‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था बंद करून हे प्रमाणपत्र देणार्‍या सर्व संस्थांची चौकशी करा !

मा. पंतप्रधान यांच्याकडे हिंदु जनजागृती समितीची मागणी

१. तहसीलदार म्हात्रे यांना निवेदन देतांना राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी नागरिक

सावंतवाडी, २९ ऑक्टोबर (वार्ता.) – सध्या भारतात धर्मांधांकडून प्रत्येक पदार्थ, वस्तू इस्लामनुसार वैध अर्थात् ‘हलाल’ असण्याची मागणी केली जाऊ लागली आहे. ही मागणी केवळ मांसापुरती मर्यादित राहिली नसून ‘धान्य, फळे, सौंदर्यप्रसाधने, औषधे’ आदी उत्पादनेही ‘हलाल’ नामांकित असावीत,’ अशी मागणी धर्मांध करत आहेत. याद्वारे भारतात समांतर आर्थिक व्यवस्था उभारण्याचे हे जागतिक षड्यंत्र आहे. धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित असणारी ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करावी आणि असे प्रमाणपत्र देणार्‍या सर्व संस्थांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यात आली आहे. याविषयीचे निवेदन सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, आता प्रत्येक वस्तू इस्लामनुसार वैध अर्थात ‘हलाल’ असण्याची मागणी केली जाऊ लागल्याने व्यापार्‍यांना आवश्यकता नसतांनाही प्रत्येक उत्पादनासाठी २१ सहस्र ५०० रुपये भरून ‘हलाल’ प्रमाणपत्र घ्यावे लागत आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हे प्रमाणपत्र अन्न आणि औषध प्रशासनाकडून नव्हे, तर ‘जमियत-उलेमा-ए-हिंद’ या धर्मांध संघटनेकडून दिले जाते. या ‘हलाल’ अर्थव्यवस्थेने विश्वभरात दबदबा निर्माण केला असून तिने भारताच्या अर्थव्यवस्थेइतका म्हणजे २ ट्रिलीयन ‘डॉलर्स’चा (१३० लाख कोटी रुपयांहून अधिकचा) टप्पाही गाठला आहे.

या वेळी सावंतवाडी शिवसेना विभागप्रमुख नामदेव नाईक, निवृत्त प्राध्यापक सुभाष गोवेकर, हिंदु जनजागृती समितीचे चंद्रकांत बिले, जीवन केसरकर आदी उपस्थित होते.