सीबीआयच्या कह्यातील ४५ कोटी रुपयांचे १०३ किलो सोने गायब

६ मासांत अन्वेषण करण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश

देशातील एका महत्त्वाच्या सुरक्षायंत्रणेकडून एका संवेदनशील प्रकरणात असा गलथानपणा होत असेल, तर त्याचा एकंदरीत कारभार कसा चालत असेल, याचा विचारही न केलेला बरा ! यास दोषी असणार्‍या उत्तरदायींवर कारवाई करणे आवश्यक !

चेन्नई (तमिळनाडू) – येथील एका धाडीमध्ये सीबीआयने जप्त केलेले १०३ किलो ग्रॅम सोने गायब झाले आहे. एकूण ४५ कोटी रुपये मूल्य असलेले हे सोने सीबीआयच्या कह्यात असतांना गायब झाल्याने मद्रास उच्च न्यायालयाने तमिळनाडू सीबी-सीआयडीला चौकशीचा आदेश दिला आहे.

‘या सर्व प्रकरणामुळे अन्वेषण यंत्रणांची प्रतिष्ठा अल्प होत आहे. त्यामुळे ६ मासांच्या आत याचे अन्वेषण करण्यात यावे’, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

वर्ष २०१२ मध्ये चेन्नईमधील सुराना कॉर्पोरेशन लिमिटेडच्या कार्यालयात धाड टाकून सोन्याच्या विटा आणि दागिने यांच्या स्वरूपात ४००.५ किलो ग्रॅम सोने जप्त करण्यात आले होते. हे सर्व सोने सीबीआयच्या ‘सेफ कस्टडी’मध्ये ठेवण्यात आले होते. आता यामधील १०३ किलोग्रॅम सोने गायब झाले आहे.