एकादशीचे माहात्म्य

आज (१५ नोव्हेंबर २०२१ या दिवशी) असलेल्या कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने…

१. आषाढ आणि कार्तिक मासांतील एकादशींचे महत्त्व

कोणत्या तरी विशिष्ट वारीला, तिथीला अथवा कोणत्या तरी मासात विशिष्ट देवतांची स्पंदने पृथ्वीवर अधिक प्रमाणात कार्यरत असतात. तो काळ त्या देवतेचा काळ मानला जातो, उदा. शिवाचा सोमवार, दत्ताचा गुरुवार, तशी श्रीविष्णूची एकादशी ! वर्षभरात २४ वेळा येणार्‍या एकादशींच्या तुलनेत आषाढ आणि कार्तिक मासांतील शुक्ल पक्षात येणार्‍या एकादशींच्या वेळी श्रीविष्णूचे तत्त्व पृथ्वीवर अधिक प्रमाणात येत असल्याने श्रीविष्णूशी संबंधित या २ एकादशींचे महत्त्व अधिक आहे.

परात्पर गुरु परशराम माधव पांडे

२. संत एकनाथ महाराज यांनी एकादशीचे केलेले वर्णन

अ. एकादशीचा जो जो उत्सव केला जातो, तो तो भगवंताला पोचतो. भगवंत म्हणतो, जो एकादशीचे व्रत करतो, त्याच्या घरी मी नित्य रहातो. एकादशी सर्व पर्वकाळात श्रेष्ठच आहे. एकादशीचे व्रत करणारा सर्व व्रते आणि तीर्थे यांचा राजाच आहे. तो माझ्या कुटुंबातीलच एक आहे. मला तो फार प्रिय आहे.

आ. चातुर्मासातील सर्व एकादशी तिथी आणि निरनिराळ्या जयंती यथाशास्त्र करणे योग्य आहे. शयनी, प्रबोधिनी, पवित्रा इत्यादी एकादशी, तसेच कटिनी, निराजनी, वसंतदमनका रोपणी इत्यादी जयंती यांच्या विविध पर्वकाळी विविध पूजा बांधाव्यात. आरती आणि दीपमाळा प्रज्वलित कराव्यात. टाळ आणि मृदंग वाजवून उत्सव करावा. उत्साहाने दिंड्या, पताका, ध्वज इत्यादी घेऊन नामघोष करत पांडुरंगाच्या दर्शनयात्रेला जावे; कारण या देवाच्या यात्रेला जो जातो, तो जणू देवच आपल्या घरी आणतो आणि आपल्या आवडत्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतो.’

(साभार : सार्थ श्री एकनाथी भागवत, अध्याय ११, ओवी १२६६ ते १२८२)

संत एकनाथ महाराज म्हणतात, भागवताच्या अकराव्या स्कंधाच्या अकराव्या अध्यायात भगवंताची ११ पूजास्थाने सांगितली आहेत. सूर्य, अग्नी, ब्राह्मण, गाय, वैष्णव, आकाश, वायू, जल, पृथ्वी, स्वतःचा आत्मा
आणि सर्व प्राणिमात्र अशी ११ पूजास्थाने आहेत.’

(साभार : सार्थ श्री एकनाथी भागवत, अध्याय ११, ओवी १३२८)

३. एकादशीमधील अकरा (११) या अंकाचे वर्णन

अ. अकराव्या पूजास्थानाची, म्हणजे सर्व भुतांची पूजा करावी’, असे संत एकनाथांनी म्हटले आहे. पहिला १ हा पूज्य’ (भगवंत, परमात्मा) आणि दुसरा १ हा पूजक (आत्मा) आहे.’ पूज्य आणि पूजक दोन्हीकडे एकच (१)’ आहे, म्हणजे ऐक्य झाले. ११ हा आकडा १० इंद्रिये आणि १ मन मिळून देहातील जाणिवेचे प्रतीक आहे. ती जाणीव सर्व प्राणिमात्रांत आहे; म्हणून त्याने सर्व भुतांची पूजा होते. जो स्वतःचे सर्व भोग भगवंताला अर्पण करण्याची भावना ठेवतो, तोच आत्मतत्त्व जाणतो. तेच सर्वत्र समत्वाने आहे.’

(साभार : सार्थ श्री एकनाथी भागवत, अध्याय ११, ओवी १४४७ ते १४४९)

आ. हे यदुश्रेष्ठ उद्धवा, सर्व भूतमात्रांची समत्वभावाने पूजा करणे ही माझीच पूजा आहे. त्या पूजेने माझा भक्त आवडीने मद्रूप होतो. या अकराही पूजा समत्वरूपच आहेत.’

(साभार : सार्थ श्री एकनाथी भागवत, अध्याय ११, ओवी १४५५)

इ. दहा इंद्रिये आणि एक मन संपूर्णत पांडुरंगाला अर्पण करणे म्हणजे एकादशी ! आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी या तिथींना पंढरपूरची यात्रा असते. पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारकर्‍यांनी एकादशी करावयाची (एक + दहा) म्हणजे एक मन आणि दहा इंद्रिये संपूर्णतः पांडुरंगाला अर्पण करायची. या ओढीनेच तो वारकरी या ठरलेल्या वाराला पांडुरंगाकडे जाण्यासाठी निघतो; म्हणून ती वारी आणि अशा भावनेने अन् पांडुरंगाच्या ओढीने ही वारी नियमितपणे प्रतिवर्षी करणारा तो वारकरी !’

संकलक : परात्पर गुरु परशराम माधव पांडे

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ पंढरीचा पहिला वारकरी (पांडुरंग)’)