उष्णतेवरून भारताची थट्टा, तर युरोपविषयी सहानुभूती दाखवली जात आहे !

तीव्र उष्णतेच्या लाटेवरील जागतिक प्रसारमाध्यमांच्या दुटप्पी दृष्टीकोनावर पोलंडच्या महिलेची कडक टीका

नवी देहली – मी सध्या पोलंडमध्ये आहे, जिथे तापमान कधीही विचार केला नव्हता अशा ३५ अंश सेल्सिअसवर पोचले आहे. जेव्हा भारत उष्णता सहन करतो, तेव्हा त्याला ‘अपयश’ म्हणतात आणि जेव्हा पाश्चात्य जग उष्णता सहन करते, तेव्हा त्याला ‘शोकांतिका’ म्हटले जाते, अशा शब्दांत भारतात रहाणार्‍या पोलंडच्या अग्निएस्का हडाला या महिलेने हवामान संकटाच्या वृत्तांवरून जागतिक प्रसारमाध्यमांच्या दुटप्पी दृष्टीकोनावर तीव्र टीका केली. त्यांनी ‘इन्स्टाग्राम’वर व्हिडिओ प्रसारित केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी साडी नेसली असून कपाळावर बिंदी लावलेली दिसत आहे.

भारताचे दुःख म्हणजे अपयश, युरोपचे दुःख म्हणजे शोकांतिका !

हडाला यांनी नमूद केले की, युरोपात शाळा बंद केल्या जात आहेत, बाहेरील उपक्रमांवर बंदी घातली जात आहे, रस्ते आणि रेल्वेरुळ वितळत आहेत, वातानुकूलन यंत्राच्या (एसीच्या) वाढत्या मागणीमुळे वीजयंत्रणा कोलमडली आहे. युरोपमधील अनेक घरे आणि कार्यालये यांमध्ये भारतात असतात, तसे एसी किंवा साधे पंखेही नाहीत. भारतातील अनेक भागांमध्ये ४० अंश सेल्सिअस तापमान असणे ही सामान्य गोष्ट आहे. आता विचार करा ! भारतात ३५ अंश तापमान अनेक ठिकाणी आल्हाददायक मानले जाते. भारतातील उन्हाळा नियमितपणे ४० अंशांच्या पुढे जातो आणि काही भागांत तर तो ५० अंश सेल्सिअसपर्यंत पोचतो. तरीही जेव्हा भारतासमोर एखादे आव्हान उभे रहाते, तेव्हा विदेशी प्रसारमाध्यमे भारताला ‘मागासलेले’ म्हणण्यास तत्पर असतात; पण आज युरोपची ही अवस्था झाल्यावर ‘असे मथळे कुठे गायब झाले आहेत?’, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

मुंबईत वर्साेवा चौपटीवर झोपलेल्यांचे समर्थन

हडाला पुढे म्हणाली की, तुम्हाला आठवत आहे का, जेव्हा वीज गेल्यामुळे मुंबईतील वेसावे (वर्सोवा) चौपाटीवर किंवा उद्यानांमध्ये झोपलेल्या भारतियांची छायाचित्रे  जगभर प्रसारित केली होती ? त्यावर विनोद केले गेले आणि भारताची खिल्ली उडवली गेली. आज युरोपच्या अनेक भागांमध्ये लोक रात्रीचे चौपाटीवर आणि उद्यानांमधील गवतावर झोपत आहेत; कारण त्यांच्याकडे उपलब्ध असलेला हा सर्वांत स्वस्त ‘एसी’चा पर्याय आहे; पण या वेळी जग त्यांच्यावर हसत नाही, तर त्यांच्याविषयी सहानुभूती व्यक्त करत आहे. खरे तर प्रत्येक माणसाला सहानुभूती मिळण्याचा अधिकार आहे.

हवामानातील टोकाचे पालट हे जागतिक वास्तव  !

व्हिडिओच्या उत्तरार्धात त्यांनी स्पष्ट केले की, हवामानातील कमालीचे पालट हे जागतिक वास्तव आहे. कोणताही देश यातून सुटू शकत नाही. तरीही काही कारणास्तव केवळ भारताकडूनच परिपूर्ण असण्याची अपेक्षा ठेवली जाते. सुमारे १४० कोटी लोकसंख्या असलेल्या देशाचे व्यवस्थापन करणे हे छोट्या देशांच्या व्यवस्थापनापेक्षा पूर्णपणे वेगळे असते. जर आपण २ लोकांचे कुटुंब चालवण्याची तुलना शेकडो लोकांचे कुटुंब चालवण्याशी केली, तर ते चुकीचे ठरेल. एवढी मोठी आव्हाने असतांनाही, भारताने गेल्या दशकात अभूतपूर्व गतीने जगातील सर्वांत मोठ्या मेट्रो नेटवर्कपैकी एक उभारले आहे, महामार्ग, विमानतळ, डिजिटल पेमेंट यंत्रणा, परवडणारे कूलिंग पर्याय आणि सार्वजनिक पायाभूत सुविधांचा विस्तार केला आहे. भारताची तिथेच टीका करा जिथे ती योग्य आहे; पण भारताच्या यशाचा उत्सवही तितक्याच आत्मविश्वासाने साजरा करा; कारण जर आपण आपल्या देशाचा आदर केला नाही, तर इतर कुणीही करणार नाही.