श्री. सत्यकाम कणगलेकर यांची ‘प.पू. डॉक्टर’ हा नामजप लिहिलेली वही आणि त्यांची ‘स्वभावदोष-निर्मूलन सारणी’ यांतून पुष्कळ सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे

अध्यात्मशास्त्राविषयी अद्वितीय संशोधन करणारे  महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेमुळे रज-तमात्मक स्वभावदोष दूर होऊन अंतर्मुखता साधण्यास साहाय्य होते. स्वभावदोषांची व्याप्ती पहाता त्यांना सागराच्या पृष्ठभागावर तरंगणार्‍या महाकाय हिमनगांचीच उपमा देणे सार्थ ठरेल. जसा हिमनगांचा अधिकांश भाग हा सागरात असतो, तसे स्वभावदोषांचे संस्कार अंतःकरणात खोलवर रुजलेले असतात. ते लवकर दूर होण्यासाठी स्वभावदोष बळावण्यास कारणीभूत असलेल्या आध्यात्मिक घटकांचे (उदा. काम-क्रोधादी षड्रिपू, भय, ‘मी’पणा (अहं) आदींचे) समूळ उच्चाटन करणेही आवश्यक ठरते. स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेची परिणामकारकता वाढवण्यास आध्यात्मिक स्तरावरील प्रयत्नही कसे साहाय्यभूत ठरतात, हे पुढील लेखातून लक्षात येते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संधीकाळात ‘गुरुकृपायोगा’नुसार साधनामार्गाची निर्मिती करून साधकांवर गुरुकृपेचा वर्षाव केला आहे. गुरुकृपायोगानुसार साधना हा एकमेव साधनामार्ग आहे, ज्यामध्ये जलद आध्यात्मिक उन्नती होऊ शकते. आजपावतो सनातनच्या सहस्रो साधकांची गुरुकृपायोगानुसार साधना करून आध्यात्मिक उन्नती झाली आहे. गुरुकृपायोग ही अष्टांग साधना आहे. साधना करतांना साधकातील दोष आणि अहं न्यून होणे आवश्यक आहे. त्यामुळे जिवाचे मन, बुद्धी आणि चित्त यांची शुद्धी होऊन त्यावर नामाचा संस्कार होणे सुलभ होते. सनातनचे साधक श्री. सत्यकाम कणगलेकर यांची ‘प.पू. डॉक्टर’ हा नामजप लिहिलेली आणि त्यांची ‘स्वभावदोष निर्मूलन सारणी’ची वही हातात धरल्यावर त्यांतून भावाची स्पंदने प्रक्षेपित होत असल्याचे लक्षात आले. या वह्यांतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा विज्ञानाद्वारे अभ्यास करण्यासाठी त्या वह्यांच्या ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या, तसेच श्री. सत्यकाम कणगलेकर यांचीही चाचणी करण्यात आली. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण पुढे दिले आहे.

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

१ अ. नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विश्‍लेषण : श्री. सत्यकाम कणगलेकर यांची ‘नामजपाची वही’ आणि ‘स्वभावदोष-निर्मूलन सारणी’ यांतून पुष्कळ सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे

वरील सारणीतून पुढील सूत्रे लक्षात येतात.

१. श्री. सत्यकाम कणगलेकर यांनी नामजप लिहिलेल्या वहीमध्ये नकारात्मक ऊर्जा मुळीच नसून पुष्कळ सकारात्मक ऊर्जा आहे.

२. श्री. सत्यकाम कणगलेकर यांच्यामध्ये नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जाही आहे.

३. श्री. सत्यकाम कणगलेकर यांच्या स्वभावदोष-निर्मूलन सारणीच्या वहीमध्ये नकारात्मक ऊर्जा मुळीच नसून पुष्कळ सकारात्मक ऊर्जा आहे. हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. (श्री. सत्यकाम कणगलेकर यांच्यातील सात्त्विकतेने असे झाले आहे.)

२. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

श्री. सत्यकाम कणगलेकर

२ अ. श्री. सत्यकाम कणगलेकर यांनी ‘प.पू. डॉक्टर’ हा नामजप लिहिलेल्या वहीतून पुष्कळ सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होण्याचे कारण : श्री. सत्यकाम कणगलेकर यांनी ‘प.पू. डॉक्टर’ हा नामजप अतिशय भावपूर्णरित्या लिहिला आहे. त्यांच्यातील भावामुळे त्यांनी नामजप लिहिलेल्या वहीवर नामाचा संस्कार होऊन तिच्यामध्ये देवत्व निर्माण झाले. वहीतून चैतन्य प्रक्षेपित होत असल्याने वहीमध्ये पुष्कळ सकारात्मक स्पंदने आढळली.

२ अ १. श्री. सत्यकाम कणगलेकर यांचा वर्ष २०१६ पासून मनातून ‘प.पू. डॉक्टर’ असा नामजप आपोआप होणे आणि सप्टेंबर २०१९ मध्ये त्यांना तो नामजप लिहून काढण्याची प्रेरणा होणे : श्री. सत्यकाम कणगलेकर यांचा वर्ष २०१६ पासून मनातून ‘प.पू. डॉक्टर’ असा नामजप आपोआप होत होता. सप्टेंबर २०१९ पासून त्यांना स्वतःच्या मनाच्या स्थितीत सकारात्मक पालट होत असल्याचे जाणवले. तसेच त्यांना ‘प.पू. डॉक्टर’ हा नामजप लिहावा’, अशी प्रेरणा झाली. ते वही घेऊन नामजप लिहायला बसले, तेव्हा त्यांच्याकडून आपोआप ‘प.पू. डॉक्टर’ हा नामजप लिहिण्यास आरंभ झाला. ५.१२.२०१९ या दिवशी नामजप लिहिण्याची प्रेरणा थांबली आणि त्यांचा नामजप लिहिणेही थांबले; पण आजही त्यांचा आतून (मनातून) ‘प.पू. डॉक्टर’ हा नामजप आपोआप चालू आहे. (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना साधक ‘प.पू. डॉक्टर’ असे संबोधतात. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना कधीही स्वतःचा नामजप करण्यास सांगितलेले नाही. साधकाच्या भावामुळे त्याचा आतून आपोआप ‘प.पू. डॉक्टर’ असा नामजप होत आहे. – संकलक)

२ अ २. श्री. सत्यकाम कणगलेकर यांना ‘प.पू. डॉक्टर’ नामजप लिहीत असतांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती : ‘प.पू. डॉक्टर’ हा नामजप लिहितांना मला माझ्या मनात निर्माण होत असलेल्या निरनिराळ्या भावस्थितींचे निरीक्षण करता आले. गुरुदेवांनी नामजप लिहितांना मला बर्‍याच वेळा ‘मन निर्विचार होणे, भावजागृती होऊन डोळ्यांतून भावाश्रू वहाणे, तर काही वेळा कृतज्ञताभाव जागृत होऊन दाटून येणे, अंगावर रोमांच येणे किंवा दैवी स्पर्श जाणवणे’ (कुणीतरी माझ्या पाठीवरून किंवा मस्तकावरून हात फिरवत आहे’, असे जाणवणे) अशा विविध अनुभूती देऊन माझ्याकडून हा नामजप लिहून घेतला आहे.’ – श्री. सत्यकाम कणगलेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.१.२०२०)

सौ. मधुरा कर्वे

२ आ. श्री. सत्यकाम कणगलेकर यांच्या ‘स्वभावदोष-निर्मूलन सारणी’तून पुष्कळ सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होण्याचे कारण : सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना ‘गुरुकृपायोगा’नुसार साधना शिकवली आहे. परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना स्वतःतील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यास सर्वाधिक महत्त्व देण्यास सांगितले आहे. ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक स्तरावर प्रयत्न कसे करावेत ?’, यांविषयी त्यांनी वेळोवेळी अमूल्य मार्गदर्शन केले आहे आणि आजही करत आहेत. साधक प्रतिदिन स्वतःकडून झालेल्या चुका (अयोग्य कृती, विचार किंवा प्रतिक्रिया) स्वभावदोष निर्मूलन सारणीत प्रांजळपणे लिहितात. तसेच त्या चुका पुन्हा होऊ नयेत यासाठी सारणीत चुकांपुढे उपाययोजना (योग्य कृती करणे किंवा योग्य विचार येणे यांसाठी स्वयंसूचना बनवणे, योग्य दृष्टीकोन घेणे इत्यादी) लिहितात. गुरु जेव्हा एखादी कृती करण्यास सांगतात, तेव्हा त्यामागे त्यांचा संकल्प कार्यरत असतो. गुरूंनी सांगितलेली कृती साधकाने मनापासून केल्यास त्याला गुरूंच्या संकल्पाची प्रचीती येते. परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यास सांगितले, तेव्हाच त्यामागे त्यांचा संकल्पही कार्यरत झाला. याची अनुभूती सनातनचे साधक घेत आहेत. ‘श्री. सत्यकाम कणगलेकर यांच्या स्वभावदोष निर्मूलन सारणीतून पुष्कळ प्रमाणात सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे’, हे त्यांनी गुर्वाज्ञापालन केल्याचे द्योतक आहे. (‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन कसे करावे ?’, याविषयी सनातनच्या ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन’ विषयक ग्रंथांमध्ये सविस्तर दिले आहे.)

२ इ. श्री. सत्यकाम कणगलेकर यांच्यामध्ये नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जा आढळण्याचे कारण : श्री. सत्यकाम कणगलेकर यांना आध्यात्मिक त्रास नाही. त्यांच्यामध्ये ‘इन्फ्रारेड’ अन् ‘अल्ट्राव्हायोलेट’ या नकारात्मक ऊर्जा आढळल्या. (‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा व्यक्ती भोवतीचे त्रासदायक आवरण दर्शवते, तर ‘अल्ट्राव्हायोलेट’ ही नकारात्मक ऊर्जा व्यक्तीच्या देहात अनिष्ट शक्तींनी साठवलेली त्रासदायक शक्ती दर्शवते.) त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जाही आढळली. सनातनचे साधक समष्टी साधना करून ‘ईश्‍वरी राज्य’ स्थापन करण्यासाठी, तर अनिष्ट शक्ती ‘त्यांचे राज्य’ स्थापन करण्यासाठी प्रयत्नरत आहेत. त्यामुळे अनिष्ट शक्ती साधकांना विविध प्रकारे मोठ्या प्रमाणावर त्रास देतात. अनिष्ट शक्तींच्या त्रासांमुळे साधकांना विविध प्रकारच्या शारीरिक, मानसिक अन् आध्यात्मिक त्रासांना सामोरे जावे लागते.

श्री. सत्यकाम कणगलेकर यांनी सांगितले, ‘त्यांना गेल्या अनेक मासांपासून विविध शारीरिक त्रासही होत आहेत. त्यामुळे सेवा करतांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.’ त्यांना होणार्‍या त्रासांमुळे, तसेच त्यांच्याभोवती त्रासदायक आवरण आल्याने त्यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली. त्यांनी प्रतिदिन मीठ-मोहरीने दृष्ट काढणे, हा नामजपादी उपाय केल्यास त्यांना होणारे त्रास उणावतील. त्यांच्या साधनेमुळे त्यांच्यातील सत्त्वगुण वाढला आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आढळली.

२ ई. श्री. सत्यकाम कणगलेकर यांनी ‘सकारात्मक राहून साधना वाढवण्याचा निश्‍चय करणे’, हीच खरी गुरुकृपा असल्याचे अनुभवणे ! : ‘चाचणी केल्यावर आलेल्या परीक्षणात दिसून आलेली नकारात्मक ऊर्जा ही सामान्य देहाची असून त्यात ईश्‍वरी चैतन्य निर्माण होण्यासाठी अजून पुष्कळ वाव आहे. दुसर्‍या शब्दांत ‘माझी साधना अजून पुष्कळ प्रमाणात वाढायला हवी’, हे त्याचे द्योतक आहे’, असे मला वाटते. ‘येणार्‍या काळात लवकरच गुरुदेवांच्या कृपेने हे निश्‍चितच घडेल’, अशी माझी श्रद्धा आहे. त्यामुळे ‘मला अजून पुष्कळ प्रमाणात साधना करणे आणि ती वाढवणे आवश्यक आहे’, याची तीव्रतेने जाणीव झाली, तसेच ‘दर्शवलेली सकारात्मकता ही गुरूंच्या नामजपाचीच आहे’, यात काहीच शंका नाही.’ – श्री. सत्यकाम कणगलेकर, सनातन आश्रम, गोवा. (१९.१०.२०२०)

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (११.१२.२०२०)

ई-मेल : [email protected]

कलियुगातील सर्वोत्तम साधना म्हणजे नामजप !

