हिंदूंनो, श्रद्धास्थाने, गड-कोट येथील अतिक्रमणांच्या विरोधात आवाज उठवून त्यांच्या रक्षणासाठी कटीबद्ध व्हा ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट

कोल्हापूर – येथील विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणाच्या संदर्भात केवळ एक पत्र पाठवण्याच्या पलीकडे पुरातत्व विभागाने काहीच केलेले नाही. सातारा जिल्ह्यातील प्रतापगड येथील अफझलखानाच्या थडग्याभोवती उभे राहिलेले दर्ग्याचे अतिक्रमण हे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांचा आदेश मिळूनही काढले जात नाही. अशा प्रकारे राज्यातील कोणत्या ना कोणत्या गडावर अतिक्रमण, नरवीरांच्या समाधी-मंदिरे यांची दुरावस्था, स्वच्छतेविषयी अनास्था, तसेच अन्य समस्या आहेत. विशाळगडाच्या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन आम्ही वाचा फोडलेलीच आहे. त्याचप्रकारे हिंदूंनो, आपल्या क्षेत्रातील श्रद्धास्थाने, गड-कोट यांवर झालेल्या अतिक्रमणांच्या विरोधात आवाज उठवून त्यांच्या रक्षणासाठी कटीबद्ध व्हा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. ते नुकतेच ‘जम्बू टॉक्स’ यावर ‘प्राचीन गडकोटांची दुर्दशा आणि त्यांचे इस्लामीकरण’ याविषयी बोलत होते.

१. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या गड-कोटांच्या अमूल्य वारसांची दयनीय स्थिती आहे. ३१ डिसेंबरला तरुण-तरुणी मौजमजा, तसेच मद्यपान-मांसाहार करण्यासाठी आज गडावर जात आहेत. गडासाठी वीरांनी केलेला त्याग आणि पराक्रम आपण विसरतो.

२. समितीने सिंहगडाच्या कामाच्या संदर्भात झालेला भ्रष्टाचार समोर आणला. सिंहगडाच्या डागडुजीच्या कामासाठी १ कोटी ३९ लाख रुपये व्यय होऊनही अपेक्षित असे काम झाले नाही. यात भ्रष्टाचार झाल्याचे समितीने पुराव्यानिशी सिद्ध केले. समितीच्या आंदोलनानंतर ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले.

३. कोल्हापूर जिल्ह्यातील श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील मनकर्णिका कुंडावर झालेल्या अतिक्रमणाच्या संदर्भात पुरातत्व विभागाने काही केले नाही. याउलट खोदकाम चालू केल्यावर ‘त्यात सापडणार्‍या वस्तू आमच्या आहेत’, असे सांगितले. मुरुड-जंजिरा किल्ल्यावर काही गडप्रेमींनी लावलेला भगवा ध्वज ‘अनुमती नाही’ म्हणून काढून टाकला.

४. अशाच प्रकारे विशाळगडाचीही स्थिती असून वीरांच्या समाधींकडे जाण्याचा रस्ता नसणे, २१ हून अधिक मंदिरांची दुरावस्था, मंदिरांचे क्षेत्रफळ अल्प होऊन मंदिरे नाहीशी होणे, रेहानबाबाच्या दर्ग्याच्या सुशोभिकरणासाठी ५ लाख रुपयांपेक्षा अधिक व्यय, पुरातत्व विभाग, ग्रामपंचायत, जिल्हा प्रशासन अशा सगळ्यांचीच अनास्था आहे. पुरातत्व विभाग हिंदूंच्या भावना पायदळी तुडवण्याचे काम करतो. त्यामुळे हिंदूंनाच आता पुढाकार घेऊन या संदर्भात आवाज उठवणे आवश्यक आहे.

वरील कार्यक्रम पुढील लिंकवर पहाण्यासाठी उपलब्ध आहे.