नव्या कृषी कायद्यातून शेतकर्‍यांचा कसलाही लाभ नाही ! – सतेज पाटील, गृहराज्यमंत्री, काँग्रेस

सतेज पाटील

कोल्हापूर, ७ डिसेंबर – नव्या कृषी कायद्यातून शेतकर्‍यांचा कसलाही लाभ होणार नाही. अंबानी यांचे जिओ आस्थापन चालू झाल्यावर शासकीय भारत संचार आस्थापन देशोधडीला लागले. तशीच अवस्था शेतकर्‍यांची या विधेयकामुळे होणार आहे. इचलकरंजी कापड व्यापारी दिवाळे काढून वारंवार पळून जातात, तसेच शेतकरी कायद्यामुळे कार्पोरेट आस्थापन पळून जाण्याचा धोका आहे. त्यामुळे या कायद्याला विरोध करण्यासाठी काँग्रेस उद्याच्या देशव्यापी बंदला पाठिंबा देणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत केले.

(स्वातंत्र्यानंतर दीर्घकाळ राज्य केलेल्या काँग्रेसने त्या त्या वेळी शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवले असते, तर शेतकर्‍यांवर आंदोलन करण्याची वेळ आलीच नसती ! काँग्रेसने आपण शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवण्यात कोठे अल्प पडलो हे जनतेसमोर मांडले असते, तर त्या चुका आता सुधारता आल्या असत्या, असेच जनता आणि शेतकरी यांना वाटते. – संपादक)

सतेज पाटील पुढे म्हणाले की, केंद्रातील सरकार नव्या कृषी विधेयकाच्या माध्यमातून शेतकर्‍यांचे हित साधणार आहे, असे भाजपच्या नेत्यांनी गळ्यात पक्षाचा मफलर घालून शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन सांगण्याची धैर्य दाखवावे. त्यावर शेतकरी त्यांना योग्य ते उत्तर देतील. भाजप हा पक्ष शेतकरी विरोधी असल्याचे सातत्याने दिसून आले आहे.