‘ऑनलाईन’ सत्संगात सहभागी झालेले पुणे येथील वाचक, जिज्ञासू आणि हितचिंतक यांना आलेल्या अनुभूती

‘१९ आणि २०.१२.२०२० या दिवशी पश्चिम महाराष्ट्रातील जिज्ञासूंसाठी ‘ऑनलाईन’ सत्संग सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी पुणे येथील जिज्ञासूंनी व्यक्त केलेले मनोगत आणि त्यांना आतापर्यंत आलेल्या अनुभूती, तसेच हा सोहळा पहातांना त्यांना आलेल्या अनुभूती यांविषयीची सूत्रे येथे दिली आहेत. २१ जानेवारी या दिवशी आपण काही जिज्ञासूंच्या अनुभूती पाहिल्या. आज पुढील अनुभूती पाहूया.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/545602.html

सौ. सुप्रिया समेळ, कोथरूड, पुणे.

१. सत्संगामुळे घरातील चैतन्य वाढणे आणि नामजपाने मानसिक ताण दूर होणे : ‘दळणवळण बंदी चालू झाल्यापासून मला प्रतिदिन सत्संग ऐकायला मिळाला. त्यामुळे घरातील चैतन्य वाढले. घरातील सर्वांची साधना चालू झाली. मला येणारा मानसिक ताण नामजप केल्याने दूर झाला. साधना करण्यासाठी माझा उत्साह वाढला. आता मला सर्व सत्संग गुरुदेवांच्या कृपेने ऐकायला मिळत आहेत.’

२. सत्संग ऐकू लागल्यावर आणि नामजप करू लागल्यावर तीव्र शारीरिक त्रास दूर होणे : मला कमरेत चमक येऊन वेदना होत असल्याने सतत झोपून रहावे लागायचे. या सततच्या शारीरिक त्रासामुळे चक्कर येणे, सतत थकवा असणे, असे त्रासही मला जाणवू लागले. मला प्रत्येक २ – ३ मासांनी आधुनिक वैद्यांकडे जावे लागायचे. मला झोपेची गोळी घ्यावी लागायची. मी सत्संग ऐकण्यास आणि नामजप करण्यास प्रारंभ केल्यानंतर एकदाही आधुनिक वैद्यांकडे गेले नाही. गुरुदेवांनीच मला या त्रासातून बाहेर काढले. मी आरंभी नामजप करायला १५ मिनिटे बसले, तरी मला त्रास होत असे. आता सत्संग मिळाल्यामुळे देवच प्रतिदिन माझ्याकडून दोन ते अडीच घंटे नामजप करवून घेत आहे. ही केवळ गुरुदेव आणि परमेश्वर यांची कृपा आहे.’

श्रीमती लता खोपडे, सातारा रस्ता

१. सत्संगामुळे जाणवलेले पालट

अ. ‘पूर्वी माझ्यात पुष्कळ आळस होता. मी दिवसा २ घंटे झोपत असे; परंतु आता मला पुष्कळ उत्साह वाटतो. मला काम करतांना आनंद जाणवतो आणि शीण येत नाही.

आ. पूर्वी माझी मुलगी चिडचिड करायची. ती आता चिडचिड करत नाही.

इ. घरी मी आणि मुलगी दोघीच असतो. त्यामुळे माझ्या मनात चिंता, काळजी आणि भीती असायची; परंतु सत्संग ऐकल्यापासून माझ्या मनातील भीती आणि काळजी नाहीशी झाली. घरातील वातावरणही पालटलेले जाणवते.

ई. मला नामजप करावासा वाटतो. प्रार्थनेचे महत्त्व माझ्या लक्षात आले. प्रत्येक कृती करण्यापूर्वी माझ्याकडून प्रार्थना होऊ लागली. माझ्या मनाची सकारात्मकता वाढली.

२. सत्संगामुळे मला प्रत्येक सणाची चांगली माहिती मिळाली. आता सण साजरे करतांना देवतेचे अस्तित्व अनुभवता आल्याने मला आनंद मिळू लागला.’

सौ. तृप्ती पाटील, सातारा रस्ता

१. ‘सत्संग ऐकू लागल्यापासून माझा नियमितपणे नामजप होत आहे.

२. सेवा करण्याचे महत्त्व समजल्यानंतर मी सेवा करण्यास आरंभ केला.

३. घरातील देवघराच्या रचनेत पालट केल्याने मला चांगले वाटले आणि माझा नामजप भावपूर्ण होतो.’

सौ. विद्या पंडित, सिंहगड रस्ता

१. ‘सत्संगात सांगितल्याप्रमाणे प्रत्येक कृती केल्यामुळे मला पुष्कळ आनंद मिळू लागला.

२. माझा परात्पर गुरु डॉक्टरांप्रती भाव वाढला. मला प.पू. गुरुदेवांचे नुसते स्मरण झाले, तरी माझा भाव जागृत होतो.

३. परात्पर गुरु डॉक्टरांच्या जन्मोत्सव सोहळ्याचे संगणकीय प्रणालीद्वारा प्रक्षेपण पहाण्यास कार्यक्रमाच्या ठिकाणी येत असतांना मला चंदनाचा सुगंध आला.’ (क्रमशः उद्याच्या अंकात)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक