नये ?

अ. साधकांनी मनाच्या स्तरावरील सविस्तर विचारप्रक्रिया लिहून पाठवू नये. ती व्यष्टी साधनेच्या आढाव्यातही सांगता येते.

आ. साधकांनी एकाच वेळी ५ – ६ मोठ्या कविता लिहून पाठवू नयेत. काही वेळा कवितांतील काही ओळी अपूर्ण असतात. त्यांचा अर्थ समजून घेऊन संकलन करणे कठीण होते आणि अधिक वेळ द्यावा लागतो. अनेक साधक पुष्कळ मोठ्या कविता पाठवतात. त्यामुळे कवितेतील अनावश्यक भाग काढून ती नीट करण्यासाठी साधकांना वेळ द्यावा लागतो.

३. इतर सूत्रे

अ. लिखाण पाठवणार्‍या सर्व साधकांनी लिखाणाखाली आपले नाव, वय, गाव, दिनांक आणि संपर्क क्रमांक लिहावा. साधकांनी गाव लिहितांना तालुका आणि जिल्हाही लिहावा.

आ. धारिकेत ज्या साधकांचा, तसेच नातेवाइकांचा उल्लेख असेल, त्या सर्वांचे नाव, गाव, वय, आध्यात्मिक पातळी ही माहितीही लिहावी.

इ. लिखाणात काही संदर्भ दिले असल्यास ते योग्य असल्याची निश्चिती केलेली असावी, तसेच ‘सनातन प्रभात’मधील लिखाणाचा संदर्भ दिला असल्यास शक्यतो त्या अंकाचा दिनांकही घालावा, अन्यथा अशी माहिती शोधण्यात संकलन सेवेतील साधकांचा वेळ जातो.

ई. साधकांनी स्वतःचे आणि ज्या साधकाविषयी लिहून दिले आहे, त्याचे छायाचित्र पाठवावे, उदा. एखाद्या साधकाविषयी त्याचे आई-वडील आणि मुलगी यांनी सूत्रे लिहून दिली असतील, तर आई-वडील, मुलगी यांची आणि त्यांनी ज्या साधकाविषयी लिहून दिले आहे, त्याचे छायाचित्र पाठवावे.

उ. बालसाधकांचे लिखाण पाठवतांना त्या बालसाधकाचे आताचे छायाचित्र आणि ज्यांनी त्या बालसाधकाबद्दल लिहून दिले आहे, त्या सर्वांची छायाचित्रे पाठवावीत.

ऊ. काही साधक ऐनवेळी ‘व्हॉट्सॲप’वर लिखाण पाठवतात. साधकांनी अशा प्रकारे ‘व्हॉट्सॲप’वर लिखाण न पाठवता ते संकलन विभागाच्या इमेल पत्त्यावर पाठवावे.

ए. बर्‍याच वेळा साधकांचे वाढदिवस, मुंज, विवाह यांविषयीच्या धारिका ऐनवेळी येतात. त्यामुळे संकलन विभागाला इतर नियोजित सेवा थांबवून या धारिकांचे संकलन करावे लागते. अशा धारिका संकलन विभागाकडे न्यूनतम ३ आठवडे आधी येणे अपेक्षित आहे.

ऐ. निधन झालेल्या साधकांविषयीचे लिखाण त्यांच्या कुटुंबियांनी आणि साधकांनी लवकर पाठवले, तर ते निधनानंतरच्या १० व्या किंवा १२ व्या दिवशी छापणे शक्य होते. बर्‍याच वेळा हे लिखाण २ – ३ दिवस आधी आल्यामुळे संकलन करून ते दैनिकामध्ये प्रसिद्ध करतांना पुष्कळ घाई होते. असे लिखाण पाठवतांना सोबत मृत साधकाचे छायाचित्र पाठवावे. लिखाणात त्यांच्या वयाचा उल्लेख करावा. ‘मृत साधकाचा १२ वा आणि १३ वा कधी आहे ? लिखाण कोणत्या दिवशी प्रसिद्ध करायचे आहे ?’, हेही धारिकेत लिहावे. संकलन विभागाकडे अपुरी माहिती आल्यास सर्व पूर्तता करण्यासाठी समन्वयक साधकांना पुष्कळ वेळ द्यावा लागतो.’

– संकलन विभाग, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.१.२०२२)