महाविद्यालये किंवा अभियांत्रिकी महाविद्यालये चालू करण्याचा कोणताही विचार नाही ! – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

उदय सामंत

कोल्हापूर – कोरोनाचा नवा विषाणूही सापडला आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविद्यालये किंवा अभियांत्रिकी महाविद्यालये चालू करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे. ते नियोजित कोल्हापूर दौर्‍यावर असतांना पत्रकार परिषदेत बोलत होते.


उदय सामंत पुढे म्हणाले, ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाशी चर्चा केली जात आहे. महाविद्यालये किंवा अभियांत्रिकी महाविद्यालये चालू करण्याआधी जिल्ह्या जिल्ह्यातील महाविद्यालये आणि वसतीगृहे पुन्हा अलगीकरण कक्षासाठी देण्यात आली आहेत का?, याची माहिती घेतली जात आहे.

विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यामुळे पुन्हा कोरोना पसरला जाणार नाही ना ?, याची दक्षता घेतली जात असल्यानेच महाविद्यालये किंवा अभियांत्रिकी महाविद्यालये चालू करण्यात आलेली नाहीत. काही दिवसांत कोरोनाचे लसीकरण चालू होईल. लसीकरणाचा पहिला, दुसरा, तिसरा टप्पा होऊ द्या. त्यानंतर राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाशी बैठक घेऊन महाविद्यालये किंवा अभियांत्रिकी महाविद्यालये चालू करण्याच्या संदर्भात निर्णय घेण्यात येईल.’’