‘ज्यांच्या सान्निध्यात प.पू. गुरुदेवांचा सत्संग अनुभवता येतो’, असे सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम !

आपल्या अस्तित्वाने, चैतन्याने आणि अपार प्रीतीने साधकांंची साधना करून घेणारे अन् ‘ज्यांच्या सान्निध्यात प.पू. गुरुदेवांचा सत्संग अनुभवता येतो’, असे सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम !

चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा, म्हणजेच गुढीपाडवा या दिवशी (१३ एप्रिल २०२१) सद्गुरु सत्यवान कदम यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साधकांनी त्यांचे अनुभवलेले विविध गुण, तसेच त्यांनी अनुभवलेली सद्गुरूंची कृपा आणि अपार प्रीती त्यांच्या चरणी कृतज्ञताभावाने अर्पण करत आहोत.

सद्गुरु सत्यवान कदम यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

१. कु. पूजा दीपक धुरी, कुडाळ

कु. पुजा धुरी

१ अ. ‘दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचून शिकणे आणि शिकलेली गोष्ट कृतीत आणणे महत्त्वाचे आहे’, असे सांगून सद्गुरु सत्यवानदादांनी दैनिक वाचनाचे गांभीर्य लक्षात आणून देणे : मी काही कालावधीसाठी कुडाळ सेवाकेंद्रात रहायला गेले होते. सद्गुरु सत्यवानदादा सेवाकेंद्रातील साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेतात. सद्गुरूंच्या कृपेने मलाही या आढावा सत्संगामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. त्या वेळी त्यांनी आम्हाला दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वाचनाचे महत्त्व सांगितले. ते म्हणाले, ‘‘दैनिकातून आपण शिकले पाहिजे आणि शिकलेली गोष्ट आपल्या कृतीत आणली पाहिजे, तर ते खरे शिकणे होते. नाहीतर ते वरवरचे वाचणे होते.’’ त्यांच्या चैतन्यमय वाणीतील हे शब्द माझ्या अंतर्मनात कोरले गेले आणि दैनिक वाचनाचे गांभीर्यही लक्षात आले.

१ आ. ‘सद्गुरु सत्यवानदादा भेटल्यावर ‘साक्षात् प.पू. गुरुदेवच भेटले’, असे जाणवून भावजागृती होणे : एकदा सद्गुरु सत्यवानदादा धर्मप्रसारानिमित्त बाहेरगावी जाण्याच्या सिद्धतेत होते. अकस्मात् माझी त्यांच्याशी भेट झाली. तेव्हा ‘जणू साक्षात् प.पू. गुरुदेवच मला भेटले आणि त्यांनी ‘स्मितहास्य करून मला साधनेसाठी भरभरून आशीर्वाद दिला’, असे मला अनुभवता आले. आजही या प्रसंगाचे क्षणभरही स्मरण केले, तरी माझी भावजागृती होते.

१ इ. मनातील सद्गुरु भेटीची इच्छा जाणून सेवाकेंद्रातून घरी जातांना सद्गुरु सत्यवानदादा यांची प्रत्यक्ष भेट होणे : वर्ष २०१८ – १९ मध्ये मी एका शिबिरासाठी सेवाकेंद्रात गेले होते. दोन दिवसांचे शिबिर झाल्यावर ‘घरी जाण्याआधी सद्गुरु सत्यवानदादा यांच्याशी भेट व्हावी’, अशी माझ्या मनात तीव्र इच्छा होती. मी त्यांना मानस नमस्कार करून साधकांचा निरोप घेऊन सेवाकेंद्रातून निघतांना मला सद्गुरु सत्यवानदादा प्रत्यक्ष भेटले. सद्गुरु आपल्या अंतर्मनातील प्रत्येक विचार ओळखतात आणि ‘आपली लहानात लहान इच्छाही पूर्ण करतात’, हे मला यातून प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले.