‘नामजप म्हणजे देवाचे नाव पुनःपुन्हा घेत रहाणे, म्हणजेच नामस्मरण करणे. ‘कलियुगात नामजप हीच सर्वोत्तम साधना आहे आणि नामजपाला पर्याय नाही’, असे अनेक संतांनी सांगितले आहे. भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितले आहे, ‘यज्ञानां जपयज्ञोऽस्मि ।’, म्हणजे ‘यज्ञांमध्ये जपयज्ञ मी आहे.’ नामजपाच्या माध्यमातून योग साधणे, म्हणजे जीव शिवाला जोडणे.

१. नामजप लिहिण्याचे महत्त्व : नामजप करण्याच्या विविध पद्धती असतात. त्यातील ‘लिखित नामजप’ हा विशेष लाभदायक प्रकार असून यामध्ये प्रथम नामजप उच्चारतो आणि नंतर तो लिहीतो. ‘तो योग्य आहे कि नाही ?’, हे पहाण्यासाठी त्यावरून दृष्टी फिरवतो, म्हणजेच एका नामाचे आपण ३ वेळा स्मरण करतो. असा नामजप करत असतांना आपले डोळे, हात, कान, मन, बुद्धी आणि चित्त, म्हणजे पूर्ण देहच नामजपामध्ये गुंतलेला असतो. त्यामुळे नामजपाच्या वेळी आपले मन अन्य विषयांमध्ये भरकटत नाही. वैखरीतील नामजपापेक्षा लिखित नामजप अधिक लाभदायक असतो. त्यामुळे शरीर, मन आणि बुद्धी यांच्यावर आलेले अनिष्ट शक्तीचे आवरण दूर होते.

२. लिखित नामजपामुळे वास्तूशुद्धी होणे : नामजप लिहिलेल्या वह्या घरी ठेवल्या की, वास्तूशुद्धी होण्यास साहाय्य होते.

३. भावपूर्ण लिखित नामजपातील शब्दांनी शरीर, मन आणि बुद्धी यांवरील मलिनता दूर करून अंत:करण शुद्ध करणे : ‘विविध शारीरिक त्रास होत असतांना आणि जीवनात येणार्‍या अडचणींना सामोरे जातांना देवाला आळवणे, म्हणजे आपल्या जीवनातील प्रारब्ध भोगत देवाच्या अनुसंधानात रहाणे होय. यामुळे देव जीवनातील प्रारब्ध भोगण्यास साहाय्य करतो. त्यामुळे ‘जीवनात कितीही कठीण प्रसंग आले, तरी देवाची कास न सोडता त्याचे नाम घेत रहावे’, हे

श्री. सत्यकाम यांच्या उदाहरणावरून आपल्याला शिकायला मिळते. त्यांना होणार्‍या विविध शारीरिक त्रासांमुळे त्यांचे ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या चाचणीतून नकारात्मक निरीक्षण आले, तरी त्यांनी केलेल्या भावपूर्ण लिखित नामजपातून सकारात्मक स्पंदने येतात. हा नामाचा महिमा आहे. भावपूर्ण लिखित नामजपातील शब्द शरीर, मन आणि बुद्धी यांवरील मलिनता दूर करून अंत:करण शुद्ध करतात.

थोडक्यात श्री. सत्यकाम कणगलेकर यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव, स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करण्याची तीव्र तळमळ आणि त्यांची गुरूंवर असलेली अढळ श्रद्धा यांमुळे त्यांनी ‘प.पू. डॉक्टर’ हा नामजप लिहिलेली वही अन् त्यांची ‘स्वभावदोष निर्मूलन सारणी’ यांमध्ये पुष्कळ चैतन्य निर्माण झाले.’

– कु. प्रियांका लोटलीकर, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (२३.१०.२०२०)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक