‘कॉकरोच जनता पार्टी’चा संसदेवर जाणारा मोर्चा हिंसक : पोलिसांनी लाठीमार करून पांगवले

  • कार्यकर्त्यांकडून दगडफेक : पोलिसांसह काही जण घायाळ

  • पोलिसांनी फोडल्या अश्रूधुराच्या नळकांड्या

  • जंतर मंतरवरील आंदोलन स्थळ पोलिसांनी केले रिकामी

नवी देहली – गेले ३१ दिवस येथील जंतरमंतरवर ‘कॉकरोच जनता पार्टी’कडून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या त्यागपत्रासाठी आंदोलन करण्यात येत होते. २० जुलै या दिवशी अनुमती नसतांना पक्षाकडून सहस्रो कार्यकर्त्यांसह संसदेवर मोर्चा काढण्यात आला. या वेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्यावर पक्षाच्या हिंसक कार्यकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक चालू केली. यात काही पोलिसांसह अनेक जण घायाळ झाले. यानंतर पोलिसांनी या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी लाठीमार केला आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. कार्यकर्त्यांना संसद भवनापर्यंत जाण्यापासून रोखण्यात आले. कार्यकर्त्यांनी संसदेपासून १०० मिटर अंतरावर पोलिसांकडून लावलेले अडथळे तोडण्याचा आणि धक्काबुक्की करण्याचाही प्रयत्न केला. यामुळे काही घंटे येथे तणाव निर्माण झाला होता.

आंदोलकांवर लाठीमार करतांना पोलीस

परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून संसद भवनाची सुरक्षा अत्यंत कडक करण्यात आली होती. सर्व मुख्य प्रवेशद्वारे बंद करण्यात आली होती. आंदोलकांची पूर्वनियोजित रणनीती संसद परिसरात प्रवेश करण्याची होती. कॉकरोच जनता पक्षाचे कार्यकर्ते मोर्चाच्या वेळी ‘सर्वांनी एकत्र येऊन केंद्रातील मोदी सरकार पाडले पाहिजे’, अशी घोषणा देत होते.

त्यांच्या हातात ‘भीम आर्मी’ पक्षाचे निळे झेंडे होते आणि ते ‘जय भीम’च्याही घोषणा देत होते. या मोर्चाचे काही व्हिडिओ प्रसारित झाले असून त्यात ‘दगडफेक तर होणारच’, असे कार्यकर्ते म्हणत असल्याचे ऐकू येत आहे.

अभिजीत दिपके यांनी एका दिवसाच उपोषण मागे घेतले !

कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके

जंतर मंतर येथे उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना पोलिसांना देहली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर उपोषणा स्थळावरून नेऊन रुग्णालयात भरती केले. त्यानंतर कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी बेमुदत उपोषणाची घोषणा केली होती; मात्र त्यांनी दुसर्‍याच दिवशी उपोषण मागे घेतले.

सोनम वांगचुक यांच्या विनंतीनंतर दिपके यांनी उपोषण मागे घेतल्याचे म्हटले जात आहे. (पडत्या फळाची आज्ञा, असेच याला म्हणावे लागेल ! – संपादक)

कॉकरोच जनता पक्षाच्या प्रवक्त्यांनी घेतली केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांची भेट

केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा (उजवीकडे)

कॉकरोच जनता पक्षाच्या २ प्रवक्त्यांनी केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांची भेट घेतली. भेटीनंतर या प्रवक्त्यांनी सांगितले की, आम्ही आमचे निवेदन जे.पी. नड्डा यांच्याकडे सोपवले आहे. त्यांनी आमचे म्हणणे सहानुभूतीपूर्वक ऐकून घेतले आणि ही संपूर्ण चर्चा अत्यंत सलोख्याच्या वातावरणात पार पडली. सरकार आमच्या मागण्यांवर नक्कीच विचार करेल, असा आम्हाला विश्वास आहे. आम्ही आमच्या ठिकाणी परत पोचून सर्व समर्थकांना शांतता राखण्याचे आवाहन करू.

संपादकीय भूमिका

पोलिसांवर दगडफेक करणार्‍यांवर गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे; म्हणजे ते आणि अन्य कुणीही अशा प्रकारचे धाडस पुन्हा करणार नाही !