१ ई. साधकांच्या छोट्या कृतीचेही भरभरून कौतुक करणे : डिसेंबर २०१९ मध्ये हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या सेवेनिमित्त रत्नागिरीतील साधक सेवाकेंद्रामध्ये आले होते. सभेची सेवा पूर्ण झाल्यावर साधक घरी जातांना मी एका साधिकेला एक शुभेच्छापत्र आठवण म्हणून दिले. साधिकेने ते सद्गुरु सत्यवानदादांना दाखवले. तेव्हा त्यांनी आम्हा दोघींचे भरभरून कौतुक केले.

१ उ. ‘सद्गुरु सत्यवानदादा यांच्या रूपात गुरुमाऊलीच घरी आली’, असे वाटणे : दोन वर्षांपूर्वी सद्गुरु सत्यवानदादा सत्संगासाठी आमच्या गावात आले होते. तेव्हा ‘ते आमच्या घरी येणार आहेत’, हे कळल्यावर सर्वांनाच पुष्कळ आनंद झाला. ‘साक्षात् गुरुदेवच आपल्या घरी येत आहेत’, या भावाने आम्हाला सर्व सेवा करता आल्या. सद्गुरूंच्या पदस्पर्शाने जणू वास्तुदेवताही प्रसन्न झाली.

सद्गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणार्‍या २ कविता सद्गुरूंच्या चरणी अर्पण करते.

धन्य हुए हम, धन्य हुए हम, धन्य हुए गुरुदेव ।

धन्य हुए हम, धन्य हुए हम, धन्य हुए हम आज ।
सद्गुरु के पदस्पर्श से, धन्य हुए हम आज ॥ १ ॥

कैसे करूं कृतज्ञता, पता नहीं गुरुदेव ।
आए हो जो तुम इस घर में, कृतज्ञता गुरुदेव ॥ २ ॥

जैसे सुदामा करता था, कृष्ण का इंतजार (प्रतीक्षा) ।
वैसे ही शबरी ने नहीं मानी थी हार ॥ ३ ॥

हम तो तुम्हारे चरणों के हैं दास ।
सदा रखो गुरुदेवजी हमें आपके पास ॥ ४ ॥

होती है गलतियां हमसे हजारों बार ।
फिर भी आप हमें माफ (क्षमा) करते हैं बार-बार ॥ ५ ॥

दूर किया अंधेरा आपने, फैलाया ऊजाला ।
काटों सें भरे इस जीवन को फूलों से सजाया ॥ ६ ॥

फूलों के समान हमें भी चरणों में समाएं गुरुदेव ।
धन्य हुए हम, धन्य हुए हम, धन्य हुए गुरुदेव ॥ ७ ॥

कशी वर्णावी आपुली महती, तव रूपात होतो श्री गुरूंचा साक्षात्कार ।

लाभले आम्हास सद्गुरु सत्यवानदादा प्रेमळ ।
त्यांच्या सहवासात आमुची मने होती निर्मळ ॥ १ ॥

नवा उत्साह, नवी प्रेरणा देती ते साधनेसाठी ।
बासरीच्या मंजुळ सुरांनी नेती यमुनेकाठी (टीप १) ॥ २ ॥

मधुर हास्य त्यांचे स्मरता शीण सारा निघूनी जाई ।
स्वकोशातून बाहेर पडून ध्येयपूर्तीची मज जाणीव होई ॥ ३ ॥

प्रगती होण्या साधकांची तळमळीने प्रयत्न करून घेती ।
हा भवसागर तरण्या आत्मबळ आम्हास अखंड देती ॥ ४ ॥

प्रीती, तळमळ, आज्ञापालन, सहजता आदी सद्गुणांचा आविष्कार ।
कशी वर्णावी आपुली महती, तव रूपात होतो श्री गुरूंचा साक्षात्कार ॥ ५ ॥

टीप १ : सद्गुरु सत्यवानदादा बासरी वाजवतांना यमुनेकाठी असल्याचा भाव अनुभवता येतो.

