भारतरत्नांची चौकशी करणार्‍या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ?  – फडणवीस

. . . या भारतरत्नांनी केलेल्या ट्विट्स ची चौकशी होणार !

मुंबई – शेतकर्‍यांच्या आंदोलनावर विदेशातील वलयांकित व्यक्तींनी ट्वीट केल्यानंतर त्याला उत्तर देण्यासाठी भारतीय वलयांकित व्यक्तींनी केलेल्या ट्वीटची चौकशी करणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घोषित केले आहे. या प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘या भारतरत्नांची चौकशी करणार्‍यांचा निषेध करत सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ?’, असा प्रश्‍न उपस्थित केला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

काँग्रेस शिष्टमंडळाची ‘झूम मिटिंग’द्वारे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह बैठक पार पाडली. या वेळी शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी केलेल्या ट्वीटला भारतीय सेलिब्रिटींनी दिलेल्या प्रत्युत्तरामागे भारतीय जनता पक्षाने त्यांना प्रवृत्त केले होते का ? आणि भाजपचा त्यांच्यावर कोणता दबाव होता का ?, असे प्रश्‍न सचिन सावंत यांनी उपस्थित केले होते. त्यावर अनिल देशमुख यांनी वरील आदेश दिले आहेत.

यावर फडणवीस यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, भारतरत्नांची चौकशी करणारी अशी रत्ने देशात कुठेही सापडणार नाहीत. निषेध करावा तितका थोडा. खरेतर चौकशी करण्याची मागणी करणारे आणि ती मान्य करणारे यांच्या मानसिक स्थितीचीच चौकशी केली पाहिजे. कुठे गेला मराठी बाणा ?, कुठे गेला महाराष्ट्र धर्म ?, अशी टीका फडणवीस यांनी सरकारवर केली आहे.