केंद्र सरकारने धर्मांतरविरोधी राष्ट्रीय कायदा आणावा आणि कुठल्याही प्रकारचे धर्मांतर अवैध ठरवले जावे ! – महामंडलेश्वर आचार्य स्वामी श्री प्रणवानंद सरस्वतीजी महाराज

‘राष्ट्रव्यापी धर्मांतरबंदी कायदा आणावा !’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद

श्री प्रणवानंद सरस्वतीजी महाराज

पुणे – सनातन धर्म हा महान धर्म आहे. सनातन धर्मावर ख्रिस्ती मिशनरी आणि मुसलमान धर्मांतराच्या माध्यमातून आक्रमणे करत आहेत. आमची वैचारिकता, राष्ट्रीय आणि सांस्कृतिक चेतना नष्ट करण्यासाठी अन्य धर्मीय कार्यरत आहेत. आपली संस्कृती, वैज्ञानिक संपदा, भौतिक शक्ती आपल्या कह्यात घेण्याचा ते प्रयत्न करत आहेत. केवळ धर्मांतरापुरता हा विषय मर्यादित नसून पूर्ण भारताला स्वत:च्या अधीन करण्याचे हे षड्यंत्र आहे. आपल्या पूर्वजांवर कितीही आक्रमणे झाली, तरी त्यांनी स्वतःचे धर्मांतर होऊ दिले नाही. या धर्मांतराविरोधात राष्ट्रव्यापी आंदोलन उभे केले पाहिजे, तसेच भारताला सुरक्षित करण्यासाठी सरकारने धर्मांतराच्या विरोधात राष्ट्रीय कायदा आणावा, धर्मांतर अवैध ठरवले जावे, अशी मागणी इंदौर येथील ‘श्री अखंडानंद आदिवासी गुरुकुल आश्रमा’चे महामंडलेश्वर आचार्य स्वामी श्री प्रणवानंद सरस्वतीजी महाराज यांनी केली. हिंदु जनजागृती समितीने नुकत्याच आयोजित केलेल्या ‘राष्ट्रव्यापी धर्मांतरबंदी कायदा आणावा’ या ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवादात ते बोलत होते.

या परिसंवादात श्रीक्षेत्र द्वारापूर, धारवाड येथील श्री परमात्मा महासंस्थानमचे श्रीगुरु परमात्माजी महाराज, ‘अखिल भारतीय घरवापसी’ संघटनेचे प्रमुख आणि भाजपचे छत्तीसगड प्रदेशमंत्री प्रबल प्रताप सिंह जुदेव आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. मोहन गौडा यांनीही त्यांचे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे श्री. वैभव आफळे यांनी केले. या कार्यक्रमाचा लाभ २ सहस्र ३०० जणांनी घेतला.


धर्मांतर हे भारताला विभाजनाच्या दिशेने घेऊन जात असल्याने ते रोखण्यासाठी हिंदु धर्माचा प्रसार करणे आवश्यक ! – मोहन गौडा, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

श्री. मोहन गौडा

कर्नाटक राज्यात धर्मांतरबंदी कायदा लागू होऊ नये, यासाठी ख्रिस्ती मिशनरी प्रयत्न करत आहेत. धर्मांतरबंदी कायदा आणण्याची मागणी येथील हिंदुत्वनिष्ठ संघटना करत आहेत. केवळ कर्नाटकच नव्हे, तर संपूर्ण देशभरात धर्मांतरबंदी कायदा आणला जावा, यासाठी हिंदु जनजागृती समिती विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांसह कार्य करत आहे. धर्मांतर हे भारताला विभाजनाच्या दिशेने घेऊन जाईल, हे लक्षात घेतले पाहिजे. धर्मांतराचा प्रयत्न केला जाणार्‍या ठिकाणी सनदशीर मार्गाने विरोध करण्यासाठी हिंदूंनी पुढे आले पाहिजे.


मंदिरांतून हिंदूंना आपल्या धर्माची तत्त्वे आणि मूलभूत ज्ञान दिले गेले पाहिजे ! – परमात्माजी महाराज, श्रीक्षेत्र द्वारापूर, धारवाड येथील श्री परमात्मा महासंस्थानमचे श्रीगुरु

परमात्माजी महाराज

प्रतिदिन भारतात २ सहस्र ५०० ते ३ सहस्र हिंदूंचे धर्मांतर होते. हे थांबवण्यासाठी कायदा आणायला हवा. हिंदु धर्मावरील हा आघात रोखण्याासाठी हिंदु बांधवांनी पुढे येऊन सरकारवर यासाठी दबाव निर्माण केला पाहिजे. सध्या दूरचित्रवाहिनीवरील (टी.व्ही.वरील) विविध कार्यक्रमांतून हिंदु धर्माची अवहेलना केली जाते. हिंदूंनी याविषयी सतर्क असले पाहिजे. ठिकठिकाणी मंदिरांतून हिंदूंना धर्माची तत्त्वे, मूलभूत ज्ञान दिले गेले पाहिजे.


धर्मांतर हे भयानक षड्यंत्र असून ख्रिस्ती मिशनरी सेवेच्या नावाखाली हिंदूंना फसवत आहेत ! – प्रबल प्रताप सिंह जुदेव, ‘अखिल भारतीय घरवापसी’ संघटनेचे प्रमुख आणि भाजपचे छत्तीसगड प्रदेशमंत्री

प्रबल प्रताप सिंह जुदेव

धर्मांतर हे एक भयानक षड्यंत्र असून ख्रिस्ती मिशनरी सेवेच्या नावाखाली व्यवहार करत आहेत. हिंदूंना फसवत आहेत. राष्ट्रविरोधी शक्ती देश तोडण्यासाठी प्रयत्नरत आहेत. हिंदूंनी विशेषत: युवांनी हे सर्व संपवण्यासाठी पुढे आले पाहिजे. आमच्या संघटनेच्या माध्यमातून धर्मांतरित झालेल्या हिंदूंना हिंदु धर्मात पुनर्प्रवेश दिला जातो. यापुढेही हे कार्य चालू ठेवू.