‘ऑनलाईन’ शिक्षणपद्धत शाप कि वरदान ?

पावसाळा चालू झाला की, आम्हा सर्वांच्या डोळ्यासमोर एक मनोहारी दृश्य उभे ठाकते. नव्या कोर्‍या गणवेशात, पाठीवर नवीन कोरी पुस्तके आणि वह्या भरलेले भले मोठे दप्तर, उत्साहाने ओसंडत, रिमझिम पावसात मौजमस्ती करत शाळेत जाणार्‍या विद्यार्थ्यांचे थवेच्या थवे ! बालपणी आपणही या दृश्याचा एक भाग होतो आणि मोठे झाल्यावरही विद्यार्थ्यांना अशा प्रकारे नांदतांना पाहून कित्येक वर्षे या आनंददायी क्षणाचा आपण आनंद लुटत आहोत; परंतु दुर्भाग्याने या वर्षी हे चित्र पूर्णपणे पालटलेले आहे.

१. कोरोना आणि त्यामुळे झालेले पालट

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर शैक्षणिक क्षेत्रात काही पालट केले जात आहेत. गोव्यातील आणि एकूणच देशातील कोरोना संक्रमितांची वाढती संख्या लक्षात घेता शाळा अन् महाविद्यालयांना ठोकलेली टाळी एवढ्यात खुली होण्याची काहीच चिन्हे दिसत नाहीत. अशा या अनिश्‍चिततेच्या वातावरणात पर्याय म्हणून सर्वत्र ‘ऑनलाईन’ शिक्षणपद्धतीची चर्चा चालू आहे. पाश्‍चात्त्य देशात अधिक प्रचलित असलेल्या ‘ऑनलाईन’ शिक्षणप्रणालीविषयी काही तज्ञांचे मत आहे की, या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना सोयीस्करपणे घरबसल्या शिक्षण प्राप्त होऊ शकते. यामध्ये पालकांची जोखीम न्यून (कमी) होऊन मुले स्वतःच्या शिक्षणाचे दायित्व स्वतः घेऊन स्वावलंबी बनतात वगैरे. या सर्वांमध्ये एक गोष्ट मान्य आहे की, काळासमवेत जग पालटत आहे आणि या पालटांना सामोरे जाणे, हेच शहाणपण आहे. असे असले, तरी आता प्रश्‍न आहे तो अगदी प्राथमिक शिक्षणापासून जर ‘ऑनलाईन’ शिक्षण चालू झाले, तर त्याचे भावी पिढीवर काय परिणाम होतील ? ते पहाता आपल्या देशाची स्थिती, आपला शैक्षणिक आणि सांस्कृतिक इतिहास यांचा अभ्यास केल्यास काही तात्काळ अन् काही दूरगामी परिणाम यांचा विचार होणे अनिवार्य आहे.

२. सर्वसाधारण पालकांच्या खिशाला ‘ऑनलाईन’ शिक्षणाचा व्यय परवडणार का ?

आर्थिकदृष्ट्या आपल्या देशातील बहुसंख्य जनता (अनुमाने ७० टक्के) मध्यम आणि गरीब या वर्गात येते. ‘ऑनलाईन’ शिक्षण घेण्यासाठी ‘स्मार्टफोन’ असणे आवश्यक आहे. घरात एकापेक्षा अधिक शिकणारी मुले असल्यास तेवढ्या संख्येने भ्रमणभाष उपलब्ध करून द्यावे लागतील आणि ते महागडे असतात. सर्वसाधारण पालकांच्या खिशाला हा व्यय परवडणारा आहे का ?

३. शारीरिकदृष्ट्या होणारा परिणाम

लहान मुले असो, तरुण असो किंवा वयस्कर असो, सर्वजण स्वतःचा अधिकाधिक वेळ दूरचित्रवाणी अथवा भ्रमणभाषवर वेगवेगळे अ‍ॅप्स बघण्यात घालवतात, असे सर्वसाधारण सर्वेक्षणात आढळून आलेले आहे. आजचा विद्यार्थी शारीरिक व्यायाम आणि मैदानी खेळ यांपासून पूर्णपणे वंचित आहे. त्यात भरीसभर म्हणून जर शिक्षणही चार भितींच्या आड चालू झाले, तर ईश्‍वरीकृपेने विपुल प्रमाणात मिळणार्‍या सूर्यप्रकाशाला आणि मोकळ्या शुद्ध हवेला आमची मुले मुकणार नाहीत का ?

४. विद्यार्थ्यांवर उत्सर्जित किरणांचा होणारा प्रभाव

भ्रमणभाषमधून बाहेर पडणार्‍या उत्सर्जित किरणांचाही (‘रेडिएशन’चा) वाईट प्रभाव होतो. परिणामी अत्यावश्यक जीवनसत्त्वांचा अभाव आणि त्यावर औषधोपचार हे ओघाने आलेच. मुले भ्रमणभाषशी घंटोन्घंटे चिकटून राहिल्याने दृष्टीदोष आणि लहान वयात स्नायू आखडणे, असे आरोग्यावर परिणाम होऊ शकतात. त्यांच्यामध्ये एकलकोंडेपणा, स्वार्थीपणा, संकुचित वृत्ती, मित्रत्वाच्या भावनेचा अभाव, सामाजिक बांधिलकीचा अभाव असे दोष वाढीस लागून भावी आयुष्यात ते दुःखी बनू शकतात. बौद्धिक प्रगती हेच आपल्या शिक्षणाचे ध्येय आहे का ? विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधून त्यांना आदर्श नागरिक बनवणे, हेच खर्‍या शिक्षणाचे रहस्य आहे.

५. नैतिकतेचा र्‍हास होऊन विद्यार्थी विकृतीच्या गर्तेत ढकलेले जाण्याची शक्यता

गुरु-शिष्य परंपरा ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. मेकॉलेच्या इंग्रजी शिक्षणपद्धतीने आम्ही भारतीय भोगी बनलो आहोत. ‘विद्यार्थी’ हे नाते टिकवून ठेवणे आवश्यक आहे. आदर, नम्रता, देशप्रेम, धर्मप्रेम, व्यापकता हे गुण भ्रमणभाष नव्हे, तर सगुणरूपी शिक्षकच कोवळ्या मनावर रुजवू शकतात. नेमके याउलट ‘ऑनलाईन’ शिक्षणाचा परिणाम आहे. इंटरनेटवर अनेक अश्‍लील संकेतस्थळे कार्यरत आहेत. जिज्ञासेपोटी विद्यार्थी या संकेतस्थळांकडे वळू शकतात. ज्या कोवळ्या वयात नैतिक मूल्ये रुजायला हवीत, त्या वयात त्यांचा पूर्णतः र्‍हास होऊन विद्यार्थी विकृतीच्या गर्तेत ढकलेले जाऊ शकतात.

६. हवामान आणि तांत्रिकदृष्ट्या होणारे परिणाम

‘ऑनलाईन’ शिक्षण घेण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे अखंडित इंटरनेट सुविधा ! अन्यथा विद्यार्थी अभ्यासक्रमापासून वंचित राहून त्यांची हानी होऊ शकते. वारंवार खंडित होणार्‍या विद्युत प्रवाहामुळे, मुसळधार पावसामुळे आणि जोरदार वार्‍यामुळे पुनःपुन्हा अडचणी संभवतात. तसेच विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे काळजी घ्यायची आहे, हेही त्यांना सविस्तर सांगणे आवश्यक आहे. उदा. भ्रमणभाष किंवा भ्रमणसंगणक (लॅपटॉप) भारित करण्यास (चार्जिंगला) ठेवून इअरफोन वापरले, तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

७. गुरु-शिष्य परंपरा अबाधित रहाणे आवश्यक

सरतेशेवटी एवढेच सांगावेसे वाटते की,

१. सद्यःस्थितीत आपल्या पाल्यांची शैक्षणिक हानी होऊ नये, म्हणून ‘ऑनलाईन’ शिक्षणप्रणाली प्राथमिक स्तरापासून स्वीकारावी लागणार, हा एक पर्याय आहे.

२. असे जरी असले, तरी स्थिती पूर्वपदावर आल्यानंतर विद्यार्थ्यांना खुल्या वातावरणात शिक्षणाचा आनंद देण्यासाठी मूळपदावर येणे अत्यंत आवश्यक आहे.

३. शिक्षण हे देशाच्या मूळपिंडाशी जुळणारे असावे.

४. भारताचा मूळपिंड आध्यात्मिक असल्यानेच माझा देश जगात महान आहे.

५. सरतेशेवटी गुरु-शिष्य परंपरा अबाधित रहावी !

लेखक : सौ. अंजली संजय नायक, म्हापसा, गोवा.