जनरल बिपीन रावत यांच्यानंतर त्याच क्षमतेचे नवे नेतृत्व देशाला मिळेल ! – (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

  • ‘बाह्य शत्रू आणि अंतर्गत देशद्रोही यांपासून भारताची सुरक्षा’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद !

  • हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी  हिंदु जनजागृती समिती

(निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

मुंबई – भारताचे चीफ ऑफ डिफेंस स्टाफ (तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख) जनरल बिपीन रावत यांनी तिन्ही दलांचे एकत्रीकरण करून देशाच्या अंतर्बाह्य शत्रूंच्या विरोधात एक प्रभावी यंत्रणा सिद्ध केली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उरी, म्यानमार आणि डोकलाम येथे यशस्वी सैन्य कारवाई करण्यात आली होती. त्यांच्या प्रयत्नांमुळे येत्या दोन-अडीच वर्षांत देशाच्या सर्व अडचणी दूर झाल्या असत्या; मात्र त्यांच्या अकाली जाण्यामुळे त्यावर परिणाम झाला असला, तरी जनरल रावत यांच्यानंतर तेवढ्याच क्षमतेचा अभ्यासू, तज्ञ, अनुभवी आणि कौशल्य असलेला नवीन सैन्याधिकारी ‘सी.डी.एस्.’ (चीफ ऑफ डिफेंस स्टाफ) पदावर निवडला जाईल अन् तो राहिलेले कार्य यशस्वीपणे पुढे नेईल. भारताच्या पुढील कार्यावर विपरित परिणाम होऊ दिला जाणार नाही, असे प्रतिपादन युद्ध सेवा पुरस्कार प्राप्त (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी केले. हिंदु जनजागृती समितीने १२ डिसेंबर या दिवशी आयोजित केलेल्या ‘बाह्य शत्रू आणि अंतर्गत देशद्रोही यांच्यापासून भारताची सुरक्षा’ या विषयावरील ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवादात ते बोलत होते.

या परिसंवादात सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता पृथ्वी चौहान, ‘भारत रक्षा मंच’चे राष्ट्रीय सचिव श्री. अनिल धीर आणि हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश अन् राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी त्यांचे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. गुरुराज प्रभु आणि श्री. विनोद गादीकर यांनी केले. हा ऑनलाईन कार्यक्रम ३ सहस्र १४४ जणांनी पाहिला.

जनरल रावत यांच्या निधनानंतर आनंद व्यक्त करणार्‍या जिहाद्यांच्या विरोधात देशप्रेमींनी एकत्र यावे ! – अधिवक्ता पृथ्वी चौहान, सर्वोच्च न्यायालय

अधिवक्ता पृथ्वी चौहान

सी.डी.एस्. जनरल बिपीन रावत हे ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेअंतर्गत तिन्ही सैन्य दलांचे सक्षमीकरण करत होते. ते अडीच आघाड्यांवर म्हणजे एक मोर्चा पाकविरोधात, दुसरा मोर्चा चीनविरोधात आणि अर्धा मोर्चा देशद्रोह्यांच्या विरोधात लढत होते. जिहादी नेत्यांना घरात घुसून मारले जात होते. त्यामुळे जनरल रावत यांच्या निधनानंतर जिहादींना आनंद होत आहे; मात्र देशप्रेमींनी एकत्र येऊन त्यांना उत्तर द्यायला हवे.

नागरिकांनी सैनिकांना पाठिंबा देऊन त्यांचे मनोबल राखण्यासाठी प्रयत्न करावेत ! – अनिल धीर, राष्ट्रीय सचिव, भारत रक्षा मंच

श्री. अनिल धीर

सी.डी.एस्. जनरल बिपीन रावत यांच्या निधनावर आनंद व्यक्त करणारे जिहादी प्रवृत्तीचे लोक पूर्वी सैन्यदलावर बलात्काराचे, काश्मीरमधील वाट चुकलेल्या तरुणांना ठार मारत असल्याचे आरोप करून सैनिकांचे खच्चीकरण करायचे. त्यांच्या जोडीला साम्यवादी, चीनसमर्थक, आतंकवादी आणि फुटीरतावादी लोक विविध वृत्तवाहिन्यांवर चर्चा करून सैन्याचे मनोबल न्यून करण्याचा प्रयत्न करत होते. जे सैनिक स्वत:चे जीवन धोक्यात घालून देशाचे रक्षण करत आहेत, त्यांच्याविषयी अवमानकारक बोलणे चुकीचे आहे. सामान्य नागरिक सीमेवर जाऊन लढाई करू शकत नाही, पण सैनिकांना पाठिंबा देऊन त्यांचे मनोबल राखण्यासाठी प्रयत्न नक्कीच करू शकतात. ते नागरिकांनी करावे.

देशविरोधात कार्य करणार्‍या अंतर्गत शत्रूंवर कठोर कारवाई होण्यासाठी केंद्रशासनाने नवा कायदा करावा ! – आनंद जाखोटिया, मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

श्री. आनंद जाखोटिया

आता युद्धनीतीत पालट झाला आहे. त्यामुळे सीमेवरील शत्रूंसह अंतर्गत देशद्रोह्यांविरूद्धही सैन्याला लढावे लागत आहे. त्रिपुरामध्ये मशीद पडल्यावर महाराष्ट्रात धर्मांधांनी ६ ठिकाणी दंगली केल्या. पुढे अशा घटना आणखी वाढतील. अराजकता पसरवणार्‍यांच्या विरोधात देशवासियांना मोठा संघर्ष करावा लागणार आहे. सैन्याचा अपमान करणारे आणि देशाच्या विरोधात कार्य करणार्‍या अंतर्गत शत्रू यांच्यावर कठोर कारवाई  होण्यासाठी केंद्रशासनाने नवीन कायदा केला पाहिजे. तसेच सर्व देशप्रेमींनी एकत्र येऊन देशद्रोह्यांना सडेतोड उत्तर दिले पाहिजे.