महाराजगंज (उत्तरप्रदेश) येथील गावात कोरोनाला दूर करण्यासाठी सकाळ-संध्याकाळ सूर्यदेवतेला दिले जात आहे अर्ध्य !

शासकीय यंत्रणा जनतेचे रक्षण करू शकत नसल्याने आता हिंदूंना देवालाच शरण जाणे भाग पडत आहे, त्याचेच हे एक उदाहरण ! यासमवेत हिंदूंना साधना करून आध्यात्मिक बळ वाढवले, तर अशा आजारांपासून देव त्यांचे रक्षण करील !

प्रतीकात्मक छायाचित्र

महाराजगंज (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होऊन रुग्णांचा मृत्यू होत आहे. राज्यातील महाराजगंज जिल्ह्यातील गौनरिया गावामध्ये कोरोनाला दूर करण्यासाठी नागरिकांनी सामूहिकरित्या सूर्यदेवतेला सकाळी आणि संध्याकाळी अर्ध्य देण्यास प्रारंभ केला आहे. ९ दिवसांचे हे अनुष्ठान असणार आहे. गावातील महिला आणि पुरुष गावाबाहेरील शेतात जाऊन हे अर्ध्य देत आहेत.
गावाच्या सरपंच भारती यांनी म्हटले की, आमची श्रद्धा आहे की, पूजा केल्याने ईश्‍वराची शक्ती मिळून कोरोना विषाणू समाप्त होईल. देवाला कुणी पाहिलेले नाही; मात्र आमची श्रद्धा आहे की, पूजा केल्याने हे संकट दूर होईल.