२. कु. अदिती प्रदीप तवटे, कुडाळ

२ अ. सद्गुरु सत्यवानदादा प्रेमळ असून ते सतत आनंदी असतात. एका प्रसंगात त्यांच्याकडून इतरांचा विचार करणे, तसेच इतरांची काळजी घेणे, हे गुण शिकता आले.

३. श्री. मयुर प्रदीप तवटे, कुडाळ

३ अ. अचूक निरीक्षण करून साधकांकडून परिपूर्ण कृती करून घेणारे सद्गुरु सत्यवानदादा ! : वर्ष २०१७ मध्ये कुडाळ सेवाकेंद्रात साधकांसाठी स्वरक्षण प्रशिक्षण शिबिर होते. त्या शिबिरात सद्गुरु सत्यवानदादांचे मार्गदर्शन आयोजित केले होते. सभागृहात आल्यावर सद्गुरु सत्यवानदादांनी ‘सभागृहात उजव्या बाजूने ऊन येणार, तर तिथे लावलेले कापड पुरेसे नाही’, हे लक्षात आणून दिले आणि लगेचच आम्हा साधकांकडून ते लावूनही घेतले.

३ आ. सद्गुरु सत्यवानदादांनी स्वतःहून वैयक्तिक अडचणींविषयी विचारणे आणि थोड्याच दिवसांत अडचणी न्यून होऊन परिस्थिती सुधारणे : एका सत्संगात सद्गुरु सत्यवानदादांनी साधनेच्या समवेतच मला वैयक्तिक अडचणींविषयीही विचारले. त्या वेळी आमची आर्थिक परिस्थिती अतिशय बिघडली होती आणि व्यवसायातही पुष्कळ अडचणी येत होत्या. याचा परिणाम घरातील सर्वच सदस्यांच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेवर होत होता. सद्गुरु सत्यवानदादांनी सांगितले, ‘‘हे प्रारब्ध आहे. हे दिवसही निघून जातील.’’ त्यानंतर थोड्याच दिवसांनी आमची आर्थिक स्थिती सुधारली आणि साधनेसह आमचा सेवेतील सहभागही वाढला.

३ इ. सद्गुरु सत्यवानदादा दुकानात येऊन गेल्यावर अडचणी न्यून होऊन दुकानात चैतन्य जाणवू लागणे आणि ‘वास्तूदेवता प्रसन्न झाली आहे’, असे जाणवणे : एकदा सद्गुरु सत्यवानदादा आमच्या औषधविक्रीच्या (मेडिकलच्या) दुकानात आले. तेव्हा मला व्यवसायात पुष्कळ अडचणी येत होत्या. सद्गुरु दादा दुकानात येऊन गेल्यानंतर ‘वास्तुदेवता प्रसन्न झाली’, असे मला वाटले. मला दुकानात चैतन्य जाणवू लागले. काही दिवसांनी माझ्या दुकानाच्या बाजूला असलेल्या एका गाळ्याची भिंत कोसळली; पण माझ्या दुकानाची काही हानी झाली नाही किंवा कशाला धक्काही पोचला नाही.

या दोन्ही प्रसंगांतून ‘परात्पर गुरुमाऊली आपल्या साधकांचा हात नेहमीच पकडून ठेवतात’, याची जाणीव झाली.

