व्यष्टी साधना आणि भावजागृतीसाठी नियमित प्रयत्न करणारा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कु. अर्णव कुलकर्णी (वय ९ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. अर्णव कुलकर्णी हे  आहेत!

सोलापूर येथील सनातनच्या सेवाकेंद्रात  रहाणारा ५७ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. अर्णव कुलकर्णी याच्याविषयी ६९ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. दीपाली मतकर यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

कु. अर्णव कुलकर्णी

(‘कु. अर्णवची आध्यात्मिक पातळी वर्ष २०१७ मध्ये ५१ टक्के आणि वर्ष २०१८ मध्ये ५३ टक्के होती.’ – संकलक)

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

१. प्रेमभाव

‘कु. अर्णव सोलापूर येथील सनातनच्या सेवाकेंद्रात रहातो. तो सतत उत्साही आणि आनंदी असतो. त्याच्यात पुष्कळ प्रेमभाव आहे. महाप्रसाद घेतांना ‘सेवाकेंद्रातील सर्व साधक आले आहेत ना ?’, हे तो पहातो. आले नसल्यास त्यांना बोलावणे, बसण्यासाठी आसनपट्टया घालणे आदी सेवा तो करतो. कुणाला शारीरिक त्रास होत असल्यास तो त्यांची प्रेमाने चौकशी करतो.

२. इतरांना साहाय्य करणे

तो साधकांना सेवेत साहाय्य करतो. साधकांनी त्याला काही साहित्य आणून देण्यास सांगितले, तर तो कंटाळा न करता लगेच आणून देतो. नामजपाच्या वेळेत कुणाला झोप येत असल्यास त्यांना उठवून तोंड धुऊन येण्यास सांगतो.

३. व्यष्टी साधनेच्या संदर्भातील सतर्कता

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

३ अ. आज्ञापालन करणे : सदगुरु स्वाती खाडये यांनी सेवाकेंद्रातील सर्वांना ‘दुपारी आणि रात्री महाप्रसाद झाल्यावर स्वभावदोषांची सारणी लिखाण करूनच पुढील सेवा करूया’, असे सांगितले आहे. अर्णव महाप्रसाद झाल्यावर त्याची लिखाणाची पिशवी घेऊन पुष्कळ उत्साहाने सारणी लिखाणासाठी जातो. तो सर्वांना ‘सगळे जण सारणी लिखाण करायला चला’, असे सांगतो. त्याचा उत्साह पाहून सर्व साधक सारणी लिखाण करतात.

३ आ. नियमित दैनंदिनी लिहिणे : सेवाकेंद्रातील सर्व साधकांना दैनंदिनी लिहून ती रात्री १० वाजता खोक्यात ठेवण्यास सांगितले आहे. अर्णवही स्वतःची दैनंदिनी लिहून खोक्यात ठेवतो. ‘दैनंदिनीचे रकाने कसे आखायचे’, हे त्याने साधिकांकडून शिकून घेतले आणि त्याप्रमाणे दैनंदिनी लिहिण्यासाठी प्रयत्न केले.

३ इ. स्वतःच्या आणि इतरांच्या चुका सांगणे : लहान असूनही त्याला स्वतःच्या आणि इतरांच्या चुका लगेच लक्षात येतात. चूक सांगितल्यावर तो ती चूक फलकावर लिहितो. कुणाकडून एखादी चूक झाल्यास तो ती लगेच सांगतो.

४. आश्रमात काही अव्यवस्थित दिसल्यास अर्णव लगेच ते साहित्य फलकासमोर ठेवतो आणि त्याविषयीची सूचना फलकावर लिहितो.

५. सद्गुरु स्वाती खाडये यांच्याप्रती भाव

सद्गुरु स्वातीताईंविषयी त्याच्या मनात पुष्कळ कृतज्ञताभाव आहे. ‘त्या येणार’, हे कळल्यावर त्याला पुष्कळ आनंद होतो. ‘मी काय करू आणि किती करू ?’, असे त्याला होते. तो स्वच्छतेची सेवा करण्यासाठी सिद्ध होतो. सदगुरु ताई आल्यावर ‘त्यांना बाटलीत गरम पाणी भरून देणे, त्यांना लिखाणाचे साहित्य देणे, तसेच त्यांच्या खोलीत पाणी भरून ठेवणे’, या सेवा तो पुष्कळ उत्साहाने करतो.

६. भावजागृतीसाठी अर्णव करत असलेले प्रयत्न

कु. दीपाली मतकर

६ अ. साधकांसह नामजपाला बसणे : सर्व साधक नामजप करतात. त्या वेळी अर्णवही नामजपाला बसतो. त्याला जपाला बसण्यास आवडत नाही, तरी तो बसतो. त्या वेळी तो वहीत नामजप, प्रार्थना, कृतज्ञता आणि भावप्रयोग लिहितो. त्याची वही वाचल्यावर भावजागृती होते.

६ आ. अर्णव करत असलेली भावार्चना : बैठक चालू होण्याआधी साधक भावार्चना (भावप्रयोग) करतात. अर्णवही भावपूर्ण प्रार्थना आणि भावार्चना तयार करतो. तो त्याच्या भाषेत कविताही करतो. तो प्रतिदिन वहीत निराळी भावार्चना लिहून काढतो आणि सत्संगात ती भावपूर्णपणे सांगतो. ती ऐकतांना पुष्कळ भावजागृती होते.

७. अन्य सूत्रे

७ अ. सेवेसाठी आवश्यक तेवढेच शिक्षण घेण्याची इच्छा असणे : दळणवळण बंदीच्या काळात शाळा बंद असल्यामुळे अर्णव शाळेत जात नाही. याविषयी विचारल्यावर ‘तुमच्यासारखी भ्रमणभाष आणि भ्रमण संगणक (‘लॅपटॉप’वर) यांवर सेवा करता येण्यापुरते मला शिकायचे आहे’, असे तो सांगतो. शाळेतील मुले त्रास देत असल्याने अर्णवला शाळेत जायला आवडत नाही.

७ आ. अर्णवचे खेळ – मोठ्या साधकांप्रमाणे सभेचे नियोजन करून वेगवेगळ्या समित्या तयार करून बैठकाही घेणे : सोलापूर येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रसाराची सेवा चालू असतांना त्याविषयीचे नियोजन चालू होते. त्यासाठी बैठका घेणे, सेवांचे वर्गीकरण करणे आदी सेवा चालू होत्या. त्या वेळी अर्णवनेही नियोजन केले. सभेसाठी बैठक व्यवस्था, मैदान सेवा, प्रसार सेवा इत्यादी समित्या तयार केल्या. तो त्यासंदर्भातील बैठकाही घ्यायचा. गाड्या लावून सभेचे मैदान सिद्ध करणे, तसेच वाहन व्यवस्था करणे, असे खेळ तो खेळायचा.’

– कु. दीपाली मतकर (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के), सोलापूर (६.६.२०२०)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता