केरळमधील मोपल्यांच्या दंगली हा ‘जिहाद’च होता ! – अधिवक्ता कृष्ण राज, केरळ उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय

‘मोपला दंगली : हिंदु नरसंहाराची १०० वर्षे !’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी  हिंदु जनजागृती समिती

अधिवक्ता कृष्ण राज

मुंबई – वर्ष १९२१ मध्ये झालेल्या मोपला दंगलीची पार्श्वभूमी पहिल्या महायुद्धापासूनची आहे. या दंगलीमध्ये सरकारी कर्मचारी, पोलीस आणि तत्कालीन ब्रिटीश सैनिक यांवर आक्रमणे करण्यात आली अन् हिंदूंचा मोठा नरसंहार करण्यात आला. ही दंगल जवळपास ६ मास चालली. धर्मांध जिहाद्यांनी ‘ही आमची चळवळ असून हा आमचा विजय होता’, असे घोषित केले; मात्र ती चळवळ नव्हती, तर तो ‘हिंदूंचा नरसंहार’च होता. ‘मोपला दंगलींमध्ये धर्मांधांनी हिंदूंवर अत्याचार केले; मात्र ‘हिंदु-मुसलमान ऐक्यासाठी’ हिंदूंनी हे अत्याचार सहन करावेत’, यांसारखी अनेक धक्कादायक वक्तव्ये मोहनदास गांधी यांनी केली. मोपला दंगली हा ‘जिहाद’चाच एक भाग होता, किंबहुना दंगलखोरांनीही हा ‘जिहाद’ असल्याचे मान्य केले होते’, असे प्रतिपादन केरळ उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता कृष्ण राज यांनी केले. ते हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘मोपला दंगली : हिंदु नरसंहाराची १०० वर्षे !’ या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात बोलत होते.

या विशेष संवादामध्ये ‘द धर्म डिस्पॅच’ चे संस्थापक-संपादक आणि लेखक श्री. संदीप बालकृष्ण, केरळमधील ‘अन्नपूर्णा फाऊंडेशन’चे अध्यक्ष श्री. बिनिल सोमसुंदरम् अन् हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे आदींनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे आणि हिंदु विधीज्ञ परिषदेच्या देहली येथील अधिवक्त्या अमिता सचदेवा यांनी केले. या विशेष संवादाचे थेट प्रक्षेपण २ सहस्र ७३३ जणांनी पाहिले.

प्रतिकार केल्यास हिंदूंना आतंकवादी ठरवले जाते ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

 

श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

१. आपल्या देशात खोटा प्रचार करण्याचा प्रयत्न केला जातो. गोध्रा आणि मुंबई येथेच दंगली झाल्या, असे सांगितले जाते. हिंदू जेव्हा आक्रमणाचा प्रतिकार करतात, तेव्हा त्या हिंदूंना ‘आतंकवादी’ म्हटले जाते.

२. विदेशी इतिहासकार स्टेफन डेल यांनी ‘मोपला दंगल हा ‘जिहाद’ होता’, असे म्हटले आहे. डॉ. आंबेडकर यांनीही ‘पाकिस्तान ऑर द पार्टीशन ऑफ इंडिया’ या पुस्तकात लिहिले आहे की, मोपला येथील दंगली धर्मांधांनी घडवून आणल्या. वर्ष १९२० मध्ये खिलाफत समितीची स्थापना प्रथम केरळमधील मलबार येथे करण्यात आली. ब्रिटीश काळातील जिल्हाधिकारी सी. गोपालन नायर यांनीही आपल्या प्राथमिक अहवालात मोपला दंगलीचे वर्णन केले आहे.

३. असे असतांनाही ‘मोपला दंगली’चा इतिहास लपवण्याचा प्रयत्न केला जातो, जेणेकरून हिंदु समाज अजूनही भ्रमात राहील. त्यामुळे हिंदूंनी सतर्क आणि जागृत रहायला हवे.

मोपल्यांनी केवळ दंगलच घडवली नाही, तर सुनियोजित पद्धतीने हिंदूंचे सामूहिक हत्याकांड केले ! – संदीप बालकृष्ण, लेखक आणि संस्थापक-संपादक, ‘द धर्म डिस्पॅच’

१. खिलाफत चळवळीच्या नावाखाली अली बंधूंनी ब्रिटिशांविरोधात ‘जिहाद’ पुकारून धर्मांधांना एकत्र केले. ब्रिटिशांनी अली बंधूंना कह्यात घेतल्यावर केरळमध्ये मोपला धर्मांधांनी भयंकर नरसंहार घडवून आणला.

२. मोपल्यांनी केवळ दंगलच घडवली नाही, तर सुनियोजित पद्धतीने हिंदूंचे सामूहिक हत्याकांड केले. या दंगलींत धर्मांध महिलांचाही सहभाग होता.

३. दुःखदायक गोष्ट म्हणजे मोपल्यांच्या या नरसंहाराची ‘मुसलमानांची ब्रिटीशांविरोधात राबवलेली चळवळ’ अशी इतिहासात नोंद केली गेली आणि केरळमधील पाठ्यपुस्तकांतही तसे शिकवले गेले; मात्र आता याविषयीचे खरे वास्तव समोर येत आहे.

मोपला दंगल म्हणजे इस्लामी सत्ता स्थापन करण्यासाठी धर्मांधांचा एक प्रयत्न ! – बिनिल सोमसुंदरम्, अन्नपूर्णा फाऊंडेशन

बिनिल सोमसुंदरम्

१. मोपला नरसंहारामध्ये उघडपणे हिंदूंवर अत्याचार करण्यात आले. इस्लामी सत्ता स्थापन करण्यासाठी ही दंगल घडवण्यात आली होती.

२. मोपला दंगलीला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केरळमधील हिंदूंनी या दंगलीत प्राण गमावलेल्या पूर्वजांचे श्राद्ध केले, तसेच विविध माध्यमांतून जागृती करण्याचा प्रयत्न केला.

३. शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याच्या चुकीच्या निर्णयाच्या विरोधात वर्ष २०१८ पासून केरळमध्ये आंदोलन करण्यात येत आहे. तेव्हापासून केरळमधील हिंदु समाज कोणताही राजकीय समूह किंवा अन्य कुणाचाही पाठिंबा नसतांना जागृत झाला आहे.