गांजा ओढणार्‍या भोंदू बाबांनाही कारागृहात डांबा ! – केंद्रीय मंत्री रामदास आठवले

लपून छपून गांजा ओढणार्‍या आणि लाचखोरी करणार्‍या भ्रष्ट, तसेच तत्त्वहीन राजकीय नेत्यांनाही कारागृहात डांबणे आवश्यक आहे, असेही जनतेला वाटते ! – संपादक 

केंद्रीय मंत्री रामदास आठवले

नवी देहली – कायद्यापुढे सगळे समान असतात. मग तो शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन असो कि कुंभमेळ्यात गांजा ओढणारे भोंदू बाबा. त्यांना कारागृहात डांबावे आणि सामाजिक न्याय विभागाच्या भूमिकेनुसार त्यांना व्यसनमुक्ती केंद्रात भरती करावे. आश्रमात अमली पदार्थांची खरेदी-विक्री होत असेल, तर अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (‘एन्.सी.बी.’ने) तेथेही कारवाई करावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे केले.

आठवले आरोप करतांना म्हणाले की, एन्.सी.बी.चे अधिकारी समीर वानखेडे हे दलित असल्यामुळेच महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे त्यांना लक्ष्य करत आहेत. स्वत:च्या जावयाला अमली पदार्थ प्रकरणी अटक केल्यामुळे खवळलेल्या नवाब मलिक यांनी वानखेडे यांना अपकीर्त करण्याचे षड्यंत्र रचले आहे.