४. कु. नीना श्याम कोळसुलकर, कुडाळ

४ अ. सद्गुरु सत्यवानदादांचे सहज वागणे आणि बोलणे यांमुळे त्यांच्याविषयी आदर वाढणे अन् त्यांना नमस्कार करतांना वेगळे जाणवणे : खारेपाटण येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या आधी सद्गुरु सत्यवानदादा साधकांना भेटायला आमच्या घरी आले होते. त्या वेळी त्यांची प्रत्येक कृती आणि बोलणे फार सहज होते. त्यांच्या वागण्यात मोकळेपणा होता. त्यामुळे माझ्या मनातील त्यांच्याविषयीचा आदर फार वाढला. त्या वेळी माझ्यात भाव नव्हता; पण त्यांना नमस्कार केल्यावर मला काहीतरी वेगळे जाणवले आणि माझा उत्साह वाढला. सद्गुरु दादा आमच्या घरातून बाहेर पडल्यावरही घरात पुष्कळ चैतन्य जाणवत होते. त्यांच्या कृपेमुळे माझ्यासारख्या अपात्र जिवाला अल्प कालावधीत दोन सभांमध्ये सेवा करण्याची संधी मिळाली. ‘सेवा आणि साधना यांत माझी प्रगती व्हावी’, हा सद्गुरु दादांचा संकल्प होता’, असे मला तीव्रतेने जाणवले.

४ आ. सद्गुरु सत्यवानदादांच्या बोलण्यातील चैतन्यामुळे मन निर्विचार होणे : शिरगाव, देवगड येथील सभेला गेल्यावर मी काही साधकांच्या समवेत उभी होते. तेथे बाजूच्या खोलीत सद्गुरु सत्यवानदादा बसले होते. ते माझ्याशी थोडे बोलले. त्या वेळी त्यांच्या चैतन्याने ‘माझे मन पूर्ण निर्विचार झाले’, असे मला जाणवले.

५. श्री. राजाराम परब, तेर्सेबांबर्डे

५ अ. सतत काही ना काही शारीरिक त्रास होत असल्याने मनावर त्याचे दडपण येणे : डिसेंबर २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत माझा शारीरिक त्रास फारच वाढला होता. मला एका पाठोपाठ एक असे शारीरिक त्रास होत होते. या त्रासांमुळे माझी मानसिक स्थिती काहीशी अस्थिर झाली होती. ‘आता कुठला त्रास उद्भवणार ?’, असा माझ्या मनावर नेहमी ताण असायचा. या दडपणाचा माझ्या दैनंदिन कामकाजावरही परिणाम व्हायचा.

५ आ. ‘सद्गुरु सत्यवानदादांच्या केवळ अस्तित्वाने त्रास न्यून झाले’, अशी अनुभूती येणे : याविषयी सद्गुरु सत्यवानदादांशी बोलण्यासाठी मी त्यांच्याकडे गेलो. ‘केवळ त्यांच्या समोर गेल्यावरच माझे अर्ध्याहून अधिक त्रास नाहीसे झाले’, असे मला जाणवले. मी त्यांना त्रासाविषयी सांगितल्यावर त्यांनी मला दोन नामजप आणि मुद्रा सांगितली; परंतु मी त्यांच्याशी बोलून बाहेर येईपर्यंतच माझे अनेक त्रास न्यून झाले होते. ‘संतांचे अस्तित्व आणि बोलणे, यांमधून आपला त्रास जाण्यासाठी त्यांचा संकल्प होतो’, याची मला प्रचीतीच आली. मला सद्गुरु सत्यवानदादा यांची अपार प्रीती अनुभवता आली.

६. कु. भक्ती गणेश पांगम, कामळेवीर

६ अ. सद्गुरु सत्यवानदादा सर्वांची पुष्कळ काळजी घेत असल्यानेे त्यांच्या माध्यमातून ‘प.पू. गुरुदेवच समवेत आहेत’, असे वाटणे : सद्गुरु सत्यवानदादांशी बोलतांना पुष्कळ आनंद जाणवतो. एकदा मी सेवाकेंद्रात गेले होते. त्या वेळी सद्गुरु दादांशी भेट झाली. ते प्रत्येक साधकाची आपुलकीने आणि प्रेमाने विचारपूस करतात अन् पुष्कळ काळजी घेतात. त्यांच्या माध्यमातून ‘प.पू. गुरुदेव आमच्या समवेत आहेत’, असे आम्हाला वाटते. आम्हाला त्यांचा फार आधार वाटतो.

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक