तमिळनाडूतील इस्लामी संघटनांची मारवाडी समाजाला तमिळनाडू सोडून जाण्याची धमकी

  • तमिळनाडूमध्ये अण्णाद्रमुकचे सरकार आहे आणि त्याला भाजपचे समर्थन आहे. असे असतांना तेथे अशा प्रकारच्या धमक्या हिंदूंना देण्याचे धाडस धर्मांधांचे होतेच कसे ?
  • हिंदूंमधील एकेका समाजाला लक्ष्य करण्याचा धर्मांधांचा हा नवीन कट आहे, हेच यातून लक्षात येते ! त्यामुळे हिंदूंनी संघटित होऊन याचा विरोध केला पाहिजे आणि अशा संघटनांवर कारवाई करण्यास राज्य आणि केंद्र सरकारला भाग पाडले पाहिजे !

चेन्नई – भाजप नेते कल्याणरमण यांना हत्येची धमकी दिल्यानंतर तमिळनाडूमधील इस्लामी संघटनांनी मारवाडी समाज आणि विशेषतः उत्तर भारतीय यांच्यावर कल्याणरमण यांना प्रोत्साहन दिल्याचा आरोप करून त्यांच्या विरुद्ध द्वेष मोहीम चालू केली आहे. त्यांना एका हस्तपत्रकाद्वारे तमिळनाडू सोडून जाण्याची धमकी दिली आहे. जिहाद्यांंविषयी स्पष्टपणे बोलणारे तमिळनाडूचे भाजप नेते कल्याणरमण यांना तथाकथित इस्लामविरोधी भाषण केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. ‘त्यांनी एका भाषणात पैगंबरांविरुद्ध अपशब्द काढले’, असा खोटा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. कल्याणरमण यांच्या अटकेनंतरही धर्मांध जाहीर भाषणांमध्ये शरीयतनुसार कल्याणरमण यांची हत्या करण्यास जमावाला प्रोत्साहन देत आहेत.

तमीळनाडून मुसलमानांनी वाटलेले पत्रक (वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा)

१. कल्याणरमण यांच्या विरोधात निषेध करण्याच्या नावाखाली काही इस्लामी संघटनांनी त्रिची येथील मारवाडी समाजाविरुद्ध द्वेष मोहीम चालवली आहे. काही मुसलमानांनी त्रिची येथे काही दिवसांपूर्वी एका गल्लीमध्ये पत्रके वाटली जेथे बहुतेक दुकाने मारवाड्यांच्या मालकीची आहेत. या पत्रकात दुकानदारांना ८ फेब्रुवारी या दिवशी त्यांची दुकाने बंद ठेवण्यास सांगितले होते. पत्रकात अशी मागणी केली आहे की, मारवाड्यांनी तमिळनाडू सोडून त्यांच्या ‘मूळ ठिकाणी’ परत जावे. मारवाड्यांवर धार्मिक अशांतता वाढवण्याचा प्रयत्न करत असलेल्या भाजपला आर्थिक साहाय्य करण्याचा आरोप या संघटांकडून करण्यात आला आहे.

२. पत्रकात असा दावा केला आहे की, तमिळनाडूमध्ये हिंदु, मुसलमान आणि ख्रिस्ती बंधू-भगिनींसारखे जगत आहेत; परंतु भाजप समाजामध्ये द्वेष पसरवून अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. जर यामुळे कोणताही हिंसाचार झाला आणि सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड झाली, तर मारवाडी समाज त्यासाठी उत्तरदायी राहील आणि सरकारने त्यांच्याकडून हानीभरपाई वसूल करावी.

३. शेवटी पत्रकामध्ये अशी धमकी देण्यात आली आहे, ‘जे आमच्याकडे येतात त्यांना आम्ही जीवनदान देऊ. जर तुम्ही चुकीचा व्यवहार केल्यास आम्ही तुमची दुकाने कायमची बंद करू.’

४. या द्वेष मोहिमेचा भाजपच्या नेत्यांनी निषेध नोंदवला आहे. भाजपने आरोप केला आहे की, तमिझागा मक्कल जननायक कच्ची (तमिळ पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी) हा पक्ष द्वेष पसरवण्यासाठी पुढाकार घेत असल्याने त्याच्याविरुद्ध शासनाने कारवाई करावी.

५. जानेवारी २०२० मध्ये ‘तमिळी लोकांची नोकरी आणि व्यवसाय हडपल्याने मारवाड्यांना तमिळनाडूतून बाहेर काढावे’, अशी मोहीम ‘तमिळ देशिया कच्ची’ (तमिळ राष्ट्रवादी पार्टी) या पक्षाने हाती घेतली होती. चेन्नईमधील रिची स्ट्रीटमधील एका मारवाडी दुकानदाराने नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणी यांना समर्थन देत आहेत’, असे लिहिलेले पेन वाटले म्हणून धर्मांधांनी दुकानदारावर आक्रमण केले होते.