वर्ष १८९७ मध्ये साथीच्या आजारामुळे जोतिबाची यात्रा बंद केल्याविषयी प्रसिद्ध केलेला जाहीरनामा

‘नंबर ७५ – सर्व लोकांस कळण्याकरता या जाहीरनाम्यातून प्रसिद्ध करण्यात येते की, प्रस्तुत मुंबई, पुणे इत्यादी बर्‍याच ठिकाणी ग्रंथिक संनिपात तापाचा आजार (ब्युबॉनिक प्लेग) चालू असून काही ठिकाणी पटकीच्या आजाराचाही आरंभ झाला आहे. दुष्काळामुळे सर्वत्र वैरणीची तूट झाली असून ती फार महाग मिळते, तर कुठे कुठे ती मिळत नाही. या सर्व कारणांमुळे येत्या चैत्र शुद्ध १५ या दिवशी कोल्हापूरनजीक वाडी रत्नागिरी ऊर्फ जोतिबाच्या डोंगरावर होणारी श्री केदारलिंगची यात्रा बंद करण्यात आली आहे. तेथे कुणाही यात्रेकरूस जाऊ दिले जाणार नाही.’

श्रीमन्महाराज छत्रपती साहेब सरकार करवीर यांच्या आज्ञेवरून,
एम्. कुवरजी,
दिवाण सरकार करवीर.
(जनरल खाते, १० मार्च १८९७)

महामारीपासून रक्षण होण्यासाठी ‘साधना’ हाच एकमेव पर्याय !

‘वर्ष १८९७ मध्ये आलेली ‘ब्युबॉनिक प्लेग’ची महामारी, त्यानंतर वर्ष १९२० मध्ये आलेली ‘प्लेग’ची साथ आणि आता ‘कोरोना’ची साथ, या तिन्ही वेळी देवतांची मंदिरे बंद ठेवण्यात आली. यामागील मुख्य कारण होते ते म्हणजे मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येतात आणि त्यामुळे साथीचा प्रादुर्भाव वाढू शकतो; मात्र एखाद्या रोगाची साथ आल्यावर सरकारकडून मंदिरे बंद ठेवणे किंवा दळणवळण बंदी घोषित करणे, असे वरवरचे आणि तात्कालिक उपाय केले जातात. असे उपाय करून फारसा लाभ होत नाही, हे आतापर्यंतच्या अनुभवावरून लक्षात आले आहे. त्यासाठी कायमस्वरूपीच उपाययोजना हवी आणि ती साधनेद्वारेच शक्य आहे; मात्र स्वातंत्र्यापासून आतापर्यंत कोणत्याही पक्षाच्या शासनकर्त्यांनी हिंदूंना साधना शिकवली नाही आणि धर्मशिक्षण दिले नाही. साधना आणि धर्माचरण केले, तरच ईश्वर सर्व संकटांपासून रक्षण करणार आहे, हे हिंदूंनी अन् शासनकर्त्यांनी जाणले पाहिजे.’